Maharashtra News Update: दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today: राज्यातील सर्व घडामोडी पाहा एका क्लिकवर, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) आरोग्य, शैक्षणिक तसेच इतर अपडेट्स वाचा
Amitesh Kumar
Amitesh KumarSarkarnama
Published on
Updated on

नाफेड, NCCF कडून  उद्यापासून १५८० रूपये प्रति क्विंटल दराने होणार कांदा खरेदी

- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

- सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात वाढ

- २६ मे पासून कांदा खरेदीच्या दरात वाढ

- उद्यापासून नाफेड आणि NCCF कडून नव्या दराने खरेदी

- उद्यापासून १५८० रूपये प्रति क्विंटल दराने होणार कांदा खरेदी

- आजपर्यंत १२३५ रुपये प्रति क्विंटल होता भाव

- शेतकऱ्यांच्या नाराजीनंतर कांदा खरेदी दरात सरकारकडून वाढ

मोठी बातमी: पुणे शहरात 26 मेपासून 14 दिवस जमावबंदी लागू; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश

पुण्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. अशातच आता पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नवे आदेश काढले आहेत. पुणे पोलिसांकडून 26 मेपासून पुढचे 14 दिवस शहरात जमावबंदी लागू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे आता रात्री 10 वाजल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट, फेरीवाले आणि खाऊगल्ल्यांना बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्केंवर प्राणघातक हल्ला; गळाभेटीचा बहाणा अन् चाकूने वार 

छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्केंवर बाबा पेट्रोलपंप चौक परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. आरोपीनं गळाभेटीचा बहाणा करत त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार केला. क्रांती चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला केलेल्या आरोपीचं नाव राम बोडखे असून तो एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे.

Rahul Narvekar : गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन करण्याचे आदेश

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना काही सूचना दिल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आवश्यक त्या उपाययोजना करा, गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन करा, तसेच गोरक्षकांवर हल्ले होणार नाहीत याची खबरदारी घ्या असं म्हटलं आहे. मालेगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, सातारा, धाराशिव, धुळे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळे बकरी ईद काळात या शहरांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

महायुतीचा जागा वाटपचा फॉर्म्युला बदलला...भाजपच्या निर्णयाकडे शिवसेना-राष्ट्रवादीचे लक्ष

विधान परिषदेच्या १७ जागांपैकी भाजप १२, शिवसेना ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस एक जागांचे वाटप होणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना मात्र सहा जागांवर ठाम असून राष्ट्रवादी काँग्रेसला एकच जागा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दरवर्षी 200 ते 300 शाळा बंद पडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची कबुली

नीती आयोगाचा अहवाल मी बघितलेला नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की, दरवर्षी 200 ते 300 शाळा बंद पडत आहेत. सध्या इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा असल्यामुळे हे घडत असावं. पण त्याकडे हात न दाखवता मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध प्रयोग राबविले जात आहेत, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

कांद्याच्या हमीभावासाठी सोलापुरात उद्या काँग्रेस आंदोलन करणार

कांद्याच्या हमीभावासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर उद्या (ता. २६ मे) काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सोलापूर-हैदराबाद रोड येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच, इंधन दरवाढीचाही यावेळी निषेध करण्यात येणार आहे, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

इंदापूरच्या शेतकऱ्यांचे पुण्यात सिंचन भवनासमोर आंदोलन

खडकवासला धरणाचे पाणी इंदापूरला न मिळाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुण्यातील सिंचन भवनासमोर बोंबाबोंब आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांसोबत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे चिरंजीव तथा पंचायत समितीचे सदस्य श्रीराज भरणेही सहभागी होते. विशेष म्हणजे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती अंकिता पाटील यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावून खडकवाला प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याशी पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा करत आहेत.

पुणे स्थानिक विधान परिषद शिवसेना लढणार - कुलदीप कोंडे

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे म्हणाले, आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये आम्ही देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत. त्या पद्धतीची सूचना जर वरिष्ठांकडून मिळाली आणि मैत्रीपूर्ण लढत होणार असेल तर आम्ही देखील या निवडणुकीत उतरण्यास सज्ज आहोत. मैत्रीपूर्ण लढतील जादुई आकडा कसा मिळवायचा याची किमया यापूर्वीही शिवसेनेने करून दाखवली आहे. त्यामुळे सूचना मिळाल्यानंतर आम्ही जादुई आकडा मिळवण्यासाठी प्रयत्न करू तसेच मैत्रीपूर्ण लढू.

