

Maharashtra Exam Paper Leak : महाराष्ट्रातील लाखो शिक्षक भरती इच्छुकांना मोठा धक्का बसला आहे. राज्यभर उद्या 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या संशयामुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे.
या प्रकरणात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही गुप्त कारवाई करण्यात आली. पेपरफुटीमागे (TET exam) संघटित टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. तपास पूर्ण होईपर्यंत आणि या रॅकेटचा संपूर्ण उलगडा होईपर्यंत प्रकरणाबाबत पूर्ण गोपनीयता राखण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्राथमिक तपासात या रॅकेटमध्ये शिक्षण विभागातील काही अधिकारी, दलाल, पालक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्रभर (Maharashtra) ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. राज्यातील तब्बल 1028 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्याचे नियोजन होते. परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती.
मात्र शुक्रवारी रात्री काही संशयास्पद व्यक्तीकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेसारखा पेपर आढळल्याची माहिती भिवंडी पोलिसांना मिळाली. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत हा पेपर TET परीक्षेशी संबंधित असल्याचा गंभीर संशय निर्माण झाला.
यानंतर पोलिसांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधून चौकशी केली. अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर पेपरफुटीचा संशय अधिक गडद झाला आणि रविवारी होणारी परीक्षा तातडीने रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, नव्या तारखेला परीक्षा घेतली जाईल आणि आधी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही.
दरम्यान, या प्रकरणावर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, MPSC, MBBS, NET अशा अनेक परीक्षा सातत्याने फुटत आहेत. सरकारला लोक गंभीरतेने घेत नाहीत, मग परीक्षा कशा गंभीरतेने घेतल्या जातील? नेहमीप्रमाणे कारवाई दाखवली जाईल, काही आरोपी पकडले जातील आणि प्रकरण संपेल.
शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, नीट पेपरफुटीनंतर आता टीईटी परीक्षेचाही पेपर आदल्या दिवशी फुटणे अत्यंत गंभीर आहे. यामुळे हजारो शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाणार आहे. पेपरफोडी करणाऱ्या टोळीला कठोरात कठोर शिक्षा, अगदी मृत्यूदंड देण्याचा विचार झाला पाहिजे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी थेट शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, केंद्र आणि राज्य सरकारला परीक्षा घेण्याची लायकी उरलेली नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचे काम दोन्ही सरकार करत आहेत. सतत उघड होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लाखो विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.