

मराठा उप समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अंतरवाली सरायटीमध्ये जाऊन मनोज रंगे यांची भेट घेतली यावेळी दोघांनी एकमेकांचा सत्कार केला जवळपास सव्वा तास दोघांमध्ये बंद दारावर चर्चा झाली. यानंतर याचे कारण आता समोर आले असून विखे पाटील यांनी ही राजकीय भेट नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी, ही व्यक्तिगत भेट असून त्यांच्या तब्येतीची आपण विचारपूस करण्यासाठीच ही भेट घेतल्याचे म्हटलं आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगूरूंचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर 2025 रोजी संपला. त्यानंतर अद्याप प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती झालेली नाही. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरु पद रिक्त झाल्यावरून आता विरोधकांनी सरकाला धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील सेक्शन 11(8) चा मुद्दा उपस्थित करत राज्यपाल तथा कुलपती यांनी प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती का केली नाही असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सांगलीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर आज्ञातंकडून करण्यात आली दगडफेक करण्यात आली आहे. हा प्रकार मिरज तालुक्यातील जानराववाडी-बेळंकी दरम्यान घडला असून आमदार इद्रिस नायकवडी व माजी मंत्री अजितराव घोरपडे हे दोघे एकत्र निघाले असताच घडला. तर दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांकडून दगडफेक करण्यात आली असून ती कोणत्या कारणातून झाली हे आद्यप स्पष्ट झालेले नाही. सध्या घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत.
गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्र्यांनी शस्त्र परवाना दिल्यावरून आता जोरदार वाद सुरू झाला आहे. मंत्री मंत्री योगेश कदम यांच्यावर विरोधक टीका करताना त्यांचा राजीनामाही मागत आहेत. यादरम्यान त्यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट करत खुलासा केला आहे. यानंतरही हा वाद सुरूच असून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर जोरदार टीका केली आहे. रामदास कदमांची उलटी गिनती सुरू झाली आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे.
पुणे पोलिसांकडून घायवळ कुटुंबावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला असून आता घायवळ कुटुंबाविरोधात गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरू केली आहे. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळवर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोपावरून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यभरामध्ये एकीकडे ओबीसी समाज मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरला विरोध करत असताना दुसरीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष, आणि मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राजेखान जमादार यांच्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हे दोन्ही पक्षप्रवेश पार पडले आहेत.
समाजा-समाजात आज दुही, विसंवाद आणि संघर्ष निर्माण झाला आहे, त्या पापाचे धनी शरद पवारच आहेत, अशी टीका भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 1994 मध्ये पवार साहेबांनी मराठा समाजाचा समावेश केला असता तर आजची परिस्थिती नसती, असेही विखे पाटील यांनी म्हटलं.
रामदास कदम यांनी पुण्यातील घायवळ प्रकरणावर भाष्य केले. योगेश कदमला मी याबाबत विचारले, तेव्हा विधिमंडळातील एका मोठ्या पदावर बसलेल्या, मंत्र्यांना देखील आदेश देणाऱ्या अशा व्यक्तीने त्याला सांगितलं. ज्यांनी योगेश कदम यांना सांगितलं तेही न्यायाधीशच आहेत. त्यांचं नावही योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. पण, अशा व्यक्तीने योगेश कदम यांना सांगितल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला, असे म्हणत रामदास कदम यांनी विधानसभा सभापती राम शिंदे यांच्याकडेच बोट दाखवले आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूरमधील सहाय्यक निबंधक कार्यालयास अचानक भेट दिली होती. त्या वेळी सहायक निबंधक कार्यालयातील ड्राव्हरमध्ये पाच हजार रुपये सापडले होते, त्यामुळे बावनकुळे यांनी सहाय्यक निबंधक कपोले यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
नीलेश घायवळच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद होता, तो कसा मोठा झाला, कोणामुळे मोठा झाला, त्याला कोणी मोठं केले, हे भाजपच्या पुण्याचे पालकमंत्री राहिलेल्या एका बड्या नेत्याला विचारलं तर सगळं स्पष्ट होईल. ज्या प्रमाणे लाडकी बहीण योजना आणली, त्या प्रमाणे महायुती सरकारने लाडका गुंड ही योजनाही आणावी, असा खोचक सल्ला विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला.
नीलेश घायवळला सावंत कुटुंबीयांकडूनही मदत करण्यात आली आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्याला माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर दिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत नीलेश घायवळ हा रोहित पवारांचा कार्यकर्ता होता. राजकीय द्वेषातून ते माझ्यावर आरोप करत आहेत. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत, असा पलटवार तानाजी सावंत यांनी रोहित पवारांवर केला आहे.
कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा निकटवर्तीय आहे. त्यांनी राम शिंदे यांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे. शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना फोन केला असावा. नाही तर गृहमंत्रालयातून राज्यमंत्र्यांवर एक दबाव आलेला असावा. त्यातूनच नीलेश घायवळ याला बंदुकीचा परवाना दिलेला असावा, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
मी गृहराज्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस केलेली नाही. या भूमिकेवर मी ठाम आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचे काम आम्ही कधी केलेले नाही आणि यापुढेही कधी होणार नाही. याबाबतचा सविस्तर खुलासा मी पत्रकार परिषद घेऊन करणार आहे, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
वाहतूक कोंडीवरुन आज पुण्यातील चाकणमधील ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. ग्रामस्थ आणि एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा काढला. खासदार अमोल कोल्हे देखील यावेळी रस्त्यावर उतरले. यावेळी पोलिस व कोल्हे यांच्यात बाचाबाची झाली,.
