
महाराष्ट्रात पुन्हा एकदा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. ओबीसी संघटनांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. ओबीसी समाजाने ओबीसी आरक्षण बचावचा नारा देतानाच जालन्यातील अंतरवाली सराटी गावात हे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. येत्या 1 ऑगस्टपासून ओबीसी बांधव साखळी उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे, असल्याची माहितीही समोर आली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा आरक्षण आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणतात, यापेक्षा कायदा काय म्हणतो हे पाहावं असा सल्ला दिला आहे.तसेच त्यांनी पोलिसांनी आझाद मैदान यांनी सहा वाजल्यानंतर जरांगेंना अटक करून, माननीय मॅजिस्टेट यांच्यासमोर उभे करा,अशी मागणी केली आहे. कायद्यासमोर जरांगेला मोठं समजू नये,असंही त्यांनी म्हटलं.
कायद्यासमोर जरांगेला मोठं समजू नये. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जरांगे ऐकला नाही तर चुकीची प्रथा पडेल. नियम मोडले जातील. यामुळे आगामी काळातील आंदोलनांमध्येही नियम मोडण्याची प्रथा पडेल. हे कायद्याचं राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणातात यापेक्षा कायदा काय म्हणतो हे पाहून, वरिष्ठ पोलिस निरिक्षण आझाद मैदान यांनी सहा वाजल्यानंतर जरांगेला अटक करून, माननीय मॅजिस्टेट यांच्यासमोर उभे करा. कारण कायद्याची पायमल्ली महाराष्टाला परवडणारी नाहीये.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. अंबादास दानवे यांनी जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत दानवे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांचे जरांगे यांच्याशी बोलणं करून दिलं. यावेळी ठाकरेंनी मराठा बांंधवांना सोयीसुविधा पुरवण्याचं आवाहन केलं आहे.
गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर विविध ठिकाणी गणेश उत्सवात सहभागी झाले आहेत. छान! ऐन गणपतीच्या काळात लाखो मराठी बांधव त्यांच्या मागण्यांसाठी पाऊसचिखलात आंदोलन करीत आहेत, गृहमंत्री या जनता रूपी पांडुरंगाच्या भेटीला गेले असते तर बरे झाले असते! पण ते गेले नाहीत!
गुणरत्न सदावर्ते आज प्रचंड किंचाळत आहेत त्याकडे दुर्लक्ष करणे जास्त योग्य आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी पवार साहेबांच्या निवासस्थानी आंदोलक घुसले तेव्हा त्याचं समर्थन केलं होतं. हे तेच लोक आहेत ज्यांनी एसटी आंदोलनाच्या नावाखाली एसटी कर्मचाऱ्यांचे संसार उध्वस्त केले. अशा पॉलिटिकल मोटिवेटेड लोकांकडे दुर्लक्ष करणे जास्त चांगले.
गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यया अटकेची मागणी केली आहे. कायद्यासमोर जरांगेला मोठं समजू नये. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जरांगे ऐकला नाही तर चुकीची प्रथा पडेल. नियम मोडले जातील, यामुळे आगामी काळातील आंदोलनांमध्येही नियम मोडण्याची प्रथा पडेल. हे कायद्याचं राज्य आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणातात, यापेक्षा कायदा काय म्हणतो हे पाहून, वरिष्ठ पोलिस निरिक्षकांनी आझाद मैदानावर जाऊन सहा वाजल्यानंतर जरांगेला अटक करून, माननीय मॅजिस्टेट यांच्यासमोर उभे करावे. कारण कायद्याची पायमल्ली महाराष्टाला परवडणारी नाहीये, असेही सदावर्ते म्हणाले.
