

शिवसेना भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शाखाप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीचा निर्णय लवकरच घेऊ, मात्र तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याच्या घटनेवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘अशाप्रकारची घटना ही निषेधार्ह आहे. ज्या कुठल्या समाजकंटकांनी हे कृत्य केलं आहे, त्याला पोलिस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं मला योग्य वाटत नाही.’
बांधकाम क्षेत्रात मोठं नाव असलेल्या लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. लोढा ग्रुपची 85 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे सुपुत्र अभिषेक लोढा यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड प्रेमात वेडा होत माजी उपसरपंच राहिलेल्या गोविंद बर्गे या युवकानं गोळी झाडून घेत आत्महत्या केली. यामुळे नर्तिका असलेल्या पूजा गायकवाड आणि कला केंद्रावर टीका होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी तमाशा आणि कला केंद्र यातील फरक सांगत आम्हांला बदनाम करू नका असं खडसावलं आहे.
स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी लाल रंग फेकल्याचा प्रकार पहाटे घडला होता.फेकलेल्या रंगाचे ५ सँपल गोळा करण्याचे काम सुरू असून जमिनीवर, चौथऱ्याचे, पुतळ्यावरचे काही नमूने फॉरेंसिक एक्सपर्टच्या हस्तगत केले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आता चलो दिल्लीचा (Delhi) नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यटन विभागामार्फत राज्यातील ७५०० युवांना प्रशिक्षण देण्याचा ‘नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम’ व पर्यटकांना सुविधा देणारे ‘नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र’ पाच ठिकाणी उभारण्यात येणार आहे. 'नमो पर्यटन' उपक्रम स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देत, जागतिक पर्यटकांना आकर्षित करेल. हा उपक्रम महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रातील नवा मैलाचा दगड ठरणार असून हा उपक्रम प्रधानमंत्री यांच्या सर्वसमावेशक आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचे मूर्त स्वरूप आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी घुसले आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला. आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ते आक्रमक झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी आज मोठी घोषणा केली आहे. देशाची राजधानी दिल्लीत मराठ्यांचे देशव्यापी अधिवेशन घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्यानंतर हे अधिवेशन घेण्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. अद्याप अधिवेशनाच्या तारखा त्यांनी जाहीर केलेल्या नाहीत.
भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचा रंगीत फोटो छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच हा महत्वपूर्ण बदल केला जाणार आहे.
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव आज येथे झाला. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे. प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी होतील. राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा संकल्प असल्याचा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
मंत्री छगन भुजबळ यांच्या बेनामी संपत्ती संदर्भात उच्च न्यायालयाने पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाने पुन्हा भुजबळ यांच्या बेनामी संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत थोड्याच वेळात अंजली दमानिया या विषयावर माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
भारताच्या शेजारील देश असलेल्या नेपाळमध्ये तरुणांनी आंदोलनाच्या माध्यमातून सत्ता उलथून टाकली आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने देशातील विरोधी पक्ष देखील सरकारवर निशाणा साधत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात देखील सरकारच्या ध्येय धोरणामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते अशी शक्यता विरोधक व्यक्त करत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यकर्ते घाबरले असून पुढील दोन महिन्यात अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही असं सांगितलं आहे.
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, सकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी पोलीस तिथे गेले तेव्हा तिथं काहीही नव्हतं. त्यानंतर खालच्या चबुतऱ्यावर ऑईल पेंट सापडलं आहे. पोलिस याची चौकशी करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य ती कारवाई केली जाईल. पोलीस यामध्ये डिटेल इन्वेस्टीगेशन करत आहेत. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ प्रमाणे जी काय कारवाई आहे ती होईल.
बीड रेल्वे सेवेचा आज शुभारंभ होतोय, या भावना शब्दांच्या पलीकडच्या आहेत. यापेक्षाही मोठा कार्यक्रम घ्यायचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार” असं मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. “आज बीडच्या रेल्वे सेवेचा शुभारंभ होतोय, या प्रसंगीच्या भावना शब्दांच्या पलीकडील आहेत.
बीडकरांचे दशकांपासूनचे जुने स्वप्न अखेर साकार! आज पहिल्यांदाच बीड-अहिल्यानगर रेल्वे धावली. पहिल्या टप्प्याची पूर्णता होताच संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. रेल्वेसाठी आतुरलेले नागरिक आनंदाने जल्लोष करत आहेत. या नव्या पर्वामुळे बीडच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे.
