Maha Vikas Aghadi Congress exit : 'स्थानिक'साठी काँग्रेस वेगळ्याच 'मूड'मध्ये..; 'मविआ'चं भवितव्य धोक्यात?
Congress local body elections Maharashtra : 'व्होट चोरी'च्या मुद्यानंतर काँग्रेसला देशाच्या राजकारणात चांगलीच संजीवनी मिळाली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद गेल्यापासून संघटनेवर अधिक भर दिला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांना समोरे जाण्यासाठी काँग्रेस वेगळ्याच भूमिकेत आहे. महाविकास आघाडीऐवजी काँग्रेस 'एकला चलो'च्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका म्हणजे, कार्यकर्ते तयार करण्याची संधी, त्यामुळे आघाडीत राहून मर्यादा स्वीकारण्यास काँग्रेस पक्षनेतृत्व तयार नाही.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे आमचे अंतिम लक्ष्य नाही. आमचा खरा फोकस 2029पर्यंत काँग्रेस (Congress) पक्ष अधिक मजबूत करण्यावर आहे. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे सूचक संकेत दिलेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी (MVA) एकसंध समोरे गेली. लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीला फायदा झाला. परंतु विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी थेट 50 जागांवर संपुष्टात आली. यानंतर महाविकास आघाडीमधील पक्षात राज्यात चांगलीच गळती लागली.
परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी दुभंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस वेगळी भूमिका घेण्याची तयारी करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हणजे, पक्षासाठी नवे नेतृत्व घडवण्याची संधी असते. ही संधी काँग्रेस सोडण्यास तयार नाही. यामुळे काँग्रेस पक्ष नेतृत्व आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वतंत्र लढवण्याच्या तयारी करत आहे.
आघाडीच्या राजकारणामुळे कोणत्याही पक्षाला मर्यादा पडतात. जागा देखील मर्यादित राहतात. परिणामी पक्ष वाढीला फटका बसतो. यामुळे देशातील सर्वांत जुन्या पक्षाला नवे नेतृत्व विकसित करण्याला मर्यादा येतात, असे काँग्रेस पक्ष नेतृत्वाने निरीक्षण नोंदवले आहे. पक्ष संघटना पुनरुज्जीवित करण्यासाठी नव्याना संधी देणे गरजेचे आहे. हे नवे चेहरे स्थानिक राजकारणात रुजवण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिकांच्या निवडणुका ही एक मोठी संधी असते. या वेळी ही संधी गमवायची नाही, असे प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने ठरवले आहे.
काँग्रेसने 357 पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी स्थापन केली असून, काम करण्याची क्षमता व निष्ठा असलेल्या पदाधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. काँग्रेसमध्ये सध्या जिल्हावार बैठकांचे सत्र सुरू असून, जिल्हा प्रभारी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत आहेत.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवून यश मिळाले, तरी अध्यक्ष आणि सभापती निवडीवेळी फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता अधिक आहे. सत्तास्थापनेच्या संघर्षात मित्रपक्षांतही स्पर्धा रंगू शकते. निवडणुका पार पडल्यानंतर मित्रपक्षांसोबत जाण्याचा मार्ग तसाही मोकळा असणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष संघटनेत आलेली मरगळ यानिमित्ताने झटकता येईल, तसेच पक्षाला स्वतंत्र अस्तित्व व राजकीय ताकद निर्माण करता येईल, याची आखणी काँग्रेस पक्षनेतृत्वाने केल्याचे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.