

मुख्यमंत्री फडणवीस सांगतात, महाराष्ट्राची इकॉनॉमी तीन ट्रिलियन करणार. पण पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दोन लाख कोटी रुपये राज्यावर कर्ज होतं. आता राज्यावर 11 लाख कोटी रुपयांचं कर्ज झालं आहे. कुठे चाललोय आपण? असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी विचारला.
मनसेच्या 20 व्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आपल्याला आज या करमणुकीच्या गटारगंगेत गुंतवून ठेवलं जात आहे. आयपीएल, कुठले तरी पिक्चर आणि इतर माध्यमातून गुंतवून ठेवलं जातंय. त्यामुळे पहिल्यांदा इन्स्टाग्राममधून बाहेर पडा. तुम्ही गुंतवून राहिला तर सरकारला प्रश्न विचारू नये यासाठी हे सगळं आखलेलं आहे. हे फक्त भारतात नव्हे तर जगभरात सुरू आहे. सर्वसामान्य माणसांनी मोबाईलमध्ये, करमणुकीमध्ये अडकून राहावं, मग कुणीही विचार करणार नाही.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मनेकडून मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवर 'गुढीपाडवा मेळावा' आयोजत करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अमेरिका-इस्राइल विरूद्ध इराणमधील युद्ध कधी संपेल? याबाबत अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, जोपर्यंत अमेरिकेची उद्दिष्ट्ये साध्य होत नाहीत, तोपर्यंत अमेरिका आपली ही मोहीम सुरूच ठेवेल, असं म्हटलं आहे.
शिवसेनेचे नेते माजी मंत्री आमदार प्रा. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सांवत यांच्या कारला पुणे-सोलापूर महामार्गावर एका कंटेनरने धडक दिली आहे. गुरुवारी (ता. 18) मध्यरात्री हा अपघात झाला. यात धनंजय सावंत यांच्यासह कारचा चालक, सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले आहेत.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या रत्नागिरी येथील वडिलोपार्जित जमिनीचा व्यवहार झाला आहे. या जमिनींचा लिलाव वारंवार करण्यात आला होता. पण या जमिनीची खरेदी करण्यासाठी कुणीही तयार नव्हतं. आता अखेर दाऊदची वडिलोपार्जित जमीन विकली जाणार आहे. केंद्र सरकारने हा लिलाव आयोजित केला होता. केंद्र सरकारने स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स फॉरफीचर ऑफ प्रॉपर्टी कायदा अर्थात (SAFEMA ) च्या अंतर्गत हे भूखंड जप्त केले होते.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी करूणा मुंडेंनी केली आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तींशी संबंध ठेवणे आणि त्याच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे हे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला शोभणारे नसून त्यांचा राजीनामा घेतला नाही तर आपण मंत्रालयाच्यासमोर उपोषणाला बसणार असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.
तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात या भोंदूबाबाला बलात्काराच्या गुन्ह्यात नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या भोंदूबाबाची पाद्यपूजा केल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे व्हिडिओ समोर आल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. कारण विरोधकांसह राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, अशातच आता राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकरांची पाठराखण केली आहे. या सर्व प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा काहीही दोष नाही, त्या स्वतःहून गेलेल्या नाहीत तर कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या गेल्या असतील आणि त्यावेळी महाराजाचं दर्शन झालं असेल किंवा त्या भेटल्या असतील. कारण आपण कोणाला तरी गुरू मानतो, यामध्ये रूपाली चाकणकर यांची चूक नाही, असं भरणे यांनी म्हटलं आहे.
स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात यांच्या बलात्कार आणि महिलांचे लैंगिक शोषण प्रकरण आता तीव्र झाले आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर होणाऱ्या टीकेला संभाजी राजे छत्रपती यांनी साथ दिली आहे. संभाजी राजे छत्रपती यांनी कॅप्टन खरात प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जर रूपाली चाकणकर स्वतःहून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसतील, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब बडतर्फ कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भोंदू मांत्रिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात राज्य सरकार आधीपासूनच सतर्क असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन आठवड्यापूर्वीच लक्ष घातलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली होती अशी माहिती आता समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच या प्रकरणात लक्ष घातलं होतं आणि पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस महासंचालकांशी थेट संपर्क साधत आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश दिल्याचं समजते.
नाशिकमधील कॅप्टन खरात याच्यावरच्या बलात्कार आणि फसवणुकीच्या प्रकरणात नवे खुलासे होत आहेत. अनेक महिलांचे शोषण केल्याचा आरोप असताना, त्याच्या कार्यालयातील व्यक्तीचाही यात समावेश असल्याचे समोर आले. एका महिलेला डीपफेक व मॉर्फ व्हिडिओ पाठवल्याचा आरोप आहे. शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता SIT तपास करणार आहे.
भिवंडीतील वंडी-ठाणे रस्त्यावरील कशेळी खाडी परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये मोठी आग लागली. या आगीत सुमारे 15 दुकाने जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
खरात प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी धडाकेबाज IPS अधिकाऱ्याकडे देण्यातआली आहे.कॅप्टन खरात प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकराने SIT स्थापन केली आहे. या पथकाच्या प्रमुख म्हणून IPS तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी सातपुते यांनी सातारा, सोलापूरचे पोलीस अधिक्षक म्हणून काम केले आहे. सातपुते यांच्याकडे फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचाही तपास देण्यात आला होता.
