

भाजपने 57 नगरसेवक निवडून आणत संभाजीनगर महापालिकेवर दावा सांगितला आहे.
बहुमतासाठी एकाच जागेची गरज असताना एमआयएमने सत्तेपासून भाजपला रोखण्याचे संकेत दिले आहेत.
इम्तियाज जलील यांच्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Chhatrapati Sambhajinagar News : स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आणत भाजपने छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील सत्तेवर दावा सांगितला आहे. बहुमतासाठी एका नगरसेवकाची गरज असल्याने भाजपचे स्थानिक नेते निश्चित आहेत. आम्हाला पाठिंबा देण्यासाठी अनेक पक्षातील नगरसेवक इच्छूक असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यामुळेच भाजपने शिवसेनेलाही बेदखल केले आहे. पण भाजपचा हा अतिआत्मविश्वास त्यांच्या अंगलट येतो की काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महापालिकेत 33 नगरसेवक निवडून आणत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या एमआयएमने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी डाव टाकायला सुरवात केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आम्ही भाजपला निश्चित धक्का देणार, असा दावा करत राजकारणात सगळं काही शक्य आहे, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी अनेक पक्ष इच्छूक आहेत. आमचे आणि भाजपाच्या विरोधातील पक्षांच्या नगरसेवकांचे संख्याबळ पाहिले तर काहीही अशक्य नसल्याचे सांगत इम्तियाज यांनी महापौर पदाच्या निवडणुकीची उत्कंठा वाढवली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला 58 हा जादुई आकडा कोणत्याच पक्षाकडे नाही. भाजपही या मॅजिक फिगरपासून एक ने दूर आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या तेरा नगरसेवकांना सोबत घेत विरोधी पक्षाची आघाडी करायची म्हटलं तर एमआयएमला मोठी कसरत करावी लागणार आहे.
भाजपला एक नगरसेवक सोबत घेऊन महापौर पदासह महापालिकेत सत्ता मिळवणे अवघड नाही. पण भाजपाविरोधात सगळ्या विरोधकांनी मोट बांधली तरच बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 58 नगरसेवकांची जुळवाजुळव शक्य आहे. इम्तियाज जलील यांनी हे शक्य असल्याचा दावा करत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित अशा सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिकसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी भाजपाने सत्तेसाठी तडजोडीची भूमिका स्वीकारली आहे. एकमेकांच्या पाठिंब्यावर शिवसेना-भाजपाने सत्तेचे वाटप केले आहे. निवडणुकीत जरी शिवसेना-भाजपा युती झाली नसली तरी राज्याच्या सत्तेत हे दोन पक्ष एकत्र असल्याने शिवसेना कुठलेही टोकाचे पाऊलं उचलण्याची शक्यता नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएम मोठं काही करण्यात यशस्वी होण्याची शक्यता कमीच आहे.
परंतु बहुमतापासून एका आकड्याने दूर असलेल्या भाजपाला सहजासहजी सत्ता मिळू द्यायची नाही, यासाठी एमआयएमने हालचाली सुरू केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाला विरोध करणाऱ्या एमआयएमनेच नगरपालिका आणि महापालिकेतही काही ठिकाणी त्यांना मदत केल्याचे दिसून आले आहे. तेव्हा इम्तियाज जलील यांचा दावा कितपत खरा ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महापालिकेत भाजपचे 57, शिवसेना 13, एमआयएम 33, शिवसेना (युबीटी) 6, वंचित आघाडी 4 तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे.
1. भाजपकडे किती नगरसेवक आहेत?
भाजपकडे स्वबळावर 57 नगरसेवक आहेत.
2. बहुमतासाठी भाजपला किती जागांची गरज आहे?
भाजपला बहुमतासाठी एका नगरसेवकाची गरज आहे.
3. एमआयएमने काय भूमिका घेतली आहे?
एमआयएमने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी रणनीती आखण्याचे संकेत दिले आहेत.
4. इम्तियाज जलील यांनी काय विधान केले?
राजकारणात सगळं काही शक्य आहे, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
5. या घडामोडींचा काय परिणाम होऊ शकतो?
महापालिकेतील सत्ता स्थापनेवर अनिश्चितता निर्माण झाली असून राजकीय समीकरणे बदलू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.