
Maharashtra Election fixing allegations : महाराष्ट्र विधानसभा 2024च्या निवडणुकीबाबत काँग्रेस तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या लिखाणावरून राज्यातील भाजप सत्ताधारी चांगली आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवरून सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची चांगलीच भंबेरी उडाली.
या मुद्यावर विरोधक म्हणून, राहुल गांधी एकाकी पडले नसल्याचं देखील समोर आलं. राहुल गांधींपाठोपाठ अख्खी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष देखील मैदानात आले. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच पेटला. आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी देखील या मुद्यावरून, सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. 'हा एक लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरील पूर्वनियोजित योजनाबद्ध हल्ला होता. महाराष्ट्रातील लोकशाही हरली नाही, तिचा शिरच्छेद करण्यात आला', असा घणाघात रमेश चेन्नीथला यांनी केला.
रमेश चेन्नीथला म्हणाले, "महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा 2024 च्या निवडणुकीबाबत राहुल गांधी यांनी आकडेवारीसह मांडलेले सत्य हा फक्त निव्वळ लेख नाही, तर भारताच्या लोकशाहीवरील योजनाबद्ध केलेल्या आघाताचे सत्य उघड करणारा दस्ताऐवज आहे". लोकशाही संस्थाना ताब्यात घेऊन आपल्या फायद्यासाठी वाकवून कपट, फसवणूक करून महाराष्ट्रात जनमताची चोरी करण्यात आली, असेही रमेश चेन्नीथला यांनी म्हटले.
‘महाराष्ट्राचे प्रभारीपद स्वीकारल्यानंतर माझ्या पहिल्याच निवडणुकीत म्हणजेच 2024 मध्ये लोकसभेत काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीने मोदी (Narendra Modi) लाटेला थोपवले आणि महाराष्ट्रात भाजपचा पराभव केला. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात झालेला भाजपचा पराभवच त्यांच्या पूर्ण बहुमताच्या मार्गातील मुख्य अडथळा ठरला; मात्र, अवघ्या सहा महिन्यांत असे काय घडले? ज्या महाविकास आघाडीला 170 हून अधिक जागा मिळायला हव्या होत्या, ती केवळ 50 जागांवर आली, ही कुणालाही पचण्यासारखी बाब नाही', असे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले.
'मोदींचा महाराष्ट्रात पराभव झाला त्याच महाराष्ट्रात ज्यांच्या राजकारणावर विश्वासघाताचा, संधीसाधूपणाचा आणि गद्दारीचा शिक्का लागला आहे, त्यांनी असा काय पराक्रम केला की ज्यामुळे त्यांना एवढा प्रचंड विजय मिळवला. ही काही सहज घडलेली गोष्ट नाही. हा एक लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरील पूर्वनियोजित योजनाबद्ध हल्ला होता. महाराष्ट्रातील लोकशाही हरली नाही, तिचा शिरच्छेद करण्यात आला', असा गंभीर आरोप रमेश चेन्नीथला यांनी केला.
'2019 लोकसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या 8.98 कोटी होती. 2024 लोकसभा पर्यंत, ही संख्या नैसर्गिक वाढ म्हणून 9.29 कोटी झाली, म्हणजेच पाच वर्षांत 31 लाखांची वाढ झाली; परंतु केवळ पाच महिन्यांतच म्हणजेच विधानसभेच्या निवडणुकीत ही संख्या अचानक 9.7 कोटींवर पोचली, म्हणजे 41 लाख मतदार वाढले. सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रौढांची एकूण संख्या 9.54 कोटी असताना 9 कोटी 70 लाख मतदार कसे झाले', असा प्रश्नही रमेश चेन्नीथला यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र विधानसभा मतदानाच्या दिवशी प्राथमिक मतदान टक्केवारी 58.22 टक्के होती. ना कुठे मोठ्या रांगा होत्या, ना कुठे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु होते; मग, एकाच रात्रीत मतदानाची अंतिम आकडेवारी 66.05 टक्के एवढी कशी वाढली, ही तब्बल 07.83 टक्क्यांची वाढ म्हणजेच 76 लाखांहून अधिक मतदारांनी सायंकाळनंतर मतदान केले. याला जनमताची चोरी नाही, तर काय म्हणायचे, असेही रमेश चेन्नीथला यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.