बीड : बागायतदार शेतकरी कुटूंबात जन्म, व्हॉलीबॉल, अॅथेलेटीक्सचे चॅम्पीयन असल्याने सैन्यदलात किंवा पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न आणि त्यासाठी खडतर तयारी करणारे अजित पवार यांनी व्हॉलीबॉलमध्ये जसा ‘स्मॅश’मारतात तसाच एमपीएससीच्या मैदानातही ‘स्मॅश’मारला. (Beed) अन् एकाच वेळी पाच परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विक्रम केला. राज्यातले सर्वात तरुण अधिकारी व पीएसआय परीक्षेतही राज्यात अव्वल येण्याचा मान त्यांनीच नावे केला. नापास हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाहीच. (Marathwada)
भारतीय प्रशासन सेवेत (आयएएस) गेल्यानंतर आता ते बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शालेय जिवनापासूनच चॅलेंज स्विकारण्याची धमक असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीड मुख्य कार्यकारी अधिकारीपदही चॅलेंज म्हणूनच मागून घेतले. सुरुवातीला कार्यालये स्वच्छता, गावांची सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छ भारत अभियान अशा मोहिमा यशस्वी केल्यानंतर आता जिल्ह्यात पाणंद रस्ते, जलजिवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत शुन्य काम असलेला जिल्हा आता विभागात प्रथम आहे. तर, जलजिवन मिशन मध्ये ९०० गावांचा सर्व्हे आणि १५० गावांत कामे सुरु आहेत. शेतकऱ्यांसाठीही त्यांनी तुती लागवडीला प्रोत्साहन म्हणून एक हजार एकरांचे उद्दीष्ट ठरविले आहे. अजित पवार यांनी जिल्हा परिषद प्रशासनाची अंतर्गत अनियमिततेची स्वच्छताही तेवढ्याच धडाक्यात सुरु केली आहे. २०१३ - १४ सालचे अतिरिक्त शिक्षकांच्या वेतन काढल्या प्रकरणी सात वर्षांपासून धुळ खात असलेली संचिकाही त्यांनी बाहेर काढली आहे.
कामाचा उरक, निर्णय क्षमता यामुळे त्यांच्या अस्थापनेत झिरो पेंडन्सी आहे. जिल्हा परिषदेवर कार्यकारी समिती असतानाही नियमांवर बोट ठेवून जनहिताला प्राधान्य देणाऱ्या अजित पवार यांच्यावर आता जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणूनही जबाबदारी आहे. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी सहसा चर्चेत येत नाही. मात्र, कामाचा उरक, अनियमिततेत धडाकेबाज कारवायांमुळे अजित पवार चर्चेत आल्यानंतर त्यांच्या वाटचालीचा आढावा घेतला.
आडफळ (जि. सातारा) येथील बागायतदार शेतकरी कुटूंबातील अजित पवार यांचे भाऊ देखील पोलिस निरीक्षक आहेत. अजित पवार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लोणंद या गावाजवळील शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथून कृषी विज्ञान पदवी (बी. एस्सी अॅग्री) मिळवली. त्यानंतर त्यांनी राहूरी (जि. अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी विज्ञानाची पदव्युत्तर पदवी (एम. एस्सी. अॅग्री) मिळविली. अजित पवार एम. एस्सी अॅग्रीच्या दुसऱ्या वर्षी (१९८६ साली) त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पाच पदांच्या परीक्षांचे फॉर्म भरुन तयारी सुरु केली.
पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पाचही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा आणि फौजदार परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा विक्रम केला. त्यांनी वनविभागाची वर्ग एक परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आणि तामीळनाडूत ट्रेनींगही केले. यानंतर वनअधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी तीन महिने प्रशिक्षण करुन ही नोकरीही सोडली. फौजदार पदावर निवड झाल्यानंतर नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण केंद्रात त्यांनी वर्षभर ट्रेनिंग केले. तालुका कृषी अधिकारी पदावर निवडीनंतर त्यांनी या पदावरही आठ महिने काम केले. याच काळात परीक्षा दिलेल्या तहसिलदार पदांच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आणि त्यातही त्यांनी यशाचे शिखर गाठले.
२२ वर्षीय तहसिलदार असलेले त्या काळातले ते सर्वात तरुण अधिकारीही ठरले. १९८६ साली प्रशासनात सेवेला सुरुवात केलेल्या अजित पवार यांनी पन्हाळा (जि. कोल्हापूर) येथे तहसिलदार म्हणून काम करताना ज्योतीबा देवस्थान आणि गगनगिरी किल्ला विकासात मोलाचा वाटा उचलला. १९९८ ते २००२ या काळात साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांच्या कार्यकाळात तब्बल संस्थानच्या ३४ विकास प्रकल्पांची सुरुवात आणि अंमलबजावणी झाली.
यामध्ये दर्शनरांग, प्रसाद विभाग, शाळा, ददवाखाना या महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. २००८ ते २०१४ या कालावधीत रत्नागिरीला प्रांत अधिकारी म्हणून काम करताना जैतापूर अनुउर्जा प्रकल्प देखील त्यांच्याच कार्यकाळातील आहे हे विशेष. यानंतर त्यांनी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर विभागाचे जात पडताळणी आयुक्त म्हणून जबाबदारी पेलली. २०२१ मध्ये त्यांची भारतीय प्रशासन सेवेत (आय. ए. एस) निवड झाली.
खेळांच्या मैदानातही ऑल राऊंडर
महाविद्यालयीन काळापासून अजित पवार खेळाच्या मैदानातही अव्वल राहीले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात ते अॅथेलेटीक्सचे जनरल चॅम्पीअन तर व्हॉलीबॉलचे अंतरविद्यापीठ खेळाडू होते. महाराष्ट्र राज्य संघात अॅथेलेटीक्स मध्ये चंदीगड येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण आणि कोलकत्ता येथील स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. जिल्ह्यात प्रमुख पदांवर अधिकारी यायला धजावत नाहीत असे चित्र काही प्रकरणांमध्ये दिसते.
मागच्या अडीच महिन्यांपासून पोलिस अधीक्षक पद रिक्त आहे. विशेष म्हणूजे पोलिस अधीक्षकांना वर्दीचे वा जिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना महसूली व दंडाधिकारीय अधिकारांचे संरक्षण कवच असते. इतरांना तसे नसतेही. त्यामुळे दबाव, हस्तक्षेत यामुळे अधिकारी येत नाहीत असे चित्र असताना अजित पवार यांना भारतीय प्रशासन सेवेत (आय. ए. एस.) म्हणून निवडीनंतर त्यांनी बीड द्या, अशी शासनाला मागणी केली. चॅलेंज स्विकारण्याची सवय असल्याने त्यांनी धाडसाने बीड घेऊन तेवढ्याच धडाक्याने ते कामही करत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.