Maharashtra Politics Live Updates : जगनमोहन रेड्डींच्या पक्षाचा सीपी राधाकृष्णन यांना जाहीर पाठिंबा

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Vice President Election News : जगनमोहन रेड्डींच्या पक्षाचा सीपी राधाकृष्णन यांना जाहीर पाठिंबा

पुढील महिन्यात होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे. दरम्यान राधाकृष्णन यांना जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेस पक्षातील 11 खासदारांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सत्ताधारी आघाडीला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणडणुकीसाठी आता आणखीन बळकटी मिळाली आहे.

Heavy rain alert : रत्नागिरीत अतिवृष्टीचा इशारा; उद्या प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुट्टी

सध्या रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागाने कोकण विभागाला रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अतिवृष्टीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मंगळवारी (दि.19) सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

Chiplun politics News : कोकणातील शरद पवार गटाचे अस्तित्व धोक्यात? प्रशांत यादवांचा उद्या होणार भाजप प्रवेश

महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेकडून तळ कोकणात मोठ्या राजकीय हालचाली केल्या जात आहेत. भाजपसह शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करून घेतले जात आहेत. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला गळती लागली असून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे शरद पवार यांना जबर धक्का बसला असून शरद पवार गटाचे कोकणातील उरलेसुरले अस्तित्वही संपुष्टात आल्याची चर्चा सुरू आहे. हा पक्ष प्रवेश मंगळवारी (ता.19) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारमधील आमदारावर महिलेचा गंभीर आरोप; एफआयआर दाखल

उत्तर प्रदेशातील सत्ताधारी पक्षाचे आमदार भगवान शर्मा उर्फ गुड्डू पंडित यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी बेंगलुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांनी आमदाराविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.

धक्कादायक! साताऱ्यात रिक्षाचालकानं महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेलं 

साताऱ्यात रिक्षाचालकाने महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आहे. दारुच्या नशेत रिक्षा चालवत असलेल्या चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करताच त्याने महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेले. या घटनेत महिला पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात पावसाचा धुमाकुळ; 19 ऑगस्ट रोजी शाळांना सुट्टी जाहीर

पावसाने राज्यात धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत शाळा बंद असणार आहेत. मुंबईतील सध्याची पावसाची स्थिती पाहता मुंबई महापालिका परिक्षेत्रातील खासगी, विनाअनुदानित, खासगी अनुदानित अशा सर्वच प्रकारच्या माध्यमिक व प्राथमिक शाळांना 19 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्याचा पाऊस पाहता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता अनेक जिल्ह्यांत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याबाबत सरकारी आदेश निघाले आहेत.

'नियती कोणालाही सुटू देणार नाही. ही संघटीत गुन्हेगारी...'; धनंजय देशमुखांचं मोठं विधान

संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी आरोपीच्या वकिलांनी हे आरोपी कसे नाहीत आणि त्यांना जामीन का देण्यात यावा यावर युक्तिवाद केला. त्याला उज्वल निकमसाहेबांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पुढच्या तारखेत चार्ज फ्रेम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, नियती कोणालाही सुटू देणार नाही. ही संघटीत गुन्हेगारी आहे, असंही देशमुख यांनी यावेळी म्हटलं.

राज्यभर मुसळधार पावसाचा कहर; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य परिस्थिती, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

राज्यभरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय. मुंबई, कोकण आणि विदर्भात धुवाधार पावसाची संततधार सुरू असून मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. नवी मुंबई आणि ठाण्यातही पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिकच्या घाट परिसरासाठी सोमवार आणि मंगळवारी रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पावसामुळे नद्या तुडुंब भरून वाहत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Marathwada Rain : अतिवृष्टीने मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत – रस्ते, वस्ती जलमय

मराठवाड्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 107 जनावरं दगावली आहेत. 350 हून अधिक घरं-गोठ्यांची पडझड झाली. 698 गावांना फटका बसला असून 1.19 लाख शेतकरी बाधित, तर 1.11 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण 91.94 टक्के पाणीसाठा

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत सध्या 91.94 टक्के म्हणजेच 26.80 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच दिवशी 28.38 टीएमसी साठा होता. यंदा 2 टीएमसीने कमी पाणी असूनही साठा समाधानकारक आहे. धरणातून आतापर्यंत 12.84 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले गेले.

मुंबईत मुसळधार पाऊस कायम; ठाणे-नवी मुंबईतील शाळा 2 दिवस बंद

ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 18 आणि 19 ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नवी मुंबईतही शाळांना दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. प्रशासनाने पालक व विद्यार्थ्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले असून हवामान विभागाने पुढील पावसाचा इशारा दिला आहे.

19 तारखेलाही सावधान... महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट

महाराष्ट्रात आजपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. आज मुंबई, पुणे, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना उद्याही रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Rain : मुख्यमंत्री आपत्ती व्यवस्थापन विभागात

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झाले आहे. ते राज्यातील पावसाचा आढावा घेत आहेत. प्रामुख्याने मुंबई अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील शाळांना सुटी देण्यात आली असून रेल्वे तसेच विमानसेवेवरही विपरीत परिणाम झाला आहे.