तुकाराम मुंढेंनी स्वीकारला पदभार 

IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. दीडच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांना विभाग मिळाला नव्हते. दीड महिन्याच्य प्रतीक्षेनंतर त्यांना अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली होती.

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर 'वंचित'चा बैलगाडी मोर्चा

देशभरात सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण बनले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे नागरिकांसह शेतकरी वर्गही मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोला शहरात वाढत्या महागाईविरोधात भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले.टॉवर चौक येथील वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

इंदापूर तालुक्याचा पाणीप्रश्न पेटला

पुण्यातील सिंचन भवन समोर इंदापूर दौंड बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचा आंदोलन. कृषिमंत्री, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांच्यासह हजारो शेतकऱ्यांचे सिंचन भवन समोर आंदोलन दौंड, बारामतीला पाणी मिळते पण इंदापूरला तालुक्याला का नाही? असा आंदोलकांचा सवाल.

काँग्रेसचे नगरसेवक फुटल्याची चर्चा

स्थानिक स्वराज्य विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर चंद्रपूरसह विदर्भातील 60 नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे. हे नगरसेवक नाॅट रिचेबल आहेत. विजय वडेट्टीवार म्हणाले, १५, १५ लाख रुपये एका मतासाठी देऊन निवडणूक होत असतील तर मला वाटतंय भविष्यात लोकशाही शिल्लक राहील की नाही हा खरा प्रश्न निर्माण होतोय.

पुण्यात 22 दिवसांत 123 महिला-मुली बेपत्ता

पुणे शहर परिसरात 1 ते 22 मेदरम्यान तब्बल 123 महिला आणि मुली बेपत्ता झाल्याचे समोर आहे. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क प्रणाली’वर याची नोंद झाली आहे. सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी वाढती मैत्री, प्रेमाचं आमिष, लग्नाचं खोटं आश्वासन आणि फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार ही प्रमुख कारणं असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; शेतकरी संकटात

नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसामुळे मुदखेड आणि अर्धापूर भागातील अनेक केळीबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने केळीची झाडे जमीनदोस्त झाली. आधीच डिझेलच्या कमतरतेमुळे शेतीची कामे अडचणीत आली असताना आता पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वक्फ प्रकरणात लढा देणाऱ्या ज्येष्ठ वकिलाची हत्या; हैदराबाद हादरलं

हैदराबादमध्ये वक्फ मालमत्तांशी संबंधित प्रकरणांवर कायदेशीर लढा देणाऱ्या 63 वर्षीय ज्येष्ठ वकिलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी घराबाहेर पडताच भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

मुंबई ते पुणे अवघ्या 90 मिनिटांत! नव्या एक्सप्रेसवेची मोठी तयारी

मुंबई आणि पुणे दरम्यान रोज प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नव्या द्रुतगती महामार्गामुळे आता हा प्रवास फक्त दीड तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आला आहे. अटल सेतूपासून सुरू होणारा हा मार्ग थेट पुण्याशी जोडला जाणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे.

Pune : जुन्नरमध्ये एसटी बसने दुचाकीला चिरडले, ४ जणांचा जागीच मृत्यू,

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी एक भीषण अपघाताची घटना घडली. अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील आळेफाटा परिसरात एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात फायरिंग, दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याच्या विविध भागात पावसाचा इशारा

राज्याच्या दुसऱ्या बाजूला प्री-मॉन्सून हालचालींनी वेग घेतला आहे. कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रायगड जिल्ह्याच्या आंबेनळी घाटात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास पर्यटकांची एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन थेट ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात गाडीतील सर्व ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे सर्व मृत पर्यटक सातारा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं समजते.

धुळे तालुक्यातील लळिंग घाटामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे, यात डंपर ने ट्रकला उडवले आणि त्यानंतर पाठीमागून येणारि खाजगी ट्रॅव्हल बस देखील या वाहनांना धडकल्यामुळे या विचित्र अपघातात जवळपास पाच जण मृत्युमुखी पडले आहे. पाच ते सहा जण जखमी झाले आहेत,

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com