Maharashtra Political Updates : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Bihar Assembly Election Result 2025 : नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, महायुती, महाविकास आघाड किती ठिकाणी झाले याचे चित्र आज स्पष्ट होणार याशिवाय राज्य आणि देशभरातली घडामोडी एका क्लिकवर
Live Update 1
Live Update 1Sarkarnama
Published on
Updated on

हसन मुश्रीफ यांच्यासोबत युती करणाऱ्या समरजीतसिंह घाटगेंनी प्रसिद्ध केलं निवेदन

हसन मुश्रीफ यांच्यासोबत युती करणाऱ्या समरजीतसिंह घाटगेंनी निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यात त्यांनी म्हटलं की, श्री छत्रपती शाहू आघाडीमधील सर्व कार्यकर्त्यांना नमस्कार, आपणा सर्वांना ज्ञात आहेच की, कागल व मुरगूड नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आपल्या शाहू आघाडीमार्फत ही निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी आपण सर्वांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात अनपेक्षितपणे घडामोडी झाल्या, वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी केलेल्या भावनिक आवाहनानुसार यामध्ये आपल्याला पारंपरिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाशी युती करावी लागली.

Satara Nagarpalika : भाजपची उमेदवारी अमोल मोहिते यांना, खासदार उदयनराजे भोसलेंची अर्ज दाखल करतांना अनुपस्थिती.. 

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अमोल मोहिते यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज अधिकृत त्यांनी सातारा नगरपालिकेमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नगराध्यक्षपदावरून खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे या दोघांच्यात रस्सीखेच सुरू होती. मात्र, आज सकाळी भाजपकडून अमोल मोहिते यांची उमेदवारी जाहीर झाली आज भाजपच्या वतीने अर्ज भरण्यासाठी  शिवेंद्रराजे उपस्थित होते. मात्र, दोन्ही राजेंचे मनोमिलन असताना देखील उदयनराजे आणि त्यांचे कार्यकर्ते अनुपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचे उल्लंघन याचिकेवर १९ रोजी सुनावणी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेचे उल्लंघन झाल्याचा दावा सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेतून करण्यात आला आहे. यावर सुप्रीम कोर्ट १९ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेणार आहे. या बाबत सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली असून याचिकेवर १४ नोव्हेंबर रोजी न्यालायलाने राज्य निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य सचिव तसेच महसूल व नगरविकास विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली होती.

Ladki Bahin Yojna : एक कोटी लाडक्या बहीणींची केवायसी शिल्लक, सरकार मुदतवाढ देण्याच्या विचारात

सरकारने आता लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी बंधनकारक केली आहे. या योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांनी जर केवायसी केली नाही, तर त्यांचं नाव या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. केवायसीसाठी 18 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. याचाच अर्थ आता केवायसी करण्यासाठी फक्त एक दिवश शिल्लक राहिला आहे. अजूनही एक कोटी दहा लाख महिलांची केवायसी बाकी आहे. ही संख्या पाहता सरकारकडून केवायसीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Satej Patil : माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची आहे, हलगी आता कुठं तापू लागली; काँग्रेसच्या सतेज पाटलांचा सूचक इशारा

माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची आहे, हलगी आता कुठं तापू लागली आहे. जसजशी निवडणूक लागेल तसतशी हलगी वाजणार असून आणि आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार आपण बाहेर काढणार असल्याचा इशारा काँग्रेस गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिला. या निवडणुकीमध्ये पैशाचा महापूर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच आहे. जसजशी निवडणूक लागेल तसतशी हलगी वाजणार आहे आणि या सर्वांचा समाचार आपण या प्रचारांमध्ये घेणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला. भ्रष्टाचाराचा पैसा, आरोग्य खात्यातील पैसा कसा वाॅर्डात वाटला जाईल, याची सर्व कागद देणार असल्याचे पाटील म्हणाले. 

