
'छत्रपती' कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचेही बिगुल अखेर वाजले आहे. येत्या 21 मेपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. तर निवडणुकीचे मतदान 22 जून रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
जबलपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी भारतीय सेना तसेच लष्कराबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं.यावेळी त्यांनी संपूर्ण देश, देशाची सेना आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहे, असं विधान करुन नवा वाद ओढवून घेतला आहे.
एकीकडे मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर युवासेनेचे प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र हितासाठी जे सोबत येतील आम्ही त्यांच्या सोबत राहू. आमचं राजकारण सेटिंगचं नाही, तर स्वच्छ दिलाने एकत्र यायचा विचार आम्ही करत असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जालन्यात बोलताना लाडकी बहिणींना 21oo रुपये कधी मिळणार यावर भाष्य केलं आहे.त्या म्हणाल्या,यासंदर्भात मी ठिकठिकाणी महिलांसोबत बोलत आहे,त्यांच्याकडून माहिती घेत आहे.महिलांची जी काही 2100 रुपयांची मागणी आहे,त्यावर सरकार योग्यवेळी नक्कीच विचार करेल, अशी माहितीही गोऱ्हे यांनी दिली.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. "या पुस्तकाचं नावच चुकीचं आहे. 'नरकातला राऊत' असं नाव ठेवणं अधिक योग्य ठरेल", अशी खोचक प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
वानखेडे स्टेडियममध्ये शुक्रवारी एक भव्य सोहळा पार पडला. टीम इंडियाचा हिटमॅन, मुंबईचा अभिमान रोहित शर्मा याच्या नावाने स्टँडचं नामकरण करण्यात आले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच अशा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाला. या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा उपस्थितीत होते.
भारतीय जनता पक्ष हा सोलापूर जिल्ह्यातील सर्वांत मजबूत पक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप फार ताकदीने लढणार आहे. काही लोकं सोबत येतील. काँग्रेसमधील काही नेते आणि अन्य पक्षाचे लोकंही येतील. जे लोक भाजपची विचारधारा स्वीकारतील, पक्षात प्रवेश करून भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेऊन काम करतील, अशा लोकांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करण्याचे काम आम्ही करू, असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात केले.
भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे ढासळलेली परिस्थिती पूर्वपदावर यावा, यासाठी पाकिस्तान सरकारकडून पाकव्याप्त काश्मीरसाठी 53 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. पाकिस्तानला आयएमएफकडून मिळालेल्या कर्जानंतर शाहबाज शरीफ सरकारने पाकव्याप्त काश्मीरसाठी मदत दिली आहे.
संजय राऊत हे राज्यात आलेली विकृती आहे. पंतप्रधानांवर लिहिणं आणि बोलणं एवढी राऊतांची पात्रता नाही. आपल्याखाली काय जळतं. मुंबईतील भूखंडाचे घोटाळे जर बाहेर काढले तर त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या नेत्याबद्दल छापावं लागेल. पदाची गरिमा ठेवली पाहिजे. विकृती माणसावर आपण काय प्रतिक्रिया द्यावी. ज्यांनी जनाधार गमावला आहे, त्यांच्याकडे आता पुस्तकं लिहिणं आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं, एवढंच काम त्यांच्याकडं उरलं आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांनी त्यांना वैभव नाईक पाहिजेत की विनायक राऊत पाहिजेत हे एकदा ठरवावं. कारण तीन आठवड्यापूर्वी उद्धव ठाकरे परदेशात जाण्याच्या अगोदर वैभव नाईक हे एक शिष्टमंडळ घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आहेत. विनायक राऊत आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात नको, अशी मागणी करण्यासाठी ते ठाकरेंकडे गेले होते. हे खरं की खोटं आहे, ते सांगा. म्हणजे त्यांच्यासोबत गेलेला एक व्यक्ती मी समोर आणतो, असे आव्हान मंत्री नीतेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिले.
संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यांवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. फडणवीस म्हणाले, मी कादंबऱ्या वाचणे कधीचं सोडले आहे, कथा, कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही असा खोचक टोला यावेळी फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
पुण्यातील चंदननगर पोलीस स्थानकातून चालणारे जमीन व्यवहाराचे रॅखेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वाघोली येथील 10 एकर जमिन हडपण्याच्या उद्देशाने कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
पुण्यातील वाघोली येथील 10 एकर जमिन हडपण्याचे उद्देशाने संगनमत करून फौजदारीपात्र रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता बनावट महिला उभी केली. ती मूळ जमिनीची मालक असल्याच्या भासविण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसायाशी देखील हे प्रकरण संबंधित असल्याचे बोलले जाते आहे.
आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे, अपर्णा यशपाल वर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर पोलिसांचे एक तपास पथक आता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आहेत. लांडगे यांच्यासह चार जणांच्या विरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
तुम्हा सर्वांचा असल्याचा मला खूप अभिमान आहे. या भूजने 1965 मध्ये पाकिस्तानविरुद्धचा आपला विजय पाहिला आहे. या भूजने 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्धचा आपला विजय पाहिला आहे. आज पुन्हा एकदा, या भूजने पाकिस्तानविरुद्धचा आपला विजय पाहिला आहे. भुजच्या मातीत देशभक्तीचा सुगंध आहे, सैनिकांमध्ये भारताचे रक्षण करण्याचा अढळ संकल्प आहे, अशा शब्दात संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी भुज बेस कॅम्प आणि इथल्या सैनिकांचे कौतुक केले.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्री विजय शाह यांचा राजीनामा घेऊन त्यांना हाकलले का नाही? असा सवाल कर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर संताप व्यक्त केला.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूज पोलीस (Vaduj Police) माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले आहेत.जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईलवर संभाषण झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते.
पुढील महिन्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालखी मार्गाची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले करणार आहेत.
भारतीय लष्कराचे श्रीनगरमध्ये केलेल्या कारवाईत सहा दहशतवाद्यांच्या खात्मा केल्याचे लष्कराकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. लष्कर आणि पोलिस यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.
सध्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला एकसंध ठेवण्याचा काँग्रेस प्रयत्न करीत आहे. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मातोश्रीवर जाऊन सपकाळ ठाकरेंची भेट घेणार आहेत. सपकाळ यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. 13) जाहीर झाला. या निकालात अनेक विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालं. तर काही विद्यार्थी नापास झाले. मात्र, नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एटीकेटी परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 24 जून ते 17 जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
जालन्यात 5 लाखांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे. राजेंद्र शिंदे अस लाच घेणाऱ्या महसूल सहाय्यकाचं नाव आहे. तक्रारदाराचा दाव्याचा निकाल बाजूने लावण्यासाठी राजेंद्र शिंदेने पैशाची मागणी केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी या लाचखोर महसूल सहाय्यकाविरोधात जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते बुलढाणा येथील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचा भूमिपूजन करणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार सोमवारी बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती बैठकी तसेच खरीप हंगामाची बैठक घेणार आहेत.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज गुजरातमधील भुज एअरबेसचा दौरा करणार आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर ते सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. तसंच यावेळी सीमेवरील सुरक्षेचा आढावा देखील घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.