पुणे महानगरपालिकेतील कचरा व्यवस्थापन प्रकल्प भ्रष्टाचाराचे केंद्र बनला असून, भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या नातेवाईकांच्या 'भूमी ग्रीन' कंपनीला विना निविदा मोठा ठेका देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हस्तक्षेप केल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
रुपाली चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करतील, 58 व्हिडीओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार, असे आरोप रुपाली पाटलांनी केले आहे. अशोक खरात प्रकरणात चाकणकर यांची खरातला मदत होऊ शकते. तसेच त्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारींकडे चाकणकरांनी दुर्लक्ष केल्याचेही पाटील म्हणाल्या.
महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात सरकारने IPS तेजस्वी पाचपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली आहे. दरम्यान, पोलिसांनी अशोक खरातच्या घराची झाडाझडती घेतली तसेच एक पिस्तुल जप्त केले आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांनी सोने चांदी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. पण आज सोने-चांदीमध्ये चार हजार रुपयाची घसरण झाली असून सोन्याचा दर हा जीएसटीसह 1 लाख 58 हजार 620 रुपये इतका आहे. तर चांदीचे भाव हा (1 किलो) 2 लाख 58 हजार रुपयांवर आहेत. सोन्या चांदीच्या दरात चार हजार रुपयाची घसरण झाली आहे. घसरलेले दर ग्राहकांसाठी चांगली संधी असून आज गुढीपाडव्याचा मुहूर्तावर ग्राहकांनी सोने चांदी खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केली आहे.
गुढीपाडव्या निमित्ताने वाशीतील एपीएमसी मार्केट मध्ये कोकणातील १० हजार हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याचे पुजन करण्यात आले. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी , रायगड जिल्ह्यातून हापूस आंबा आला आहे. अवकाळी पडलेल्या पावसामुळे कोकणात हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या उत्पादनापैकी फक्त २५ टक्के आंबा यावर्षी पिकला गेला आहे. मागील वर्षी गुढीपाडव्याला २५ हजार पेटी आवक झाली होती. यावर्षी ती फक्त १० हजार पेट्यांवर आली आहे. त्यामुळे हापूस आंब्याची किंमत गगनाला भिडली आहे.
आज गुढीपाडवा हिंदू नववर्षाची सुरुवात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर भावपूर्ण पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मागील काही वर्षांतील अजित पवारयांच्यासोबत साजऱ्या केलेल्या गुढीपाडव्याचे फोटो पोस्ट करत , दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता संपूर्ण जगावर होत असून याचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. एकीकडे आखाती देशांत सुरू असलेल्या या संघर्षामुळे भारताच्या कच्चे तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होताना दिसत आहे. यादरम्यान इस्रायलने इराणच्या 'साउथ पार्स' गॅस क्षेत्रावर हल्ला केल्यानंतर हा संघर्ष आणखीन चिघळला आहे. इराणने केवळ अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य न करता आता आपला मोर्चा तेल आणि गॅस पायाभूत सुविधांकडे वळत जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्याला उत्तर देताना इराणने कतारच्या 'रास लाफान इंडस्ट्रियल सिटी'मधील एका प्रमुख गॅस प्रकल्पावर क्षेपणास्त्र डागले आहे. या हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅसच्या किमती वाढण्याचा धोका वाढला असून याचा थेट भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण भारत आपल्या एकूण गॅस गरजे पैकी सुमारे 47 टक्के गॅस कतारकडून आयात करतो.
तळेगाव शहरात एका लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे तळेगाव पोलीसांच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुषार दळवी हा लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी दुपारी आपल्या मित्रांसोबत दुचाकीवर ट्रिपल सीट जात असताना पोलिसांनी त्याला अडवले. त्यावेळी तुषारने आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य करत, “जेवढा दंड असेल तो गाडीवर टाका,” असे पोलिसांना सांगितल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी शिवीगाळ केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे.
आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये स्वयंपाकासाठी लागणारा गॅस मिळत नसल्याचे उघड झाले आहे. या युद्धाची झळ आता शिर्डीला जाणाऱ्या पायी पालखीला पदयात्रेला बसली असून चूल पेटवून जेवण बनवण्याची वेळ आली आहे.
सांगलीच्या पलूसमधील शिक्षण संस्था चालकाचा खून केल्याची घटना घडली आहे. संजय प्रभाकर परांजपे यांचा धारदार हत्यारांनी हल्ला करून निर्घृणपणे खून करण्यात आला. संजय परांजपे हे विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते. तसेच परांजपे यांचा नोंदणीकृत खासगी सावकारीचा व्यवसाय आहे. संजय परांजपे हे काल रात्री पलूस मधीलच एका मंदिरात गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करून पलायन केले.
छत्रपती संभाजी नगरला काल रात्री उशिरा पावसाने झोडपले. शहरासह ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये सिल्लोड, कन्नड तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट होऊन गहू, हरभरा, ज्वारी यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले.
अकोला शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरातून या महारॅलीला सुरुवात करण्यात आली. पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या वातावरणात रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत आहे.
राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट व वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या या संदेशात म्हटले आहे की,' नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा- आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण करणारे ठरावे. नवसंकल्पना साकार व्हाव्यात यासाठी ऊर्जा देणारे ठरावे त्यासाठी सर्वांना निरामय आरोग्य लाभो, हीच प्रार्थना. यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा... मराठीची गुढी आणखी उंच उभी करण्याचा निर्धार करुया !'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.