पटना उच्च न्यायालयाने काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या स्वर्गीय आई हीराबेन मोदी यांच्यावरील कथित अपमानजनक AI व्हिडिओला न्यायालयाने तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. 'न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या बनावट व्हिडिओंमुळे समाजात दिशाभूल होते तसेच वैयक्तिक प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचतो. पंतप्रधानांच्या कुटुंबीयांचा राजकारणात अपमान करण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह असल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या निर्णयामुळे काँग्रेसची अडचण वाढली असून न्यायालयाच्या आदेशानंतर व्हिडिओ हटवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते. जिजाऊ सृष्टी येथे नागरिकांनी त्यांना निवेदन दिल्यानंतर पवारांनी थेट जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना खडे बोल सुनावले. “चुकीची कामे खपवून घेऊ नका. कंत्राटदारांना वेळोवेळी सूचना करा, अन्यथा कारवाई करा. कामे दर्जेदार झाली पाहिजेत. मागचा पुढचा विचार करून कामांचा दर्जा वाढवा,” अशा शब्दांत पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले. जिल्ह्यातील कामांमध्ये ढिलाई चालणार नाही, दर्जावर तडजोड होऊ देणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 26 लाख लाडक्या बहिणींना भाऊ असल्याचा विश्वास देऊन मतं मिळवली आणि सत्तेचा मलिदा खाल्ल्यावर अपात्र असल्याचा साक्षात्कार झाला, असा आरोप करत बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अॅड. हेमा पिंपळे यांनी आंदोलक केले. राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असताना, तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. हा प्रकार काल रात्री घडली असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस तपास करत आहे.
नक्षलवाद्यांशी संबंधित मोठी बातमी समोर आली असून, नक्षलवादी शस्त्रे सोडण्यास तयार आहेत. यासंदर्भात नक्षलवादी संघटनेचे प्रवक्ते अभय यांनी निवेदन जारी केले आहे. शस्त्र सोडून शांततेच्या मार्गाने चर्चेसाठी नक्षलवाद्यांनी एक महिन्यांचा वेळ मागितला आहे. व्हिडिओ काॅलद्वारे सरकारशी बोलण्यास तयार आहे. यासाठी एक महिन्याची युद्धबंदीची मागणी केली आहे. तसंच नक्षलवाद्यांनी शस्त्रसंधीवर लोकांची मत मागवली असून, यासाठी ई-मेल आयडी जारी केला आहे.
लातूरमध्ये धक्कादायक घटना घडली. जन्मदात्या बापालाच स्वतःच्या मुलाने जीव संपवला आहे. पोलिस भरतीसाठी पैसे दिले नाही. पण घरातील सिलिंडरसाठी पैसे दिले, या रागातून मुलाने हे कृत्य केल्याची पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. लातूरच्या चाकूर तालुक्यातील हिंपळनेर इथं ही घटना घडली आहे. काशिनाथ पांचाळ (वय 70) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून, मुलगा अजय (वय 24) याने लाकडाने बेदम मारहाण केली होती.
कल्याण चिंचपाडा परिसरात जमिनीच्या वादातून एक व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दिपक म्हात्रे असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते केडीएमसी कर्मचारी आहेत. सहा हल्लेखोरांनी कोयता आणि तलवारीने दिपक म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. जमिनीच्या वादातून सुपारी देऊन हल्ला घडवून आणल्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून अमित शहा आणि जय शहा यांच्यावर व्यंगचित्रातून टीका केली. पहलगामच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांचा आणि क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत नेमकं कोण जिंकलं, असा सवाल राज ठाकरेंनी केला. राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरुन एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. या व्यंगचित्राद्वारे राज ठाकरे यांचे पुन्हा फटकारे मारले आहेत.
मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करतात, कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी न्यायालयात हा निर्णय टिकेल किंवा नाही याची माहिती नसल्याचं वक्तव्य केलं. मंत्री झिरवळ हे हिंगोलीचे पालकमंत्री आहेत. मराठा समाजाला दिलेलं कुणबी जातीचं प्रमाणपत्र हे कायद्यात बसेल किंवा नाही सांगू शकत नाही, असं मंत्री झिरवळांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. अजितदादांचा ताफा ध्वजारोहणासाठी पोलिस मैदानाकडे जात असताना, दोन युवकांनी त्यांच्या ताफ्याच्या समोर येत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत या दोघा युवकांना ताब्यात घेतले. केज तालुक्यातील कुंभेफळ इथले हे युवक आहेत. कुंभेफळ ग्रामसभेची चौकशी करून कारवाईची प्रमुख मागणी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान, ओबीसींवर अन्याय करू नका, असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांचं भाषण सुरू होताच काही लोकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली. त्यामुळे काहीकाळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता भुजबळांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे मानहानी प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू होणार आहे. कोकाटे यांनी विधिमंडळ अधिवेशनात रमी खेळल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. या प्रकरणी कोकाटेंनी रोहित पवारांना नोटीस बजावली होती. नोटीसच्या माध्यमातून आठ दिवसात माफी मागण्याचा रोहित पवारांना इशारा दिला होता. मात्र, या नोटीसकडे रोहित पवारांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर मानहानी दावा दाखल करण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरातील डॉ. हेडगेवार चौकात स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलं आहे. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूर शहर भाजप कडून 111 ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले. त्यानंतर जरांगेंच्या मागणीनुसार राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआरही काढला. मात्र, या आंदोलनादरम्यान पाच मराठा आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आंदोलकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी 25 लाखांची आर्थिक मदत दिली आहे. प्रत्येक मयत आंदोलकाच्या कुटुंबियांना त्यांनी पाच लाखांची मदत केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत 'चलो जीते है' हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट देशभरातील लाखो शाळांमध्ये आणि काही चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येणार आहे. 2018 मध्ये रिलिज झालेला हा चित्रपटात स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मोदींच्या बालपणावर आधारित आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75वा वाढदिवस आहे. या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतची माहिती मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. या पोस्टमधून त्यांनी ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.