

Shivsena News : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बँकेची सत्ता आणि तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती ठेवण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावली आहे. मुलगा समीर सत्तार याच्यासह पाच संचालक बिनविरोध निवडून आणत सत्तार यांनी अर्धी बाजी मारली आहे. भाजपचे दोन आणि काँग्रेस पक्षाचा एक असे आठ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. हे सगळे सत्तार समर्थक असल्याचे बोलले जाते. यात आता आणखी मोठा ट्विस्ट आला असून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (uddhav Thackeray) पक्षाचे आमदार आणि बँकेचे माजी संचालक अंबादास दानवे हे चक्क महायुतीच्या पॅनलमधून संचालक पदाची निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात असला तरी ही खेळी सत्तार-दानवे यांच्या समृद्धी महामार्गावर झालेल्या गळा भेटीतच ठरली होती हे आता स्पष्ट झाले आहे. अब्दुल सत्तार यांनी कुठल्याही परिस्थिती जिल्हा बँक आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्याकडून जिल्हा बँकेत आव्हान दिले जाणार हे लक्षात येताच सत्तार यांनी विधान परिषद निवडणुकीत दबावतंत्र वापरले.
जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजप (BJP) महायुतीचे सुहास शिरसाट यांच्याविरोधात मुलगा समीर सत्तार याला उमेदवारी दाखल करायला लावली. सत्तार यांचा विधान परिषद निवडणुकीतील फोडाफोडीचा दांडगा अनुभव पाहता दगाफटका होऊ शकतो याचा अंदाज भाजपच्या नेत्यांना आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेनंतर जिल्हा बँकेत सत्तार यांना मदत करण्याचा शब्द दिल्यानंतरच त्यांनी विधानपरिषदेत माघार मान्य केली. सुहास शिरसाट विना अडथळा निवडून आल्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी जिल्हा बँकेत आपल्याला हवे तसे फासे टाकत अधिकाधिक संचालक आपल्या बाजूने कसे येतील? असे प्रयत्न सुरू केले आहेत.
सत्तार यांच्या याच खेळीचा भाग म्हणून आमदार अंबादास दानवे यांचे महाविकास आघाडीच्या पॅनलऐवजी महायुतीकडून लढण्याच्या निर्णयाकडे पाहिले जात आहे. गेल्या महिन्यात अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांची समृद्धी महामार्गावर भेट झाली होती. दोघांनी एकमेकांची भेट घेतल्यानंतर सत्तार यांनी मुंबईत भेटू, जिल्हा बँकेचा विषय असल्याचे म्हटले होते. त्यानुसार या दोघांची मुंबईत भेट झाली होती, त्याच वेळी अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून लढावे, असे ठरले होते. त्यानूसार आता प्रत्यक्षात तेच घडताना दिसत आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. बिगरशेती संस्था मतदारसंघातून दानवे उमेदवारी करत असून, त्यांच्या प्रवेशासाठी महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांनी माघार घेतल्याची माहिती आहे. मात्र, हा निर्णय पक्षीय राजकारणाशी संबंधित नसून सहकार क्षेत्रातील विकासासाठी नितीन पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घेतल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या 12 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होत आहे.
शंभुराज देसाईंकडून ऑफर
अंबादास दानवे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीऐवजी महायुतीकडून लढणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधीमंडळात माध्यमांशी बोलताना जर त्यांनी असा निर्णय घेतला असले तर मी त्यांना थेट महायुतीत म्हणजेच आमच्याकडे या, अशी ऑफर देईल, असे म्हटले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते महायुतीकडून लढत आहेत हे मला तुमच्याकडून समजते आहे. हे खरे असेल तर मी सभागृहात त्यांना विचारेल आणि आता आमच्याकडेच या असे सांगेल. अंबादास दानवे मोठे नेते आहेत, आम्ही त्यांचे महायुतीत निश्चित स्वागत करू, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.