Amit Satam : अमित साटम यांची उद्धव-राज- आदित्य ठाकरेंवर टीका, मराठी माणसांचा राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप

मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली होती. मुंबई महापालिका लुटणारे हे डाकू आहेत. मराठी-हिंदी भाषेच्या, शाळेतील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी मराठी टक्का आज मुंबईमध्ये 35 टक्के आहे, आधी फक्त मराठी माणसाच्या गप्पा व्हायच्या पण आता कामं होत आहेत. मुंबईतील बीडीडी चाळीचं संपूर्ण काम हे देवेंद्र फडणवीस ह्यांनी केलं. पण, काही लोक निवडणुकीनंतर मराठी माणसांचा वापर करताता. किती मराठी माणसाला महानगरपालिकेची कॉन्ट्रॅक्ट मिळाली, आम्ही मराठी तरुणांना नोकऱ्या देत आहोत, त्याचबरोबर स्टार्टअप इंडिया मध्ये त्यांना प्रोत्साहन देतोय. पण काही लोक फक्त मराठी माणसांचा आणि तरुणांचा राजकारणासाठी फायदा घेतात, असे म्हणत साटम यांनी ठाकरेंवर टीका केली.   

BJP News : चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या चार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी

चंद्रपूर जिल्ह्यातील 4 नगरपरिषदांमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी झाली आहे.  भद्रावती, राजुरा, वरोरा आणि गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे. भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी ऐनवेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करत काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली आहे,  तर दुसरीकडे राजुरा नगर परिषदेत भाजपचे नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश करताच त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

सोलापुरातील अनगर नगरपालिकेमध्ये सर्व 17 जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल बिनविरोध निवडून आलं आहे. मात्र नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज आल्याने निवडणूक होणार आहे. 17 सदस्यांच्या जागासाठी केवळ 17 अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूकच बिनविरोध झाली आहे. भाजपचे नेते माजी आमदार राजन पाटील यांनी ही किमया घडवून आणली.

हसीनांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताचं काय म्हणणं? प्रत्यार्पणाबाबत केंद्र सरकारने ठाम भूमिका घेतली

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातील कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या संदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Tejaswi Yadav : तेजस्वी यादव आता विरोधी पक्षनेते, आरजेडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने प्रचंड आघाडी घेत मोठं यश मिळवलं असून भाजपनेही जोरदार कामगिरी करत विजय निश्चित केला आहे. दुसरीकडे महागठबंधनला मोठा पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकारणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तेजस्वी यादव पुढील काळातही विरोधी पक्षनेते म्हणून काम करत राहणार आहेत.

Nashik News : नाशिकच्या मिलिटरी स्कूलच्या कॅम्पसमध्ये बिबट्या; विद्यार्थी सुरक्षित, पण भीतीचे सावट!

नाशिकमधील भोसला मिलिटरी शाळेच्या परिसरात आज एकदा बिबट्या दिसल्याने मोठी दहशत पसरली आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचून बिबट्याचा शोध सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच महात्मा नगर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले होते आणि त्या बिबट्याला पकडण्यात आले होते. शहरात अल्पावधीत अशा दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंता वाढली आहे.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर शेकडो पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

नाशिक येथील इगतपुरीत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना एकनाथ शिंदे गटला मोठा धक्का बसला आहे. युवा सेना तालुका उपाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे सादर करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Government : मुंबई, ठाणे, पुण्यात इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक्स पार्क्स

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स प्रायव्हेट लिमिटेड (ब्लॅकस्टोन) यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत कुर्ला (मुंबई), ठाणे, नवी मुंबई आणि तळेगाव (पुणे) या ठिकाणी इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक्स पार्क्स उभारण्यात येणार आहेत. या पार्क्सद्वारे सुमारे ३,०१५ कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीसह ७५१० रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Sheikh Hasina शिक्षेनंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया

बांग्लादेशातील आंतरराष्ट्रीय कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टाचा हा निकाल एकांगी आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा संताप हसीना यांनी व्यक्त केला आहे.

Local Body Elections : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली

राज्यातील नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह स्थानिक पातळीवर विविध राजकीय आघाड्यांमध्ये नगराध्यक्षपदासाठी प्रामुख्याने चुरस पाहायला मिळाली. काही ठिकाणी अजूनही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत संभ्रम असून अर्ज मागे घेण्यापर्यंत आता याबाबत कुरघोड्या सुरू राहण्याचे संकेत मिळत आहेत.

BJP Politics : वादानंतर काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशास स्थगिती

महाविकास आघाडीची सत्ता असताना पालघरमधील साधू हत्याकांडाचे प्रकरण चांगलेच गाजले होते. भाजपमधील काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेला आले. चौधरी यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली. अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या प्रवेशाला स्थगिती दिली आहे. तसेच आदेश त्यांनी पालघर भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना दिले आहेत.

