
Santosh Deshmukh case updates : बीडमधील मयत सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या, अवादा कंपनीला खंडणी, ॲट्रॉसिटी या गुन्ह्यातून मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडला दोषमुक्त करावे, या आरोपी पक्षाच्या अर्जावर दोन्ही बाजूनं वकिलांनी विशेष मकोका न्यायालयासमोर घमासान युक्तिवाद झाला.
तब्बल तीन तास युक्तिवाद सुरू होता. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मुंबई साखळ बाँबस्फोट, मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला आणि कोल्हापूरचे बालहत्याकांड आदी प्रकरणांचे दाखले न्यायालयासमोर दिल्याने या खून खटल्याचे गांभीर्य वाढवलं. या खटल्याची पुढील सुनावणी आता सात जुलैला होणार आहे.
बीडच्या (BEED) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर 2024ला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. आवादा कंपनीकडे वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. यातून सुरवातीला सुदर्शन घुले याने अवादा कंपनीच्या मस्साजोग प्रकल्पावर जाऊन भांडण केले. सुरक्षा रक्षकांना मारहाण केली. त्यात हस्तक्षेप केल्यामुळे पुढे संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली.
केज पोलिस (Police) ठाण्यात दाखल या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रित तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हा शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाने केला. खंडणीला अडसर ठरल्याने देशमुख यांची हत्या झाल्याचे तपासात समोर आले. वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार, तर विष्णू चाटे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे. यासह सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार व फरार कृष्णा आंधळे यांच्यावर खुनाचा ठपका आहे.
बीडचे विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यापूर्वी न्यायाधीश रजेवर आहेत. वाल्मिक कराडला दोषमुक्त करावे, या आरोपी पक्षाच्या अर्जावर दोन्ही बाजूंच्या वकिलांचा न्यायालयात तब्बल तीन तास युक्तिवाद चालला. तीन गुन्हे, तीन दोषारोपपत्र एकत्र करता येत नाहीत, खंडणी अन् ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांची सुनावणी केजच्या सत्र न्यायालयात घ्यावी, वाल्मिक कराड अन् सुदर्शन घुलेने यापूर्वी कुठलेच गुन्हे एकत्र केलेले नसल्याने मकोका लागू शकत नाही, वाल्मिक कराडवरील 20 पैकी 15 गुन्ह्यांचा निकाल लागलेला आहे. संतोष देशमुख यांचा खून करण्याबाबत वाल्मिकने कसलीच सूचना दिली नसून फिर्यादीनेही तसा उल्लेख केलेला नाही, असे मुद्दे आरोपी पक्षाकडून वकील मोहन यादव यांनी न्यायालयासमोर मांडले.
यावर सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी, आरोपी कठपुतली असून कटाचा मुख्य सूत्रधार कायम पडद्यामागे असतो, त्याप्रमाणे वाल्मिकचे असल्याचे सांगत पुराव्यांची जंत्री न्यायालयासमोर सादर केली. यासाठी त्यांनी मुंबईतील साखळी बाँबस्फोट, 26/11 चा मुंबईवरील हल्ला व कोल्हापूरच्या बालहत्याकांडांचे दाखले दिले. या गुन्ह्यांची जशी एकत्रित सुनावणी झाली त्याप्रमाणे ही सुनावणी एकत्रित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने या प्रकरणाचा अभ्यास करून एकत्रित दोषारोपपत्र 'मकोका'साठी आवश्यक पुराव्यांसह सादर केल्याचे सांगितले. त्याला पुन्हा वकील मोहन यादव यांनी हरकत घेतली.
दरम्यान, फिर्याद व सरकारी साक्षी - पुराव्यांमध्ये ‘अण्णा’ हे नाव वाल्मीक कराडबाबत आहे. केवळ अण्णा म्हणजे वाल्मीक नव्हे, तर संतोष देशमुख यांना देखील अण्णा म्हटले जायचे. यावरून वाल्मीक कराडला आरोपी बनवण्यात आल्याचे आरोपी पक्षाकडून सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.