Beed News : भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी नारळी सप्ताहाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांची पाठराखण करत ते पुन्हा पदावर यावेत आणि त्यांच्या हातून समाज कल्याणाचं काम घडावं, अशी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांच्या गालावरून वारं गेलं आहे, चांगली वाणी बंद झाली, त्यांच्यासाठी प्रार्थना करू, असे म्हणत सदिच्छा व्यक्त केली. यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) काय बोलले याच्यावर मी बोलणार नाही, शेवटी गादीचा सन्मान आम्ही करतो. ते काहीही बोलले तरी आम्ही बोलणार नाही. परंतु ते पुन्हा पदावर येणे म्हणजे अन्याय अत्याचार त्या जिल्ह्यातल्या लोकांवर सुरू होणे, त्याचे दुष्परिणाम पुन्हा एकदा सरकारला भोगावे लागतील. कारण आत्ताच मंत्रिपदाचा गैरवापर करून किती गुंडगिरी वाढली होती, ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे होते तेव्हा इतकी गुंडगिरी नव्हती. त्यामुळे ते पुन्हा पदावर आले तर आम्ही वस्ताद आहेतच, असा इशाराच जरांगे यांनी दिला.
बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे नारळी सप्ताहाला आज धनंजय मुंडे हजर राहू शकले नाही. (Manoj Jarange Patil) हेलिकाॅप्टर उड्डाणाला दोन तास थांबूनही परवानगी मिळाली, आपल्यामुळे कार्यक्रमाला विलंब होऊ नये म्हणून आपण दौरा रद्द करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले होते. याबद्दल त्यांनी महंत नामेदव शास्त्री व पिंपळनेरकरांची क्षमाही मागितली. दरम्यान, नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे हे पुन्हा पदावर यावेत आणि त्यांच्याकडून समाजसेवा घडावी, यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.
यावर प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झालेली असताना मनोज जरांगे पाटील यांना माध्यमांनी विचारले असता, त्यांनी त्या गादीचा आम्ही सन्मान करतो, त्यामुळे आम्ही काही बोलणार नाही. परंतु त्यांच्या अंगावरून वारं गेलं की गालावरून वारं गेलं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. त्यावर मी बोलणार पण नाही. धनंजय मुंडे पुन्हा पदावर आले तर पुन्हा गुंडगिरी वाढणार, टोळ्या वाढणार आणि पुन्हा लोक मारणार. आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्यावर अन्याय अत्याचार होणार, असा इशारा दिला.
मंत्रिपदाचा दुरुपयोग करून गुंडागिरी सुरू झाली तेव्हा खंडण्,लोकांच्या हत्या झाल्या. त्यावेळी जिल्ह्यातल्या सर्व समाजातील लोकांचे मन दुखले. त्यांचा विषय मी बोलणं बंद करून टाकलेला आहे, त्याचं कारण म्हणजे आमचेच धड नाहीत, सरकार आणि फडणवीस यांची काही प्रतिनिधी अंधारात काही गोष्टी ठरवत आहेत. त्याचीही संपूर्ण माहिती आम्हाला मिळाली आहे. जर देशमुख कुटुंबावर काही अडचण आली आणि आरोपी सुटले त्यावेळी आम्ही यांना आमचा कचका दाखवू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.