

सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा केल्यानंतर, औरंगाबादमध्ये राजकीय उत्सुकता वेगाने वाढली.
भाजपला १,५०० हून अधिक अर्ज मिळाले, ज्यामुळे अनपेक्षित गर्दी झाली, तर काँग्रेस आणि एआयएमआयएमनेही अर्ज विक्री सुरू केली.
शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अर्ज विक्री सुरू केलेली नाही परंतु अंतर्गतरित्या विस्तृत उमेदवारांच्या याद्या तयार करत आहेत.
Chhatrapati Sambhajinagar : तब्बल पाच वर्ष रखडलेल्या महापालिका निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने होऊ घातल्या आहेत. त्यामुळे यंदा नगरसेवक व्हायचंच म्हणून चंग बांधलेल्या इच्छूकांनी उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षात जाण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपने छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले. त्यासाठी अक्षरशः इच्छूकांनी उड्या मारल्या आहेत. तब्बल दीड हजाराहून अधिक अर्ज इच्छूकांनी नेलेत. त्यानंतर काँग्रेस, एमआयएम या पक्षांनीही इच्छूकांसाठी अर्ज विक्री सुरू केली आहे. मात्र दोन्ही शिवसेनांनी सध्या फक्त इच्छुकांच्या याद्या तयार करून ठेवण्यात आल्या आहेत.
महापालिका निवडणुकीत तिकीट आपल्याच पाहिजे, असे म्हणत भावी नगरसेवक कामाला लागले आहेत. अनेक प्रभागांत दहापेक्षा जास्त इच्छुक असल्याने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. 29 प्रभागांत उमेदवारी देण्याचा दावा प्रमुख पक्ष करत असले तरी महायुती, महाविकास आघाडीच्या निर्णयानंतरच उमेदवार निश्चित होणार आहेत. त्यात काहींनी सर्वच पक्षांसाठी दारे खुली ठेवली आहेत. इच्छुकांची गर्दी पाहता, राजकीय पक्षांना बंडखोरीची आतापासूनच चिंता सतावू लागली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारीसोबतच राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. यावेळची निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होत असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतरच्या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे राजकीय पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 31 जानेवारीची डेडलाइन गृहीत धरून शहरात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. भाजपतर्फे इच्छुकांचे अर्ज भरून घेतले जात आहेत.
दोन दिवसांत तेराशे जणांनी अर्ज खरेदी केले आहेत, तर काहींनी ते दाखलही केल आहेत. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे इच्छुकांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेही इच्छुकांसाठी अर्जांचे वाटप सुरू आहे. एका-एका जागेसाठी आठ ते दहा उमेदवार आमच्याकडे असल्याचा दावा सर्वच पक्ष करत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहितेची घोषणा होईपर्यंत उमेदवारांची भाऊगर्दी सुरूच राहणार आहे.
निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडी होणार किंवा नाही, हे जोपर्यंत स्पष्ट होणार नाही, तोपर्यंत उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार नाही. दरम्यान, इच्छुकांची संख्या पाहता बंडखोरीची भीती असल्याने राजकीय पक्ष आतापासून सावध पावले उचलत आहेत. सर्वांत पहिले मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू करून शिवसेनेने तयारी सुरू केली. त्यानंतर भाजपने इच्छुकांचे अर्ज घेऊन एक पाऊल पुढे टाकले. इतर पक्षात मात्र फक्त अंतर्गत तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.
महापालिका निवडणुकीत 25 वर्षांपासून शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असे समीकरण होते. त्यात जनतेने कायम युतीच्या बाजूने कौल दिला. पण, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होत आहे. तीही तब्बल दहा वर्षांनंतर. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी नव्हती. त्यामुळे महापालिका निवडणुकीत काय चित्र राहील, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीची होण्याचे सध्या तरी 'फिप्टी फिप्टी' शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपने 115 जागांसाठी म्हणजेच 29 प्रभागांसाठी इच्छुकांकडून अर्ज भरून घेतले. त्यासाठी पक्ष कार्यालयात दोन दिवस प्रचंड गर्दी झाली. 1300 पर्यंत अर्ज आल्याचा दावा पक्षातर्फे केला जात असला तरी त्यात हौशी भावी नगरसेवकांचा अधिक भरणा असल्याचे दिसते. निवडणूक रिंगणात तग धरणाऱ्या उमेदवारांची संख्या दीडशेच्या घरात असेल, असे सांगितले जात आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत पैशाचा अक्षरश: महापूर आला होता, अशी परिस्थिती दिसून आली. सत्ताधारी पक्षांवर यावरून विरोधकांनी टोकाची टीकाही केली. आगामी महापालिका, जिल्हा परिषदेतही हाच ट्रेंड कायम राहणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आर्थिक चणचण भासणार आहे.
FAQs :
1. पाच वर्ष रखडलेल्या महापालिका निवडणुका आता का होत आहेत?
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणुकांना मंजुरी मिळाल्याने प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.
2. भाजपकडे एवढी मोठी गर्दी का झाली?
नगरसेवक होण्यासाठी इच्छूकांची मोठी संख्या असून तिकीट मिळवण्यासाठी भाजपला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.
3. काँग्रेस आणि MIMने काय सुरू केले आहे?
दोन्ही पक्षांनी उमेदवारीसाठी अर्जांची विक्री सुरू केली आहे.
4. शिवसेनेच्या दोन्ही गटांची स्थिती काय आहे?
फॉर्म विक्री सुरू नसली तरी दोन्ही गटांत इच्छुकांची यादी गुपचूप तयार केली जात आहे.
5. इच्छूक कोणत्या पक्षात जाण्यास तयार आहेत?
नगरसेवक व्हायचेच म्हणून अनेक इच्छूक कोणत्याही पक्षात जाण्यास तयार असल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.