स्वातंत्र्यवीर सावकर यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. बदनामी खटल्यात उलट तपासणीसाठी पूर्ण संधी मिळावी, अशी विनंती राहुल गांधी यांच्यातर्फे त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली. आत्ता या प्रकरणी सुनावणी सात एप्रिलला होणार आहे.
दिशा सलयानी हत्या प्रकरणात दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणल्याचा आरोप देखील दिशाच्या वडिलांनी केला आहे.
सर्वसामान्य उमेदवार व दिव्यांग उमेदवाराच्या रूपात परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या संधी दिल्या जाऊ शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने भारतीय प्रशासनिक सेवेच्या माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला मंगळवारी सांगितले. परीक्षेत फसवणूक केल्याचा व चुकीच्या पद्धतीने ओबीसी तसेच दिव्यांग कोट्याचा लाभ उठवल्याचा खेडकरवर आरोप आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी केज न्यायालयात पार पडली होती. मात्र, आता न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणाची पुढील सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात पार पडणार आहे.
खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर हटवण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध केला असून, प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना तातडीने अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. औरंगजेबाची कबर हटवून मराठ्यांचा इतिहास पुसण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला. मागण्या मान्य न झाल्यास 21 मार्च रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन तर 24 मार्चला जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला.
हिंगोली जिल्ह्यात वाळू चोरांनी तलाठ्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी झाले असून, नागनाथ राऊत असे त्यांचे नाव आहे. तलाठी राऊत यांनी वाळू चोरांनी धरून ठेवत, पट्ट्याने मारहाण केली. जखमी तलाठी राऊत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वाळू चोरीचा प्रमाण वाढल आहे.
सर्वसामान्य उमेदवार व दिव्यांग उमेदवाराच्या रूपात परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या संधी दिल्या जाऊ शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने भारतीय प्रशासनिक सेवेच्या माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला मंगळवारी सांगितले आहे. परीक्षेत फसवणूक केल्याचा व चुकीच्या पद्धतीने ओबीसी तसेच दिव्यांग कोट्याचा लाभ उठवल्याचा खेडकरवर आरोप आहे. खेडकर यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 15 एप्रिलला निश्चित केली. त्यामुळे खेडकरला अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्याविरोधात ज्येष्ठ विधिज्ञ शेखर त्र्यंबकराव जोशी यांनी मंगळवारी तक्रार दाखल केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.
बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत जमावबंदीचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी काढला आहे. बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचे कार्यकर्त्यांचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ, तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे वंजारीविरुद्ध मराठा वाद होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार मोर्चे, निदर्शने, आंदोलने परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध असतील.
शालेय विद्यार्थ्यांची ने -आण करणारी बस अन् वाहने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित असतील याची संबंधित शाळेने दक्षता घेण्याच्या सूचना अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिल्या. पोलिस अधीक्षक कार्यालयात अहिल्यानगर जिल्ह्यातील शालेय बस सुरक्षितता अन् जिल्हा प्रवासी समन्वय समितीची बैठक झाली. महापालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आदी उपस्थित होते.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसायांना आर्थिक साहाय्य प्रदान करणे, त्यांच्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना 2015-16 मध्ये जाहीर केली. याअंतर्गत मागील 9 वर्षात राज्यातील 61 लाख 72 हजार जणांना कर्ज वाटप केले. त्यातील 10 लाख 29 हजार कर्जदारांनी तब्बल 5 हजार 668 कोटींचे कर्ज थकविले. या योजनेंतर्गत विनातारण कर्ज सुविधेचा या थकबाकीदारांनी गैरफायदा घेतल्याने बँकांचा एनपीए 12.20 टक्क्यांनी वाढला आहे. हे वास्तव राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून पुढे आले आहे.
नागपुरात १७ मार्चला आंदोलन केलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याचे समजते. पोलिसांनी यापूर्वीच हिंसाचारामागील मास्टरमाईंड असलेल्या फहीम खानसह ५१ जणांना अटक केली आहे. त्यापैकी २३ जणांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापदीपदी भाजप नेते शिवाजी चुंभळे यांच्या पत्नी कल्पना चुंभळे यांची वर्णी लागली आहे. देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर ही निवडणूक जाहीर झाली होती.
नागपूर दंगलीत झालेल्या हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विश्व हिंदू परिषदेचे कान टोचले आहे. संघ कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही, असे म्हणत कान टोचले आहेत.