मुंबईत पत्रकारपरिषद घेत ठाकरे सेनेचे अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली. योगेश कदम यांच्या कथित गैरव्यवहारांची आणि गुन्हेगारांना मदत करण्याच्या प्रकरणांची तक्रार घेऊन थेट लोकायुक्तांकडे जाणार असल्याचं अनिल परब म्हणाले. तसेच, जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही, तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाज आज रस्त्यावर उतरला असून रायगडसह संपूर्ण कोकणातुन हजारोंच्या संख्येत कुणबी समज बांधवांनी आज पहाटे मुंबईकडे कुच केली. एसटी, खाजगी बस तसेच कारचा थांफा आज मुंबईत धडकणार असून कोणालाही कुणबीच प्रमाणपत्र देऊ नये, आमच्या ओबीसी च्या कोट्यातून कोणालाही आरक्षण दिले जाऊ नये अशा मागण्या ओबीसी समाज सरकारकडे करणार आहे.
रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आऱोप करत त्यांचे संबंध कुख्यात गुंड निलेश घायवळशी जोडणे होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी रवींद्र धंगेकर यांची तक्रार थेट शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहेत. धंगेकर आताच शिवसेनेत आले आहेत त्यांनी असे आरोप करू नये. धंगेकरांना समज द्यावी, असे आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना सांगणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीच्या मैदानात उपमुख्यमंत्री अजित पवार उतरले आहे. पवार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत अजित पवार यांनी तब्बल तीन वेळा संघटनेचे अध्यक्षपद भूषवले आहे.
गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे, त्या म्हणाल्या, मी एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या राजीनाम्याची मागणी करते. गुन्हेगारांना आणि मोठं करणारे, डॅन्सबार असणारे मंत्री, महाराष्ट्राने का सहन करावे? पोलीस आयुक्तांचा अहवाल/शिफारस अत्यंत महत्त्वाची असते. जर परवाना या टप्प्यावर नाकारला गेला असेल तर त्यामागे साधारणपणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असते. आपण पोलिसांच्या नकारानंतर परवाना कसा, आणि का मंजूर केला ? एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तुम्ही का दिलात. पोलिसांचा निर्णय तुम्ही का बदलला याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल. कारण हा कायद्याचा अपमान आहे. सार्वजनिक सुरक्षेची ऐंशी तैशी करणारे तुम्ही कोण ?
राज्यात अतिवृष्टीने उध्वस्त झालेला शेतकरी, सरकारची तुटपुंजी मदत, कायदा व सुव्यवस्थेचे उडालेले धिंडवडे, आरक्षणाचे विषय, कोलमडलेली अर्थव्यवस्था, वाढता भ्रष्टाचार आणि एकूणच निर्माण झालेली अराजकता या परिस्थितीत हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवड्यांचं होणं गरजेचं आहे, परंतु दुर्दैवाने हे सरकार या ठिकाणी देखील पळ काढताना दिसत असून अधिवेशन केवळ दहा दिवसांचं घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.
महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालिन नियोजन पूर्ण झाले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रूजू होण्याची सूचना देण्यात आली आहे.
'ओबीसी कोट्यात कुणालाही आरक्षण देऊ नये' आणि 'कुणबी समाजाला ओबीसी प्रमाणपत्र न देता आमचं आरक्षण अबाधित ठेवावं' या मागण्यांसाठी आज मुंबईत ओबीसी समाजाचं आंदोलन होत आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रायगडसह संपूर्ण कोकणातून हजारोंच्या संख्येने कुणबी बांधवांनी मुंबईकडे निघाले आहेत.
गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्र्यांनी शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मंत्री योगेश कदम यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट करत लिहीलं की, 'शिक्षक आणि व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हतं. उपलब्ध कागदपत्रे आणि न्यायालयाच्या निर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे'.
राज्य सरकारने लाडकी बहीणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी हा निधी वापरण्यात यावा अशा सूचना केल्या आहेत. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या निधीसंदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर केला आहे.
मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर आज पहाटे एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये या कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. पहाटेच्या सुमारास बीएमडब्ल्यू आणि पोर्शे कारची शर्यत लागल्याची माहिती समोर आली आहे. बोरिवलीहून अंधेरीला येणाऱ्या मार्गावर या दोन्ही गाड्यांची शर्यत सुरु होती. त्यावेळी पोर्शे कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. यामध्ये पोर्शे कारचा चालक गंभीर जखमी झालाय तर बीएमडब्ल्यूच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील मूलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मिश्री बाजारात (बुधवार) संध्याकाळी एका मशिदीजवळ मोठा स्फोट झाला आहे. स्फोट घडल्यानंतर बाजारात एकच गोंधळ उडाला आणि पळापळ सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत एका महिलेसह एकूण सहा जण जखमी झाले आहेत. तर स्कूटरमध्ये ठेवलेल्या काही वस्तूमुळे स्फोट झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.