

68व्या महाराष्ट्र केसरी गदेचा मानकरी सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड ठरला, तर माती विभागातील या हायव्होल्टेज अंतिम लढतीत महेंद्रने बलाढ्य सिकंदर शेखला आस्मान दाखवले. हिंगोलीचा सिकंदर शेख आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली. गादी विभागात अंतिम फेरीत जय पाटील आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात कुस्ती पाहायला मिळाली. सुरुवातीपासूनच संयमी आणि तांत्रिक खेळाचे प्रदर्शन करत हर्षवर्धनने आपल्या अनुभवाच्या जोरावर विजयाचा गुलाल उधळला.
राज्यात गाजत असलेल्या भोंदू ज्योतिषी अशोक खरातने केलेल्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी एक धक्कादायक दावा केला आहे. अशोक खरातबरोबर बऱ्याच जणांची वरात निघणार आहे. तसेच या प्रकरणाचे जवळपास 200 व्हिडिओ आहेत. त्याची माहिती आहे. त्यामधील 90 व्हिडिओ आक्षेपार्ह आहेत. त्यात अनेक मंत्री, आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
मध्यपूर्वेतील भीषण परिस्थिती आणि जागतिक ऊर्जा संकटाचा परिणाम आता श्रीलंकेवरही झाला असून, श्रीलंका सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. नागरिकांनी इंधनाचा वापर मर्यादित आणि विचारपूर्वक करावा, असे आवाहन सरकारने केले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान सरकारनेही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीसोबत एका 50 वर्षीय नराधमाने दोनवेळा अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी ही 10 वर्षांची असून ती 5 वी वर्गात शिक्षण घेते. गावातील एका किराणा दुकानदाराने त्याच्या दुकानात बोलावून घेत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. इतकच नाही तर अशाच प्रकार दोन महिन्यापूर्वी देखील करण्यात आला आणि त्या नंतर त्या नराधमाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. याच कारणामुळे या नराधमाने पुन्हा दोन महिन्यानंतर पीडितेवर अत्याचार केला आहे. यानंतर परळी येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी बालाजी पांचाळ याच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी म्हटले की, पीएम मोदी यांच्या दशकांतील सेवेमुळे देशात विकास, जनकल्याण आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. गरीबांना हक्क मिळवून देणे, विकासाचे नवे विक्रम निर्माण करणे आणि जागतिक मंचावर भारताचा सन्मान वाढवणे यामुळे देशात मोठा बदल झाला आहे. पंतप्रधान मोदींनी 24 वर्षांहून अधिक काळ एकही सुट्टी न घेता देशसेवा केली, हे त्यांच्या समर्पणाचे मोठे उदाहरण आहे. त्यामुळेच त्यांना देशातील जनतेचे मोठे प्रेम आणि समर्थन मिळाले आहे.
राज्यासह देशभरात सध्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण गाजत आहे. त्याचे अनेक कारनामे उघड होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला आहे. हा तोच महाराष्ट्र आहे काय? आता त्यांचे आक्रोश मोर्चे कुठे गेले? राजकीय सोयीसाठी हिंदुत्वाचा वापर करणाऱ्यांना या भगिनींचे अश्रू का दिसत नाहीत? असे सवाल त्यांनी केले आहेत.
पश्चिम आशियातील काही देशांमध्ये इराणकडून नागरी आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचा जी-7 देशांनी तीव्र निषेध केला आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात, इराणची ही कारवाई केवळ संबंधित देशांसाठी नव्हे तर, प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षिततेसाठीही गंभीर धोका असल्याचं म्हटलं आहे. या निवेदनात युरोपीय संघाचे प्रतिनिधीही सहभागी होते.
संपूर्ण कुस्ती क्षेत्राचं आणि क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून असलेल्या 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम सामना पुण्याच्या वाघोली इथं होत आहे. रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धा होत आहे. विजेत्या पैलवानाला मानाची गदा, आलिशान फॉर्च्युनर गाडी आणि पाच लाख रुपयांचं रोख बक्षीस देखील देण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारप्रमुख म्हणून आपल्या कारकीर्दीत अनेक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. सरकारप्रमुख म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कारर्कीदीला 8931 दिवस पूर्ण झाले आहेत. मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ सेवा बजावत देशाचे पंतप्रधान म्हणून नेतृत्व करताना त्यांनी लोकसेवा, विकास आणि जनकेंद्री प्रशासनाला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या कार्यकाळात भारताने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधत जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाची नवी शिखरे गाठत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली असून, अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि उपक्रमांमुळे भारताची प्रगती अधिक वेगाने होत आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर संघ यांच्यातील वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला पुरस्कार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. पण आता येणार नसल्याचे समोर आले असून कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत.
