औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादची जाहीर सभा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. या सभेची जय्यत तयारी झाली असून मैदान देखील सजले आहे. आता (Raj Thackeray) राज ठाकरे आपल्या भाषणातून कोणाचा आणि कसा समाचार घेतात? याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली असतांनाच शिवसेनेने (Shivsena) मात्र मनसेच्या सभेची "फुकटात करमणूक होत असेल तर का नको?" असे म्हणत खिल्ली उडवली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला. लोकसत्ता वृत्तपत्राच्या 'दृष्टी आणि कोन’ या वेब-उपक्रमाचा समारोप मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संवादाने झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, "जन्मापासून ते वेगवेगळे झेंडे घेता आहेत. वारंवार झेंडे बदलावे का लागतात? आम्ही कधी बदलला का? अस्तित्व दाखवण्यासाठी हे करावं लागतं आहे. दोन वर्षांचा मोठा कालखंड गेला आहे. पण या काळात कोरोनामुळे नाटक, सिनेमा सगळं काही बंद होतं. त्यामुळं आता जर फुकटात करमणूक होत असेल तर का नको? हिंदुत्वाच्या या नव्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या मैदानात कोणते खेळ करतात हे आत्तापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ करणारे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत.
शिवसेना हा पूर्वी पासून हिंदुत्ववादी पक्ष आहे, हे मी विधानसभेतही बोललो आहे, ते लपवण्याची गरज नाही. आता काहीजण हे करून बघू, ते करून बघू असं म्हणत आहेत. सध्याच्या मार्केटिंगच्या जमान्यात नाही आवडलं तर परत करा असं आहे. हे गाजराच्या पुंगीसारखं आहे. वाजली तर वाजली. नाही तर मोडून खाल्ली, असं भोंगेधारी, पुंगाधारी फार पाहिलेत" अशीही टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.