नागपूरची दंगल कोणी पेटवली या प्रश्नाचे उत्तर स्वतः पोलिसांनीच दिले आहे. या मास्टरमाईंडचा फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. फहीम खान असे या संशयिताचे नाव आहे. दंगल उसळण्यापूर्वीच काही वेळ आधी तो पोलीस स्टेशनमध्ये आला होता, अशी माहिती आहे.
नागपूर : नागपूरच्या न्यायपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) सुलताना मैमुना यांच्या न्यायालयात औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या हिंसाचारावर मंगळवारी रात्री तब्बल तीन वाजेपर्यंत सुनावणी घेण्यात आली. यात न्यायालयाने चार आरोपींना न्यायालयीन कोठडी तर उर्वरित आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
नागपूर दंगलीवर गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले आहे. नागपूरात जे काही घडलं, त्यावर सरकारची भूमिका काय? पोलिसांच मनोबल कसं वाढवणार? या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले आहे. नागपूर दंगलीत ज्या व्यक्तीनी पोलिसांना मारहाण केली, दगडफेक केली, त्यांना पोलिसांचा धाक काय असतो, हे 100 टक्के दाखवणार, असे योगेश कदम यांनी सांगितले. "कायदा हातात घेऊन अशी कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही. पोलिसांचं मनोबल कमी होता कामा नये. ही आमची जबाबदारी आहे," असे ते म्हणाले.
राज्यात औरंगजेब हा सध्या वादाचा विषय असताना भंडाऱ्यातील एका तरुणाला औरंग्याचे स्टेटस् ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. त्याा भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत भंडाऱ्यातील हिंदू संघटनांनी पोलिसाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पुण्यातील हिंजवडीत टेम्पो जळून खाक झाल्याने टेम्पोतील चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हे चारही जण कंपनीचे कर्मचारी होते. हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
देशमुख हत्या प्रकरणाच्या मास्टरमाईंडचा अद्यापही ठावठिकाणी नाही Beed: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याला पकडण्यास पोलिसांना अपयश आले आहे. 98 दिवसांपासून त्याचा ठावठिकाणा नाही. कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याची चर्चा दोन दिवसापूर्वी होती.
राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपने तीन, शिवसेना एक आणि अजित पवार गटाने एक उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एका विधानपरिषदेच्या जागेसाठी तब्बल ७५ हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते. तर झीशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील, अमरसिंह पंडित, आनंद परांजपे, सुरेश बिराजदार, दिपक मानकर, सुनील टिंगरे या महत्वाच्या स्थानिक नेत्यांनी विधानपरिषदेच्या जागेवर दावा ठोकला होता. मात्र अजित पवार यांनी संजय खोडके यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. यामुळे पक्षामधील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा सुरू असून एकाच घरात दोन आमदारकी देऊन काय फायदा? असा सवाल आता सर्व इच्छुक करताना दिसत आहेत.
नागपुरात झालेल्या दंगलीनंतर विधीमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होती. त्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणाऱ्या राजकारणी ही कीड असून राज्यात हेच द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत. अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये, असे म्हटलं आहे.
नागपूर येथे झालेला हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन देताना स्पष्ट केलं आहे. पण हा हिंसाचार मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी नितेश राणे यांना शांत राहण्याचा सल्ला देत कान टोचल्याचे चर्चा सुरू आहे. अशातच त्यांनी, आपण मुख्यमंत्र्यांचे लाडके असून ते कशाला तंबी देतील? मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांची एक यादी आहे त्यामध्ये माझं नाव आहे. त्यामुळे कुणाला चिंता करण्याची गरज नाही, अशी स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर सांगली व मिरज शहरांमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून मिरजेत राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.
नागपूरच्या काही भागात सोमवारी (ता.19) रात्रीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली असून सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत लागू असणारी संचारबंदी उठवण्याचा नागपूर पोलिसांचा सध्या कोणताही विचार नाही. त्यामुळे ही संचारबंदी अनिश्चित कालासाठी लागू असणार आहे.
मागील दोन महिन्यांपासून राजपत्रित पूर्व परीक्षेच्या जाहिरातीची वाट पाहणाऱ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली असून 385 जागांसाठी जाहिरात काढली आहे.
नागपूरच्या हंसापुरी भागात सोमवारी (ता.17) रात्री हिंसाचार उसळल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण मंगळवारी (ता.18) रात्री 11 वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा काही काळ तणाव निर्माण झाला होता. संचारबंदी असताना एका इसमाने आपले दुकान उघडल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलीसांनी वेळीच हस्तेक्षेप करत गर्दीला पांगवाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानातून पृथ्वीवर सुखरूप परतले. बुधवारी (ता.19) भारतीय वेळेनुसार पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर किनारपट्टीवर त्यांच्या यानाचे स्प्लॅशडाउन झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.