Ashish shelar News : श्रीमंत प्रथम रघुजीराजे भोसले यांची तलवार महाराष्ट्रात

मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनवरुन निघालेली मराठा साम्राज्याच्या शौर्याची साक्ष देणारी श्रीमंत प्रथम रघुजीराजे भोसले यांची तलवार आता महाराष्ट्रात, मुंबईतील पु, लं. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रांगणात आलेली आहे. याचे आता दस्तावेजीकरण होईल. सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत या तलवारीच्या लोकार्पणाचा सोहळा होईल. त्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, शिवप्रेमींना दर्शनासाठी ही तलवार खुली होईल.

Maharashtra Rain : कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी सायं ४:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ६ इंचांवरून ३ फुटापर्यंत उघडून १९,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण २१,३०० क्युसेक विसर्ग सुरू होईल. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी.

Sanjay Shirsat News : शिरसाट यांच्याविरोधात मोर्चा 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नवी मुंबई परिसरातील गरीब आणि सामान्य आगरी समाजातील नागरिकांच्या घरांसाठीची सिडकोची सुमारे ५ हजार कोटी रुपये बाजारभाव असलेली १५ एकर जमीन मंत्री संजय शिरसाठ यांनी इंग्रजांना मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबाच्या वारसांच्या घशात घातली. याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी (दि. २० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता नवी मुंबई येथील सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांनी अधिकाधिक संख्येने यामध्ये सहभागी व्हावं, असं मी आवाहन करतो.

CP Radhakrishnan News : दिल्लीला रवाना

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. एनडीएकडे आवश्यक बहुमत असल्याने राधाकृष्णन यांची निवड निश्चित मानली जात आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच राधाकृष्णन आज दिल्लीला रवाना झाले. पुढील एक-दोन दिवसांत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

Mumbai rain live:  पावसाचा जोर वाढला, मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर 

मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांना दिला आहे. सकाळच्या सत्रात आलेल्या विद्यार्थ्यांना ही सुखरूप घरी सोडा, असे त्यांनी आदेशात म्हटलं आहे.

Nanded live: मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशी दगावल्या

मराठवाड्यातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावात पुर आला आहे. पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशी दगावल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पशु पालकांचं मोठं नुकसान झालं आहे. अजूनही मेलेल्या म्हशी या पाण्यातच आहेत. मूक्रमाबाद गावात सध्या पुरजन्य परिस्थिती असून सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

गणेश नाईकांचा जनता दरबार

पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भरणार आहे. नवी मुंबईत सोमवारी, 20 ऑगस्ट रोजी जव्हार आणि ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये 22 ऑगस्ट रोजी जनता दरबार होणार आहे.

Vice President News: इंडिया आघाडीच्या उमेदवार कोण?

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएने सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एनडीए उमेदवारासाठी विरोधकांचा पाठिंबा मिळावा यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन केला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएतर्फे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या देखरेखीखाली होणार आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निवडणूक प्रतिनिधी (एजंट) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय शिरसाट यांच्याकडून पाच हजार कोटीचा घोटाळा - रोहित पवार

संजय शिरसाट यांनी तब्बल पाच हजार कोटीची चार हजार एकर जमीन ते सिडकोचे अध्यक्ष असताना बिलवकर या कुटुंबाला दिली. ही एकप्रकारे भूमिपुत्रांच्या बाबतीतही गद्दारीच आहे. त्यामुळं बेकायदा पद्धतीने बिवलकर कुटुंबाला दिलेल्या या जमिनीसह राज्यातील अशा प्रकारच्या सर्वच जमिनी सरकारने परत घ्याव्यात आणि मंत्री संजय शिरसाठ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

इंडिया आघाडीचा उमेदवार आज ठरणार

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएने सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. इंडिया आघाडीकडून उमेदवार कोण असणार हे ठरवण्यासाठी आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

शिवसेनेचे लाडकी सून अभियान

आपल्या घरात जशी आपली लेक लाडकी असते तशीच सूनही लाडकी असायला हवी. तिला योग्य वागणूक देऊन सन्मानाने वागवायला हवे, आणि जे असे करणार नाहीत त्यांना आता शिवसेना महिला आघाडी योग्य पद्धतीने धडा शिकवणार आहे, असा इशारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन' हे अभियान हाती घेणार असल्याचे जाहीर केले.

सीसीटिव्हीवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण हास्यास्पद -आव्हाड

सीसीटिव्हीवर लावण्यावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण हास्यास्पद आहे.माझा मुख्य निवडणूक आयुक्तांना एक प्रश्न आहे, जर CCTV चे फुटेज सार्वजनिक करण्यास आपल्याला महिलांची प्रायव्हसी आडवी येत असेल तर,ते निवडणुकीच्या दिवशी घेताना तुम्ही त्या तमाम महिलांची परवानगी घेतली होती का..?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मराठा आरक्षणसाठी टोकाची भूमिका नको - गोपीचंद पडळकर

मराठा आरक्षणासंदर्भात टोकाची भूमिका घेऊ नये, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारने संवेदनशीलतेने 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, त्यांना कुणबी दाखले मिळाले आहेत. यापलीकडे टोकाची भूमिका मराठा समाजाच्या हिताची नाही.

Car Accident : संभाजीनगरमधील भीषण अपघात, मद्यधुंद कारचालकाने 6 जणांना उडवले

संभाजीनगरमध्ये रविवारी रात्री भीषण अपघात झाला. मद्यधुंद कारचालकाने 6 जणांना उडवले. या अपघातामध्ये एक महिला आणि मुलगी गंभीर जखमी आहेत. नागरिकांनी कारचालाकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कारचालकाचे नाव संकेत अंबोरे असे आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com