Maharashtra Politics Live Update : NCP SP पुणे जिल्हा अध्यक्षांच्या जमीन खरेदीची चौकशी करा : प्रभाकर बांगर

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यासह देशातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on
Updated on

नाना पटोले यांच्या पद्यपूजेवरून राजकारण; भाजपच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या पद्यपूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना नांदेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

माध्यमांशी बोलताना काँग्रेस कार्यकर्ते अनिल पाटील यांनी सांगितले की, गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाना पटोले हे त्यांच्या गुरूंना भेटण्यासाठी रत्नागिरी येथे गेले होते. आम्हीही त्यांना समाजकार्यातील गुरु मानतो. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांची पद्यपूजा करून दुधाने पाय धुतले. यात गैर काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, "भारतीय जनता पक्षाला आम्हाला हिंदू संस्कृती किंवा हिंदुत्व शिकवण्याचा नैतिक अधिकार नाही," असेही अनिल पाटील यांनी म्हटले.

NCP SP पुणे जिल्हा अध्यक्षांच्या जमीन खरेदीची चौकशी करा : प्रभाकर बांगर

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अवघ्या महिनाभरात आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे साडेपाच एकर शेतजमीन खरेदी केल्याचा दावा करत, या व्यवहाराची आयकर विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली आहे.

नालासोपाऱ्यात १७ हेल्थ क्लेमद्वारे विमा कंपनीची फसवणूक गॅलेक्सी हॉस्पीटलमध्ये विमा घोटाळा, दोन डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा

नालासोपारा पूर्व येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांसह चार जणांविरोधात तब्बल १० लाख २१ हजार ९२० रुपयांच्या विमा घोटाळ्याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बनावट वैद्यकीय कागदपत्रे, बोगस स्वाक्षऱ्या आणि उपचार न झालेल्या रुग्णांच्या नावावर हेल्थ इन्शुरन्सचे दावे सादर करून बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेडची फसवणूक केल्याप्रकरणी या चौघांवर करण्यात आला आहे.

संजय राऊतांचे वय झाले, 'साठी बुद्धी नाठी': सातारा सांगलीचे विधान परिषद आमदार धैर्यशील कदम यांची टीका

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेला भाजप आमदार धैर्यशील कदम यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी वापरलेली भाषा अत्यंत अश्लील आणि अशोभनीय असून, भाजप व सातारा जिल्ह्याच्या वतीने त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. "राऊतांचे वय ६५ झाले असून 'साठी बुद्धी नाठी' याप्रमाणे त्यांना काय बोलावे हे समजेनासे झाले आहे," असा घणाघाती टोला कदम यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरेंनी दिलेली शिवसेना संपवण्याची जबाबदारी राऊतांनी तंतोतंत पार पाडली, अशी टीका करत त्यांनी यापुढे राऊतांनी अशी बालिश वक्तव्ये करणे थांबवावे असा सल्लाही दिला.

कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये कुरघोडी सुरूच, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कल्याण डोंबिवलीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे सेनेत यांच्यातील अंतर्गत वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अर्चित खडकूल यांनी आपल्या जुन्या पक्षावर गंभीर आरोप केले.

शिवसेनेत आम्हाला योग्य वेळी पद देण्यात आले नाही. पक्षासाठी काम करूनही आम्हाला सातत्याने डावलण्यात आले. एवढेच नाही, तर आमच्या एका पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने बैठकीतून हाकलून लावले. त्यामुळे आम्ही नाराज होतो आणि अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप खडकूल यांनी केला.

'आधी मोजणी, मग नोंदणी, नंतर फेरफार' : नवा लँड टायटलिंग कायदा आणणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

रत्नागिरीत 'महाराजस्व अभियान समाधान शिबिरा'त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली असून जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार डिसेंबरच्या अधिवेशनात 'आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार' असा नवीन ‘लँड टायटलिंग कायदा’ आणणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, कुळ, वहिवाटदार आणि देवस्थानांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी 'देवस्थान जमीन इनाम कायदा' लवकरच आणला जाईल, असेही ते म्हणाले.