परळीच्या धर्मापुरी गावात 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका 50 वर्षाच्या नराधमांने खाऊ देतो म्हणून बोलावून लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच या नराधमांने त्या अल्पवयीन मुलीला कोणाला संगितले तर जीवे मारून टाकीन अशीही धमकी दिली. धक्कादायक म्हणजे याच नराधमाने याच पीडित मुलीचे आधीही लचके तोडले होते. ही बाब आता समोर आली असून लैगिंक अत्याचार केल्याची माहिती मुलीने घरी येऊन आपल्या वडिलांना सांगितली. यानंतर गावातील नागरिकांनी त्या नराधमाला चंगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील लालाचेरुवु, चौदेस्वरनगर आणि स्वरूपनगर या भागात भेसळयुक्त दूध प्यायलाने तब्बल 16 लोकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या भेसळयुक्त दूधात एथिलीन गायकॉल नावाचा विषारी पदार्थ मिसळला जात होता. याच भेसळीमुळे 20 पेक्षा जास्त लोक रुग्णालयात दाखल झाले होते. यात लहान मुलं, वृद्ध यांचाही समावेश आहे. धक्कादायक म्हणजे आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक असून आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
रूपाली चाकणकर एक महिला असल्याने तिला टार्गेट केल्या जात आहे का? खरात त्यांच्यासोबत देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील अनेक मंत्र्यांचे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत, त्यांच्यावर सुद्धा आता कारवाई होणार का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केलाय.
धाराशिवच्या डोंगरेवाडी येथे टॉवर लाईन वरून शेतकरी आक्रमक झाले असून योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर संतापाने एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला असून इतर शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले. यावेळी कंपनीचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली असून शेतकऱ्यांच्या तक्रार निवारण साठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांनी कंपनीकडून समसमान मोबदला दिला नाही तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला महिलांच्या शारीरिक शोषणाच्या आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची नावे समोर येत असतानाच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव जोडले गेले आहे. ज्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यादरम्यान काही नेत्यांचे बोटावरील जखमेचे फोटो व्हायरल झाले असून याचमुद्यावरून विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना डिवचले आहे. तसेच तटकरे यांच्या बोटावरील जखमेबाबत प्रश्न उपस्थित केले. यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. तर या प्रश्नावरून पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लवांडे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. लवांडे यांनी केलेली वक्तव्ये व सोशल मीडियावरील पोस्ट अत्यंत खालच्या पातळीची असल्याचे परांजपे यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषद मराठी शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी आलेल्या ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) च्या कार्यकर्त्यांनी आज तुमसर येथे पालकमंत्री पंकज भोयर यांचा ताफा अडवून जोरदार निदर्शनं करीत मंत्र्यांना काळे झेंडे दाखवत सरकारचा निषेध नोंदवला.
अशोक खरात प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात की घातपात हा विषय मागे पडतोय, अशी शंका येत आहे. देवगिरी बंगल्यासमोरसुद्धा अशाच अघोरी पुजेचा प्रकार घडलेला होता. खरातचा संबंध अजितदादांच्या अपघाताशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंकाही आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.
अशोक खरात अत्याचारप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत असेल तर सर्वांचे पुरावे द्यावेत. खरातच्या अंधश्रद्धेला बळी कोण कोण पडलं आहे. दृष्कृत्यात कोण कोण सहभागी आहे, त्या सर्वांवर कारवाई करा. मग तो विरोधी पक्षाचा असो किंवा सत्ताधारी. असेल हिम्मत तर सर्वांचे पुरावे दाखवावेत, असे आव्हान विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना मानाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे हे ३८ वे वर्ष आहे. पुण्यातील पुण्यभूषण संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
एलपीजी पुरवठ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतखाली दिल्लीत बैठक सुरू आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पेट्रोलियम मंत्री हरदिप पुरी उपस्थित आहेत. आखाती देशातील युद्ध आणि त्याच्या परिणामाची चर्चा केली जात आहे.
