

Aurangabad District Bank : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. २० पैकी १९ जागा जिंकत महायुतीने बँकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. शिवसेनेने सर्वाधिक ९ संचालक निवडून आणत अध्यक्षपदावर दावा सांगीतला आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी अनपेक्षितपणे महा विकास आघाडी प्रणित पॅनल ऐवजी महा युतीच्या पॅनलकडून निवडणूक लढवली होती. आता अध्यक्ष पदाच्या निवडीत आपली भूमिका बॅलेन्सिंग असेल, असे सांगत दानवे यांनी महा युतीतील सावे-सत्तार-भुमरे यांची धाकधूक वाढवली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. २० संचालकांसाठी झालेल्या निवडणुकीत आठ संचालक हे बिनविरोध निवडून आले होते. तर बारा संचालकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. महा युतीच्या पॅनला १९ जागा मिळाल्या यामध्ये अंबादास दानवे यांचाही समावेश होता. तर काँग्रेस प्रणित पॅनलकडे एकमेव खासदार कल्याण काळे यांची जागा आहे. त्यामुळे अध्यक्ष पद महा युतीकडेच राहणार हे स्पष्ट आहे.
शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांपैकी शिवसेनेचे ९, भाजपाचे ७ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन संचालक विजयी झाले आहेत. ज्याचे जास्त संचालक अध्यक्ष पद त्या पक्षाला या नियमानुसार शिवसेनेचा अध्यक्ष पदावर प्रबळ दावा मानला जात आहे. अर्थात अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा फैसला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहेत. २० जुलै रोजी नवा अध्यक्ष निवडला जाणार असला तरी त्यासाठी आतापासूनच फील्डिंग सुरू झाली आहे.
अध्यक्ष पदासाठी शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. आमदार अब्दुल सत्तार हे आपले पुत्र समीर सत्तार यांना अध्यक्ष करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर खासदार संदीपान भुमरे यांना आमदार विलास भुमरे यांच्या हातात बँकेचा कारभार सोपवायचा आहे. सत्तार-भुमरे यांच्यात अध्यक्ष पदावरून संघर्षाचा भडका उडू शकतो, हे लक्षात येताच मंत्री अतुल सावे यांनी आपला डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. अशातच महा युतीकडून बँकेवर संचालक म्हणून निवडून आलेल्या अंबादास दानवे यांच्या भूमिकेने ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
अंबादास दानवे यांचे अब्दुल सत्तार, अतुल सावे, संजय शिरसाट, संदीपान भुमरे या सगळ्यांशीच चांगले संबंध आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत मुलगा समीर सत्तार याला बंडखोरी करायला लावली होती. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाचा शब्द घेतल्यानंतरच त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, अंबादास दानवे आणि सत्तार याची समृद्धी महा मार्गावर झालेली गळा भेट आणि त्यानंतर मुंबईत दोघांमध्ये झालेली खलबते पाहता दानवे यांनी माझी भूमिका बॅलेन्सिंग असेल असे सांगणे हा सत्तार यांच्या खेळीचाच एक भाग आहे की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद हे शेतकरी संचालकाच्या हाती जावे, अशी आपली इच्छा आणि प्रयत्न असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. २० जुलैला अजून बराच अवधी आहे, त्याआधी बऱ्याच घडामोडी घडतील, असे संकेतही दानवे यांनी दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.