सात दिवसांत प्रकरणे निकाली काढा : बावनकुळे यांचे कडक आदेश

महसुली प्रकरणांचा आढावा घेताना महसूलमंत्री श्री. बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. कलम १५५ नुसार एकूण ४ हजार ६२८ प्रकरणे असून, तपासण्यात आलेल्या १ हजार २३५ प्रकरणांपैकी ५३ प्रकरणे दोषी आढळली आहेत. यातील चुका तातडीने दुरुस्त कराव्यात आणि कलम १५५ ची प्रकरणे सात दिवसांच्या आत निकाली काढावीत, असे कडक आदेश त्यांनी दिले. तसेच अकृषक (NA) परवानगीची १ हजार ३६ प्रकरणे प्राप्त असून त्यातील १५० वर सुनावणी सुरू आहे, ती गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 'वर्ग २' मधून 'वर्ग १' मध्ये जमिनी करण्यासाठी १५ हजार पैकी केवळ १० जमिनींचीच प्रक्रिया पूर्ण झाल्याने याबाबत गती वाढवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच २१ हजार ४२३ 'जिवंत सातबारा' प्रकरणांचाही आढावा घेण्यात आला.

महसुली प्रकरणांतील चुका तातडीने दुरुस्त करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा : बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रलंबित महसुली प्रकरणे वेळेत मार्गी लावा. तसेच कलम १५५, ७० ब आणि ८५ अंतर्गत झालेल्या चुका तातडीने दुरुस्त करा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा कडक इशारा देतानाच प्रवास, संवाद यावर भर देवून जनतेची काळजी घ्या. भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी, लोकाभिमुख, गतीमान कारभार हवा. महाराष्ट्रात सर्वात चांगला आणि प्रथम क्रमाकांचा जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची मला घोषणा करता आली पाहिजे, असे कामकाज करा असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. जिल्हा नियोजन सभागृहात आज महसूल आढावा बैठकीत ते बोलत होते.

Pune Police : पुणे पोलीस आयुक्तांसह 12 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोटीस

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची भररस्त्यात धिंड काढणे, त्याला उठाबशा काढायला लावणे आणि नागरिकांसमोर माफी मागण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. पुणे पोलीस आयुक्तांसह १२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानवाधिकार संरक्षण कायद्यातील कलम १६ अंतर्गत नोटीस बजावण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

Devdatt nikam : आयकर विभागाकडे तक्रार करणार

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अवघ्या महिनाभरात आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे साडेपाच एकर शेतजमीन खरेदी केल्याचा दावा करत, या व्यवहाराची आयकर विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली आहे.

Ambadas Danve : पालकमंत्री पदासाठी रायगडची विधान परिषदेची जागा तटकरेंना सोडली

भरत गोगावले यांच्याबद्दल बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटले की, खर तर ते पालकमंत्री होण्यासाठी इतके आतुर आहेत. त्यांची जास्त संख्या असणारी सीट सुद्धा पालकमंत्री पदासाठी तटकरेंना सोडली. ते इलेक्शन होऊनही दोन अडीच महिने झाले. मात्र, गोगावल्यांची इच्छा काही पूर्ण होत नाही. म्हणून अशा गोष्टी त्यांना बोलाव्या लागतील. राजीनामा देणे मात्र कोणता मंत्री काय राजीनामा देत नाही.

माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल : बाळासाहेब फडणवीस

माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित देवाभाऊ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते पुण्यात बोलत होते.

माझा पुतण्या लॉ मध्ये गोल्ड मेडलिस्ट असून त्याच्याकडे उत्कृष्ट वक्तृत्व होत, त्यामुळे तो राजकारणात येईल असं मला वाटलं होतं. जीवनात कलाटणी मिळते, त्यानुसार तो नागपूरमधील एका प्रसिद्ध वकिलांकडे काम करत होता. त्यानंतर तो जनसंघात गेला. माझा हा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं मला वाटतं असं वक्तव्य बाळासाहेब फडणवीस यांनी आज पुण्यात बोलताना केलं.

