

महापालिका निवडणुकीतील बिनविरोध नगरसेवकांवरून विरोधकांनी भाजपवर आरोप केले आहेत.
या आरोपांना प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे स्वतः बिनविरोध आमदार असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
शेलार यांनी ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असा टोला लगावल्याने राजकीय वाद चिघळला आहे.
Mumbai News : राज्यात महानगरपालिका निवडणुकांमध्ये देखील नगरपालिका आणि नगर पंचायतींप्रमाणेच तब्बल 65 नगरसेवक हे बिनविरोध झाले आहेत. ज्यात भाजपचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यावरूनच आता राजकारण तापलं असून विरोधकांनी यावरून महायुतीसह भाजपवर सवाल उपस्थित केले आहेत. दरम्यान मनसेने या निवडीविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर उद्धव ठाकरे यांनीही या बिनविरोध निवडणुकीवर टोला लगावत जहरी टीका केली होती. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी तिखट प्रतिक्रिया दिली असून त्यांनी ठाकरेंनी आधी राजीनामा द्यावा, तेच बिनविरोध आमदार असल्याची खोचक टीका केली आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. पण त्याआधीच सत्ताधारी महायुतीने विरोधकांना जोरदार हादरा दिला आहे. महायुतीचे राज्यभर 65 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपाचे 44, शिवसेना 19, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 उमेदवारांचा समावेश आहे.
यावरून विरोधकांकडून गंभीर आरोप सुरू झाले आहेत. मनसेच्या अविनाश जाधव यांनी तर उमेदवारांचे अर्ज बाद करून महायुतीचे उमेदवार बिनविरोध केले जात असल्याचा आरोप केला होता. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी १० कोटी रूपये देवून उमेदावारांना माघार घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप केला होता.
तसेच याच प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनीही जोरदार टीकास्त्र भाजपवर सोडले होते. त्यांनी बिनविरोध निवडणुकीवरून टोला लगावत जहरी टीकाही केली होती. आता यावरून जोरदार वाद सुरू झाला असून भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
शेलार यांनी उद्धव ठाकरे हे स्वत: बिनविरोध आमदार झाले असून आधी त्यांनी आपला राजीनामा द्यावा, आणि मग यावर बोलावं असे सुनावले आहे. ते साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट क्रार्यक्रमात बोलत होते. यावेळी शेलार यांनी विरोधकांना खडेबोल सुनावतं विविध मुद्द्यांवर आपली रोख-ठोक भूमिका मांडली.
शेलार म्हणाले, अर्जाची छाननी, चिन्हे देणे, अर्ज माघारी घेणे या सर्व कायदेशीर प्रक्रिया आहेत. यापेक्षा काही वेगळे झाले असेल तर त्यासाठी कोर्ट आहे. पण हे काही करायचे नाही, दाबून खोटं बोलायचं. बिनविरोध म्हणजे लोकशाहीला धोका असे खोटे बोलयचे.
मात्र 14 मे 2020 रोजी उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. पण आज या सभागृहाचे सदस्य आहेत. ते बिनविरोध निवडून गेले. स्वत: निवडून आले तेव्हा लोकशाही धोक्यात नाही का? आता नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यावर त्यांना चालत नाहीत. यामुळे उद्धव ठाकरेंनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
दरम्यान आता या बिनविरोध नगरसेवक निवडींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून याचिका दाखल केली आहे. सुमारे ६८ ते ७० जागांवर बिनविरोध निवड झाल्याने लोकांमध्येही तीव्र नाराजी असून, राज्य निवडणूक आयोगाने देखील याची दखल घेऊन चौकशी समिती नेमली आहे. आता अहवाल काय असणारे हे तो समोर आल्यावरच कळणार आहे.
Q1. आशिष शेलार यांनी नेमके काय विधान केले?
➡️ उद्धव ठाकरे स्वतः बिनविरोध आमदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, असे शेलार म्हणाले.
Q2. हा वाद कोणत्या मुद्द्यावरून आहे?
➡️ महापालिका निवडणुकीतील बिनविरोध नगरसेवकांवरून हा वाद निर्माण झाला आहे.
Q3. विरोधकांचे आरोप काय आहेत?
➡️ बिनविरोध निवडी लोकशाहीला बाधा आणत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Q4. भाजपची भूमिका काय आहे?
➡️ भाजपने बिनविरोध निवड ही लोकशाही प्रक्रियेचाच भाग असल्याचे म्हटले आहे.
Q5. या विधानामुळे राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
➡️ भाजप आणि ठाकरे गटामधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.