टंचाईमुळे राज्यातील हॉटेल आणि उपहार गृह व्यासायिकांना ३० टक्के गॅस पुरवठा करण्यात येत होता. त्यात आता सुधारणा झाली असून त्यात वीस टक्के वाढ करून ती ५० टक्के पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
अशोक खरात अत्याचार प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तटकरेसाहेब एप्रिल २०२४ मध्ये आपल्या अंगठ्याला कशाची दुखापत झाली होती. तुमच्या अंगठ्याला चिकटपट्टी का लावली होती. तुम्ही अशोक खरातच्या नादाला लागला होता का. तटकरेसाहेब त्या जखमेचे रहस्य महाराष्ट्राला जरा कळू द्या ना, असे आव्हान लवांडे यांनी दिले आहे.
इराण युध्दामुळे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला होता. परिणामी, काही हॉटेल, उपहारगृह बंद करण्यात आली होती. आता हा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असून ५० टक्क्यांपर्यंत गॅस सिलींडर उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
मनसे अध्यक्ष राज्य ठाकरे यांनी उद्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. शिवतीर्थवर ही बैठक होणार आहे. गुढीपाडवा मेळाव्यानंतर ही पहिलीच बैठक होत असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका गर्भवती महिलेवर पूजा -विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे ‘महालक्ष्मी सरस 2026’ प्रदर्शनात ‘ज्ञान रथा’चे उद्घाटन केले. ‘महालक्ष्मी सरस 2026’ प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या उत्पादनांची माहिती घेत स्टॉलधारक महिलांशी संवाद साधला.
अमरावती गुन्हे शाखेने लालखडी ते नवसारी मार्गावर सापळा रचून मुंबईच्या मुख्य तस्करासह एका स्थानिक आरोपीला रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून 11 लाख 79 हजार रुपये किमतीचे 78 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेत. मुंबईचा तस्कर आजिम शेख हा स्थानिक शेख समीरला डिलिव्हरी देत असताना पोलिसांनी ही धडक कारवाई केलीये. यामुळे शहरात ड्रग्ज पुरवठ्याचं मोठं रॅकेट उघड झालंय..
भोंदूबाबा अशोक खरातचे एकामागून एक धक्कादायक कारनामे समोर येत आहेत... खरात हा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच जमिनी बघण्यासाठी येत होता अशी माहिती समोर आलीय...खरातने जमीन व्यवहारात अनेकांचे पैसे बुडवल्याची देखील चर्चा आहे. अशोक खरातनं नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात जमीन आणि काही व्यावसायिक भूखंड आहेत. या सर्व मालमत्तेची चौकशी एसआयटी पथकाकडून केली जात आहे
अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून खरातचा भांडाफोड आम्हीच केला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. खरात प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय.
अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणाला 'काही लोक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाची सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे आहे. खरातांना भेटणाऱ्यांना भेटलं म्हणून कारवाई होणार असेल तर अवघड आहे. मग 40 किलोमीटर वळवून पाणी देणाऱ्यांचे काय? विनाकारण याला राजकीय रंग देऊ नये.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा झाली आहे.
रोहित पवारांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भिड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम’च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे. तरच राज्यातील पिडीत महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल..! हा निर्णय सर्वस्वी मा. सुनेत्राकाकींना घ्यायचाय आणि त्या योग्य निर्णय घेतील, ही अपेक्षा!,
रुपाली चाकणकर या अशोख खरात या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेट प्रकरणात मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनीच पोलिसांवर दबाव आणून अशोख खरातला वाचवले. त्यामुळे चाकणकर यांना सहआरोपी करा, असे पत्र रुपाली पाटील ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातील चोरीची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील कर्मचाऱ्यानेच या दानपेटीतील पैसे चोरल्याचं समोर आलं आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी आरोपीला लगेच बेड्या ठोकल्या आहेत.
रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. शिवाय त्यांना खरात प्रकरणात चाकणकर यांना मुख्य आरोपी करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित केली आहे.
अशोक खरात प्रकरणात माजी खासदार विनायक राऊत यांनी आमदार दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे. चाकणकर आणि भोंदूबाबा अशोक खरात यांच्यातील संबंधांवरून लोकांमध्ये वातावरण चांगलं नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं, असं आठवले यांनी म्हटलं.
पुण्यातील स्वामी नारायण मंदिराच्या परिसरातील दरी पुलावर अनेक चारचाकी वाहनांचा रविवारी पहाटे अपघात झाला आहे. पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारहून पुण्याच्या दिशेने येणारी वाहने एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला आहे.
अशोक खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांचा राजीनामा झाल्यानंतर आता खरातशी जवळीक असल्याने दीपक केसरकर यांच्या राजीनामाची मागणी होत आहे. यावर मंत्री भरत गोगावले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांच्याकडून काही चुका घडले असतील तर याबाबतचे धोरण एकनाथ शिंदे ठरवतील, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.