मुंबई–नाशिक–आग्रा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; माणिकखांब ते गोंदेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

इगतपुरी परिसरातील मुंबई–नाशिक–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणिकखांब ते गोंदे औद्योगिक वसाहतीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, गेल्या तासाभरापासून वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

सततचा पाऊस, रस्त्यांवरील खड्डे आणि सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यातच रविवार आणि वीकेंडमुळे नाशिक, इगतपुरी आणि आसपासच्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली आहे.वाहतूक कोंडीमुळे शेकडो वाहनचालक आणि पर्यटक महामार्गावर अडकून पडले असून, प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान, महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कल्याण डोंबिवलीमधील 60 नगरसेवकांचे प्रशिक्षण शिबिर; शिंदे पिता-पुत्र राहणार उपस्थित

कल्याण-डोंबिवली महापालिकेत निवडून आलेल्या शिवसेना-मनसे शिवआघाडीच्या एकूण 60 नगरसेवकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर भाईंदरमधील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे होणार आहे.

या शिबिरात नवनिर्वाचित तसेच विद्यमान नगरसेवकांना महापालिकेचा कारभार, अर्थसंकल्प, महासभेचे कामकाज, अर्थसंकल्पातील तरतुदी, सभाशास्त्र तसेच लोकप्रतिनिधी म्हणून प्रभावीपणे काम करण्याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. अशी माहिती केडीएमसीतील शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे यांनी दिली. या प्रशिक्षण शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेही नगरसेवकांना मार्गदर्शन करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

बसवराज पाटलांचा सत्कार : ओमराजे निंबाळकरांना रेड कार्पेरेट, राणा पाटलांना डावललं?

भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याविरोधात एल्गार पुकारला आहे. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमातून आमदार राणाजगजितसिंह पाटलांना पूर्णपणे वगळण्यात आले आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना या कार्यक्रमात मानाचे स्थान देण्यात आले. इतकेच नाही तर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर आणि बॅनरवरही राणाजगजितसिंह पाटलांना डावलण्यात आल्यामुळे धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात मी उद्धव ठाकरेंना दोष देत नाही; त्यावेळी कोविड काळ होता : चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या महापौर झाले आहेत. राज्य महापौर परिषदेचे देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष होते. माझं आज ब्लड टेस्ट होते, मात्र मी कार्यक्रमाला आलो. राजकीय नेत्याने उशिरा जायचं असतं, त्यावेळीच त्याचे राजकीय वजन वाढते.देवेंद्र फडणवीस यांना दैवशक्ती मिळाली आहे. सर्व बाबतीत ते सर्वगुणसंपन्न आहेत, देवाभाऊ पुस्तक प्रकाशन भाषणावेळी चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले आहे.

मी असा एक मुख्यमंत्री पाहिला ते पेन काढायचे आणि निवेदनावर खुणा करायचे, असे अनेकांना म्हणजे ९९ जनांना करायाचे आणि सांगतो म्हण्याचे? मुख्यमंत्री नाव घेणं चंद्रकांत पाटील यांनी टाळलं. मात्र, देवेंद्र फडणवीस हे पेन काढून 60 कोटी निधींच्या पॅसेजवर सही करतात, असेही त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे चार वाजता प्रेस कॉन्फरन्स कर्जमाफीसाठी घ्यायला लावली होती. मराठा आरक्षण संदर्भात किती मुख्यमंत्री होऊन गेले. सामान्य माणसाची परिस्थिती सुधारली, असं काम त्यांनी केलं का. मतं मिळविण्यासाठी मराठा आरक्षण दिलं नाही तर समाजाचे कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी काम केलं

मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास केला म्हणून आरक्षण टिकलं. मात्र, मी उद्धव ठाकरे यांना मी दोष देत नाही. कोविड काळ होता, त्यामुळे सर्वोच न्यायालयात आरक्षण टिकलं नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

कोहिनूर दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई; केअर टेकर अमृत निषादला 5 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटना प्रकरणात भोईवाडा पोलिसांनी केअर टेकर अमृतलाल निषाद याला अटक केली आहे. इमारत मालकाकडे वसुलीचे काम करणाऱ्या अमृत निषादने दुरुस्तीसाठी फ्लॅटधारकांकडून प्रत्येकी 10 हजार रुपये जमा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने अमृत निषादला 5 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुण्यातील ‘त्या’ भाजप नगरसेविकेविरोधात RPIचे आंदोलन