Bangladesh News : शेख हसीना यांना फाशीची शिक्षा

बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना स्थानिक कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. मागील वर्षी देशात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार उसळला होता. हे आंदोलन मोडित काढण्यासाठी हसीना यांनी हत्यांकाड घडवून आणले, असा आरोप त्यांच्या होता. अनेक महिने त्यावर सुनावणी झाली. त्यामध्ये त्या दोषी आढळून आल्यानंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

बिबट्यांच्या नसबंदीला परवानगी, वनमंत्री गणेश नाईकांचा मोठा निर्णय

पुणे, शिरूर आणि कोल्हापूरसारख्या शहरी भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने निर्माण झालेल्या समस्येवर अखेर तोडगा काढण्यात आला आहे. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांच्या नसबंदीला परवानगी मिळाल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरी वस्त्यांमध्ये बिबट्या शिरण्याचे प्रकार वाढले होते, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. यावर बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी 'बिबट्याच्या नसबंदीची परवानगी मिळालेली आहे,' अशी माहिती दिली. प्रशासनाकडून आता यावर पुढील नियोजन केले जाणार असून, त्यामुळे बिबट्यांचा शहरातील वावर कमी होण्याची अपेक्षा आहे.

BJP Nandurbar : नंदुरबारमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपचा उमेदवार ठरला

नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार निश्चित केला आहे. भाजपने अविनाश माळी यांना उमेदवारी दिली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी खासदार डॉ. हीना गावित आणि इतर भाजप नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माळी यांनी आपला अर्ज सादर केला. या घोषणेमुळे नंदुरबारमधील राजकीय वातावरण तापले असून, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. अविनाश माळी यांच्या उमेदवारीमुळे आता पालिका निवडणुकीतील समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar : पुण्यात अजितदादांना धक्का, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारेटकर यांचा राजीनामा

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारेटकर यांनी स्थानिक नेतृत्वाच्या राजकारणाला कंटाळून आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. प्रदीप गारेटकर आता इंदापूर नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अर्ज भरणार असून, त्यांनी शरद पवार गट आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत स्थानिक आघाडी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने गारेटकर यांचा विरोध डावलून भरत शहा यांना उमेदवारी दिल्याने हा संघर्ष वाढला आहे. या बंडखोरीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच होम पिचवर मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Latur Farmer : फवारणीच्या औषधातून विषबाधा; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

लातूरच्या चाकूर तालुक्यातील अजनसोंडा इथं फवारणीसाठी आणलेल्या औषधातून विषबाधा झाल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतकरी अंगद भालेराव (वय-58) आणि लिंबाजी गवळे (वय-54) असे या दोन मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत. दोन्ही शेतकऱ्यांनी फवारणी झाल्यानंतर सोबत जेवण केल्याने विषबाधा झाल्याची बातमी माहिती समोर येत आहे.

Congress Politics : काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना AB फॉर्म पोहोचले; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

'राज्यात काँग्रेस उमेदवारांना AB फॉर्म नाही, अशी कुठेही स्थिती नाही. राज्यात सगळीकडे AB फॉर्म पोहोचले आहे. कुठेही गोंधळ नाही. ज्याठिकाणी एकमतं होऊ शकले नाही, तिथं उद्या 11 वाजेपर्यंत AB फॉर्म वाटप होईल,' असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Delhi Lal Quila Bomb Blast : अकोल्यातल्या युवकाची पोलिसांकडून सात चौकशी, पण...

Delhi Blast Live updates
Delhi Blast Live updatesSarkarnama

दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील एका मुस्लिम युवकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. हा युवक अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या पिंजर पोलिस ठाण्यात अंतर्गत येत असलेल्या एका गावातला रहिवाशी आहे. युवक बेपत्ता असल्याची कुटुंबियांची तक्रार पिंज पोलिसांत होती. दिल्लीत बॉम्बस्फोट झाला त्या दिवशी हा युवक दिल्लीतच असल्याची माहिती समोर येत आहे. या युवकाची पोलिसांनी सात तास चौकशी केली. 7 तास पोलिसांकडून या तरुणाची चौकशी झाली. मात्र आतापर्यंतच्या चौकशीत सदर तरुणाबद्दल कोणतीच पुरावे हाती न लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Ratnagiri Shivsena Politics : राजन साळवी यांच्या मुलाला शिवसेनेने रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली

राजन साळवी यांच्या मुलाला शिवसेनेने रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारल्याचे दिसते. राजन साळवी यांचा मुलगा अथर्व राजन साळवी प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक होता. विशेष म्हणजे, राजन साळवी यांनी याच प्रभागातून राजकीय कारकिर्दिला सुरूवात केली होती. ही जागा भाजपला सोडली जाणार किंवा भाजपमधून आयात उमेदवार करून त्याला शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार, असे दोन पर्यायावर चर्चा सुरू आहे. रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत मुलाला उमेदवारी नाकारल्यानंतर आता उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात शीतयुद्ध रंगणार? अशी चिन्हं आहेत.