जरांगे यांचे जे मसिआ आहेत, त्यांना कधीही गणेशभक्त माफ करणार नाहीत. स्टेजवर जरांगे अर्वाच्य भाषेत बोलतात. काल स्टेजवर जरांगेंनी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरला. एका समाजाचा अपमान करण्याचा अधिकार त्याला आहे का? असा सवाल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. राज्यातील सर्व मराठा पुढारी गेमिंग करत आहेत का? मराठी नसलेला मुख्यमंत्री असला की मग चुळबूळ चुळबूळ करत आहेत. जरांगेंची भाषा माजुरडी असल्याची टीका सदावर्ते यांनी केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मराठा मोर्चा आणि आरक्षणाबद्दल सर्व स्पष्टीकरण एकनाथ शिंदेच देऊ शकतात, असे म्हटले आहे. यावर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणतेही खोटे आश्वासन दिले नाही. जे लिहून दिलं होतं त्याच्या आधारे मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. तसेच मराठा आरक्षणाच्या विषयावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर जे जे तोडगे काढता आले ते काढण्यात आले. पण नाईलाजाला कोणताच इलाज नसतो, असे म्हणत शिंदे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईतील आपला दोन दिवसीय दौरा आटोपल्यानंतर ते आज गुजरातला जाण्यासाठी निघाले असता, त्यांच्या सरकारी विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान घेऊन ते गुजरातला गेले. विमानात बिघाड असल्याचे समजताच एकनाथ शिंदेंनी आपले विमान शाह कुटुंबीयांसाठी देऊ केले. त्यानंतर, गृहमंत्री शाह हे एकनाथ शिंदेंच्या विमानाने गुजरातला रवाना झाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज माजी न्यायमूर्ती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. यावेळी सातारा आणि हैदराबाद गॅझिटियरच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली. तर शिंदे समितीकडून सहा महिन्यांचा वेळ मागितला. मात्र मराठा समाजाला कुणबी घोषित करा त्याशिवाय इथून उठणार नाही, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. तसेच हैदराबाद गॅझेटसंदर्भात तत्वत: मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे, अशी महत्वाची माहिती शिंदे समितीने दिली.
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा केल्यावर न्यायमूर्ती शिंदे आणि समितीमधील सदस्य पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यात माजी न्यायमूर्ती शिंदे व इतर सदस्य उपस्थित होते.
शिंदे समितीला चर्चेला पाठविणे हा विधानसभा आणि विधानपरिषदेचा अपमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायदेमंडळाचा अपमान करत आहेत. मराठा-कुणबी एकच असल्याचा जीआर काढणे हे सरकारचे काम आहे. पण सरकार शिंदे समितीला कारण नसताना पुढे करत आहे. शिंदे समितीचं काम गॅझेट करण्याचे आहे का? सरकारने आता वेळ न घालविता मराठा कुणबी एक असल्याचा जीआर काढावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
हैद्राबाद आणि सातारा संस्थानच्या गॅझेट जाहीर करण्याबाबत मी सरकारशी बोलतो. मुंबई, औंध नंतर बघण्यात येईल. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत कालावधी देण्यात यावा, अशी मागणी न्यायमूर्ती शिंदे यांनी केली. मात्र, त्यावर वेळ वाढवून देण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला. त्यामुळे जरांगे पाटील आणि शिंंदे समितीमधील बोलणी अयशस्वी ठरली आहे.
आम्ही शिंदे समितीवर खुश आहे. आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही. तुम्हाला आम्ही बोलत नाही. हे चबारे सांगतात तसं तुम्हाला बोलावं लागतं. अहवाल नसतानाही परवा २९ जातींना आरक्षण दिलं. येत्या शनिवारी आणि रविवारी हे झालं नाही तर राज्यातील एकही मराठा मुलाबाळांसह घरी राहणार नाही. शनिवारी आणि रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही. तुमच्या हातात आणखी सहा ते सात दिवस आहेत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
हैद्राबाद संस्थानचे कुणबी गॅझेट हेच मराठ्यांसाठी आहे. या गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा हे कुणबी आहेत. त्यामुळे त्यात तडजोड नाही. परवा २९ जातींना आरक्षणाचा लाभ देण्यात आला. त्याला कोणता आधार हेाता. शास्त्रशुद्ध पद्धतीने आम्हालाच पूजा करायला लावता आणि तुमची नुसती घंटी वाजवली तरी पुजा होते का, असा सवालही मनोज जरांगेंनी समितीला विचारला.
मराठा समाजाला कुणबी जाहीर केल्याशिवाय आता मी माघार नाही. आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही. हैदराबाद गॅझिटची अमलबजावणी करण्यात यावी, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण व इतर मुद्यांवर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे, कोकणचे विभागीय आयुक्त, समितीतील सदस्य सचिव हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी आझाद मैदानात जाऊन चर्चा करत आहेत. न्यायमूर्ती शिंदे व इतर सदस्य हे मराठा आरक्षणाबाबत सदस्य आणि सरकारची भूमिका काय आहे, हे पटवून देत आहेत.