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून पाद्यपूजन करून घेण्याच्या प्रकाराविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, पुणे शहर यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अप्पर बिबवेवाडी येथील संविधान चौक येथे जोडेमारो आंदोलन करून कार्यकर्त्यांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून पाद्यपूजन करून घेण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर याचे पडसाद उमटले. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी संविधान चौकात नागरिक आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. आंदोलनादरम्यान संबंधित लोकप्रतिनिधी वर्षा साठे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित लोकप्रतिनिधी वर्षा साठे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी या वेळी केली. लोकशाही मार्गाने आणि शांततापूर्ण वातावरणात हे आंदोलन पार पडले.

महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी

केंद्र सरकारने सर्व राज्यांना १ लाख ९ हजार कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रीम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार, महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारने ही रक्कम १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त वितरित केली आहे.

Congress news : दिल्लीवाऱ्या करण्याऐवजी जनतेला न्याय द्या!

मुंबई म्हाडा गृहनिर्माण सोडतीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सुरुवातीला ३० एप्रिल होती. त्यानंतर ती प्रथम १४ मे आणि नंतर पुन्हा २९ मे पर्यंत वाढविण्यात आली. सुरुवातीला सोडतीची तारीख १५ मे जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांना घर मिळणार नाही, त्यांच्या अनामत (डिपॉझिट) रकमेचा परतावा साधारण २० ते २५ मे दरम्यान मिळेल, अशी अर्जदारांची अपेक्षा होती. मात्र, आज तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही म्हाडाने अद्याप सोडतीची तारीख जाहीर केलेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण विभागाचे संचालन आहे. सातत्याने दिल्लीवाऱ्या करण्याऐवजी विभागाकडे लक्ष देऊन जनतेला न्याय द्यावा, असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

Nashik News : महाजनांकडून नाशिकमधील रस्त्यांची पाहणी

नाशिकमधील खड्डेमय रस्त्यांचा मुद्दा चांगलाच तापला असून खड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. यापार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील रस्त्यांची आज पाहणी केली. नाशिककरांना पुढील तीन ते चार महिन्यांत सर्व रस्ते सिमेंट-काँक्रीटचे पाहायला मिळतील, असे त्यांनी सांगितले.

Nana Patole Video नाना पटोलेंचा पाय दुधाने धुतल्याचा VIDEO व्हायरल!

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये काही कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाय दुधाने धुताना दिसत आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांनी आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

गणेश नाईकांचा शिंदेंच्या क्लस्टर योजनेवर आक्षेप!

वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर पुनर्विकास योजनेवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. अतिधोकादायक नसलेल्या तसेच 30 वर्षे पूर्ण न झालेल्या इमारतींनाही क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे रहिवाशांच्या हितावर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष इशाराही दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

‘माझ्या नादाला लागला तर जागा दाखवीन’; गणेश नाईकांचे शिंदेंना पुन्हा आव्हान

वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अतिधोकादायक नसलेल्या तसेच ३० वर्षे पूर्ण न झालेल्या इमारतींनाही क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. नव्या यूडीसीपीआरमुळे नवी मुंबईतील एफएसआय वाढल्यास शहराच्या नियोजनावर गंभीर परिणाम होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. यावेळी “गणेश नाईकच्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेऊ देणार नाही,” असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला.

फडणवीस केंद्रात जाणार? राऊतांचा दावा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रात जाण्याबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. देशात उत्तम शिक्षणमंत्री देवेंद्र फडणवीसच होऊ शकतात, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी चर्चा करून केंद्रात मनुष्यबळ मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश दिल्याचा दावा राऊत यांनी केला. दरम्यान, या वक्तव्यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या राजकीय वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar : 'सामना' हा वैचारिक नव्हे, तर 'फेकू पेपर' झाला आहे - संजय शिरसाट

सामना' हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वृत्तपत्र आहे. त्यात मनाला वाटेल ते लिहिले जाते.""कोणाला काय स्वप्न पडतात, काहीतरी अंदाज बांधून बातम्या लिहिल्या जातात."अशा बकवास बातम्यांमुळे 'सामना'चा खप मर्यादित राहिला आहे." -"भविष्य सांगण्यासाठी त्यांना कोणी नेमलेले नाही. आम्ही त्यांच्या बातम्यांकडे लक्ष देत नाही असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