Congress Politics : भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत भाजपला धक्का; शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये दाखल

भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनाच काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. सुनील नामोजवार भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. यावेळीही त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र मात्र शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या अनिल धानोरकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने नमोजवार हे नाराज होऊन काँग्रेसमध्ये दाखल झाले. भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला असून त्यांनी नामोजवार यांना उमेदवारी देऊन भाजपला मोठा धक्का दिलाय.

MVA Politics : रत्नागिरी नगरपरिषदेसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

रत्नागिरी नगरपरिषदेसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला नगराध्यक्षासह 22 जागांवर लढणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाकडून शिवानी सावंत माने आज नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुक रिंगणात शिवसेना उद्धव ठाकरे सेनाविरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना, असा सामना होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सहा, तर काँग्रेसला चार जागा लढवणार आहे.

Jalgaon Politics : जळगाव महापालिकेत आज पाच जागांसाठी आरक्षण सोडत

जळगाव मनपा निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत त्रुटी राहिल्याने राज्य निवडणूक आयोगाने सुधारित सोडतीचे आदेश दिले होते. यात 13 प्रभागांचा समावेश करून मागासवर्गीय महिलांसाठी 5 जागा काढण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या असून, त्यानुसार सोमवारी आरक्षण सोडत होणार आहे. मंगळवारी 19 प्रभागांची आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. यात मागासवर्गीय महिलांसाठी 'अ' जागेवरील प्रभागांचा समावेश केला होता. 'ब' जागांवरील प्रभागांचा समावेश न झाल्याने सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता. आता आज मागासवर्गीय महिलांची आरक्षण सोडत काढली जाईल.

Nanded Crime Update : कुख्यात गुंड अन् नांदेड पोलिसांमध्ये चकमक

जबरी चोरी, खंडणी, विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे, अपहरण, अशा गंभीर गुन्ह्यातील कुख्यात गुंड आरोपी रबज्योतसिंघ तिवाणा उर्फ गब्या गेल्या काही दिवसापासून फरार होता. अखेर कुख्यात गुंड रबज्योतसिंघ तिवाणा हा घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. कारवाईदरम्यान आरोपीने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी आरोपीवर गोळीबार केला. या गोळीबारात कुख्यात गुंड रबज्योतसिंघ तिवाणा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वजिराबाद पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

Shivsena Politics : ठाकरे अन् शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र

ठाकरे अन् शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र आली आहे. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडत आहे. त्यांच्या पत्नी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी उभ्या राहिल्या आहेत.

 असा पुरुष सिंह होणे नाही, बाळासाहेब ठाकरेंना राऊतांचे अभिवादन

ज्यांच्यामुळे मी घडलो असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना! असा पुरुष सिंह होणे नाही! मराठी माणसाने एकजुटीने राहावे आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे, अशा शब्दांना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी संजय राऊतांनी आदरांजली वाहिली

नाशिक बाजार समितीमध्य 12 कोटींचा घोटाळा - देविदास पिंगळे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी सभापती देविदास पिंगळे यांनी नाशिक बाजारात समितीममध्ये नऊ महिन्यात बाजार समिती 12 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. गिरणारे येथे एक रुपया एकर दराने जमीन मिळणार होती. मात्र पदाधिकाऱ्यांचे सर्व लक्ष भ्रष्टाचारच असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असेच पिंगळे म्हणाले.

नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तरी देखील नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे, तर, भाजपला दोन उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

बुलढाण्यात वंचित- काँग्रेस युती 

बुलढाण्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. दोन्ही पक्ष 50-50 ५०-५० टक्के जागा लढवणार आहे.

मंढरी, जोशी यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कल्याण पूर्वमधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल मंढारी, सहसंपर्कप्रमुख विजय जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. काही ठिकाण युती आणि आघाडी होणार की नाही याचे चित्र देखील स्पष्ट होणार आहे. आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com