मराठा आरक्षण व इतर मुद्यांवर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे, कोकणचे विभागीय आयुक्त, समितीतील सदस्य सचिव हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाणार आहेत. चर्चा झाल्यानंतर काही मुद्दे उपस्थित हेातील, त्यावर चर्चा होईल. मराठा आरक्षण उपसमितीची सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समिती आणि सरकार सकारात्मक आहे. आंदोलन शांतेत व्हावं, असं आमचं म्हणणं आहे, असेही मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
अमित शहा यांनी वर्षावर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याआधी सह्याद्री अतिथिगृहावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तासभर दोघांमध्ये चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर व मराठा आरक्षणावर चर्चा झाली का यासंदर्भात तर्क लावले जात आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. आरती केली. मुंख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन घेउन ते बैठकीला जाणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी आपल्या दरे गावात जाणार आहेत. शिंदे दुपारी मुंबईतून पुण्यामार्गे दरे येथे जाणार आहेत. दुपारी २.३० वाजता पुणे विमानतळावर येऊन साताऱ्याकडे रवाना होणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता ते दरे गावात पोहचतील.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पुण्यात दाखल झाले आहेत. पुणे विमान तळावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले. पुण्यातील प्रमुख गणेश मंडळाना नड्डा आज भेटी देणार आहेत. शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या गणपतींचे दर्शन घेणार आहे.
मराठ्यांना अन्न, पाणी मिळू देत नाही, मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना वेठीस धरू नका, असा इशारा मनोज जरांगेंचा यांनी दिला. शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केले. महापालिकेचा रस्ता रिकामा करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिला.
Manoj Jarange Patil live: ओबीसींची आरक्षण काढून आम्हाला नको,ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या, असे मनोज जरांगे म्हणाले. फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, आरक्षणाबाबत त्यांना राजकारण करायचे आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाली आहेत. मनोज जरांगे यांचे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत, उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलकांमुळे सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी आंदोलकांची आहे.
राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. यामुळे मराठा समाजाला सरकारकडून मोठा दिलासा मिळाल्याच पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. अशातच आता जरांगेंच्या मागण्यांमुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे ओबीसी महासंघाकडून आजपासून नागपुरात साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेडसह बहुतांश ठिकाणी दमदार पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात तीन दिवसाच्या पावसामुळे शेतीच प्रचंड नुकसान झाले आहे.
मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलन आणि राज्यात सुरू असलेला गणेशोत्सवामुळे सर्व पोलिसांच्या रजा तडकाफडकी रद्द करण्यात आल्या असून सुट्टीवर गेलेल्या सर्व पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तातडीने ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईतील मराठा आंदोलकांचा मुक्काम वाढला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबईतून माघारी जाणार नसल्याचं आंदोलकांनी ठरवलं आहे. मात्र, आझाद मैदानाच्या परिसरातील हॉटेल आणि जेवणाचे स्टॉल्स बंद असल्यामुळे मराठा आंदोलकांचे मोठे हाल होत आहेत. अशातच आता मराठा आंदोलकांनी मराठा बांधवांसाठी नाश्त्याची सोय केल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली. राज्यातील मराठा आरक्षणासह, बिहार निवडणुकी बाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबतची माहिती शहांनी जाणून घेतल्याचं सांगितलं जात आहे.
देशात पहिलं आरक्षण 50 टक्के दिले. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी माझा पहिल्या दिवसांपासून प्रयत्न आहे. माझा मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा आहे. सरकार आणि पाटील यांनी लवकर मार्ग काढावा ही विनंती, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील ज्या मैदानात आंदोलन करत आहेत. त्या आझाद मैदानात मागील काही तासांपासून पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मैदानात चिखल झाल्यामुळे मराठा आंदोलकांची गैरसोय झाली आहे. तर रात्री देखील थोडा पाऊस पडल्यामुळे शेकडो आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आसरा घेतल्याचं पाहायला मिळालं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.