CJP : महाराष्ट्रातील ड्रग्स इन्स्पेक्टर आणि टीईटी पेपर घोटाळ्यावर कॉकरोच पार्टी आंदोलनाच्या तयारी

अभिजीत दिपके पुढील आठवड्यात पुण्यातील आंदोलनात सहभागी संयोजकांची बैठक घेण्याची शक्यता

पुण्यातील कॉकरोच पार्टीच्या कार्यकर्त्याने घेतली संभाजीनगर मध्ये अभिजीत दीपके यांची भेट

संपूर्ण आंदोलनात ज्याने ज्याने मदत केली आहे त्या सर्वांचा मीट अप कार्यक्रम होणार

महाराष्ट्रातील ड्रग्स इन्स्पेक्टर आणि टीईटी पेपर घोटाळ्यावर कॉकरोच पार्टी आंदोलनाच्या तयारी

महाराष्ट्रातील पेपर फुटी घोटाळ्यावर प्राथमिक चर्चा असून आंदोलनाची दिशा पुढील आठवड्यात ठरणार

BJP Vs ShivsenaUBT : पंढरपुरात संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

सोलापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. पंढरपूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय राऊत यांच्या प्रतिमेला चपला मारण्याचे आंदोलन केले. संजय राऊत यांची प्रतिमा भाजपा कार्यकर्त्यांनी पायदळी तुडवून त्यांचा निषेध नोंदवला.

Nandurbar BJP : भाजपचे पूर्व नेते विजय चौधरी यांच्याविरोधात गुजर समाज आक्रमक; मूक मोर्चा काढून निषेध

भाजपचे पूर्व नेते विजय चौधरी यांनी महिलांना अपशब्द वापरल्यावरून गुजर समाजात आक्रमक झाला आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. पाटीदार गुजर समाजाचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील गुजर समाज बांधवांची मूक मोर्चाला हजेरी लावली.

Nitiesh Rane : भाजप मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढी तरी भावना व्यक्त केली आणि सुसंस्कृतपणा काय असतो हे दाखवलं. संजय राऊत यांचे मालक जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा कोरोना काळात असंख्य लोकांचे जीव गेले, पत्रकार बांधवांवर खोट्या केसेस टाकल्या, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी कधीच जनतेची माफी मागितली नाही. संजय राऊत यांनी मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन सुसंस्कृतपणाचे सल्ले द्यावेत, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

Dhananjay Munde : 'येणारा काळ आपलाच आहे'; धनंजय मुंडेंचे वक्तव्य पुन्हा चर्चेत

गेल्या काही दिवसात माजी मंत्री धनंजय मुंडे हे विविध वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. परळीतील एका कार्यक्रमात येणारा काळ आपलाच आहे, असे म्हटले आहे. उपस्थितांना आरोग्याचे धडे देत असताना मी स्वतः जिम करतो, बऱ्यापैकी मी स्वतः माझं वजन कमी केले आहे. असेही सर्वच क्षेत्रातले आपले वजन कमी झाल होते. पण येणारा काळ आपला आहे. त्या काळात आपण चांगले फिट राहिला पाहिजे. म्हणून मी आता जिम करतोय, असे धनंजय मुंडे यांनी परळीतील कार्यक्रमात म्हटले आहे.

Amravati Crime : अमरावतीत 53 लाखांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त; राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई

अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत अकोली रोडवरील साई हेरिटेज परिसरातून 22 वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या ताब्यातून सुमारे 277 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), एक फोर्ड इकोस्पोर्ट कार आणि दोन मोबाईल असा एकूण 53 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Malshej Ghat : माळशेज घाटातील रस्ता खचल्यामुळे कल्याण–आहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

माळशेज घाटातील रस्ता खचल्यामुळे कल्याण–आहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. मात्र पर्यायी मार्ग एकेरी आणि खराब अवस्थेत असल्याने रात्रभर दोन हजारांहून अधिक पर्यटक व प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दुसरीकडे खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

Shirdi News : शिर्डीतील साई मंदिराजवळ दोन स्वतंत्र मंदिरे उभारणार

साई मंदिराजवळील लेंडी बागेत श्रीराम आणि श्रीकृष्णासाठी स्वतंत्र मंदिरे उभारण्यात येणार आहे. साईबाबांच्या काळातील ऐतिहासिक मूर्तींना स्थायी स्थान मिळणार आहे. 108 वर्षांचा ‘वनवास’ अखेर संपणार आहे. भाविक आणि मूर्ती भेट देणाऱ्या नागपूर येथील बुटी परिवाराची इच्छा पूर्ण होणार आहे.

Kidnapping Murder : कॉम्प्युटर शिक्षकाने AI च्या मदतीने अपहरण, खंडणीसाठी आखला भयावह प्लॅन

गोरखपूरमध्ये 10 वर्षीय वैभव वर्माच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. संशयित आरोपी कॉम्प्युटर शिक्षकाने AI च्या मदतीने अपहरण, खंडणी आणि पोलिसांपासून बचाव करण्याची संपूर्ण योजना आखल्याचे तपासात आले समोर.

BMC Standing Committee : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमतासाठी सत्ताधारी पक्षाने आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून बैठकीत आणले

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमत टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून बैठकीत आणण्याची वेळ आल्याची घटना समोर आली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते थेट सभागृहात पाहायला मिळालेत. त्यामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात एकच आश्चर्य व्यक्त केलं जात असून सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

पुणे महापालिकेतील ४०७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पुणे महापालिकेतील सुमारे ४०७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. मतदार यादी पुनर्परीक्षण मोहीम (एसआयआर) संपल्यानंतर या बदल्या केल्या जाणार होत्या. पण कर्मचाऱ्यांना तक्रारींना वेळच मिळू नये यासाठी या बदल्या केल्याची चर्चा आहे. बदल्या केलेल्यांमध्ये उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे.या बदल्या करताना ज्यांना तीन वर्षे पूर्ण झाली आहेत अशांची बदली न करता तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच बदल्या करण्यात आल्या आहेत तसेच जे कर्मचारी अनेक वर्षे एकाच खात्यात होते, त्यांना पुन्हा तेथेच संधी दिली आहे

अतिवृष्टीत लाखोंचे नुकसान; पीक विमा मात्र हेक्टरी अवघा ९८५ रुपये

: खरीप २०२५ पीक विम्याच्या वितरणाला धाराशिव जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा होताच भरपाईतील मोठी तफावत समोर आली आहे. लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी अवघे ९८५ रुपये पीक विमा मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांना त्यांनी भरलेल्या हेक्टरी विमा प्रीमियमएवढीही भरपाई मिळालेली नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

सप्टेंबर २०२५ मध्ये भूम, परंडा आणि वाशी तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळणारी मदत अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यातच विमा कंपनीकडूनही अत्यल्प भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिकच वाढला आहे.

विशेषतः वाशी तालुक्यातील वडजी येथील शेतकऱ्यांना हेक्टरी अवघे ९८५ रुपये पीक विमा मंजूर झाला आहे. लाखो रुपयांचे नुकसान होऊनही एवढीच भरपाई मिळाल्याने सरकार आणि विमा कंपनीने पूरग्रस्त शेतकऱ्यांची 'क्रूर चेष्टा' केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सीओईपीमधील वसतिगृहाची क्षमता वाढविण्याचा आराखडा सादर करा - चंद्रकांत पाटील

सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येत वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. तसेच, नदी सुधार प्रकल्पाशी संबंधित महाविद्यालयाच्या परिसरातील कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

ना. पाटील यांनी आज सीओईपीमधील मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहांची तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बोट क्लब परिसराची पाहणी करून संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेतला.

अभिजीत दिपकेंच्या वडिलांच्या उत्पन्नाच्या चौकशीसाठी निवडणूक आयोग, GST ला आरटीआय कार्यकर्त्याचे पत्र

गुजरातमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिक स्थितीची तसेच सीजेपीसाठी जाहीर करण्यात आलेल्या कायदेशीर बचाव निधीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय GST विभागाकडे पत्र पाठवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com