Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी प्रकरणी महसूल प्रशासनामार्फत अत्यल्प मूल्यावर प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. या प्रक्रिया पूर्वनियोजित व विशिष्ट कंपनीस लाभ मिळावा या हेतूने राबविण्यात आल्याचा दावा करत दानवे यांनी या संपूर्ण लिलाव प्रक्रियेची, उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी 22 मे रोजी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली होती.
आज विधान परिषदेत या विषयावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना अंबादास दानवे यांनी केलेली मागणी मान्य करत उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे जाहिर केले. व्हिट्स प्रकरणावरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) अडचणीत आले होते. लिलाव प्रक्रियेतून माघार घेत त्यांनी आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. ही निविदा प्रक्रिया प्राधिकरणाने रद्द केली. असे असताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा याची उच्चस्तरीय चौकशी कशासाठी लावली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उच्चस्तरीय चौकशी जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा सुरू झाली आहे. संजय शिरसाट सध्या विविध प्रकरणात होत असलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. अशावेळी मुख्यमंत्री त्यांना सांभाळून घेतील, अशी अपेक्षा होती. परंतु विरोधी पक्षाची मागणी मान्य करत त्यांनी आपल्याच सरकारमधील मंत्र्यांची कोंडी केल्याचे यावरून दिसून आले आहे. अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी असलेले चांगले संबंधही यावरून स्पष्ट झाले आहेत.
दरम्यान, अंबादास दानवे यांनी आज सभागृहात संजय शिरसाट यांचे नाव घेत वाभाडे काढले. या खरेदी व्यवहारात नियमांचे उल्लंघन झाले असून या कंत्राटात सहभाग घेतलेल्या तीन कंपन्यांच्या कंत्राटामध्ये फक्त पाच - पाच कोटीचा फरक आहे. यामुळे या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.राज्य सरकारची या व्यवहारात फसवणूक झाली आहे. या कंत्राट भरलेल्या कंपनीचे मालक सिद्धांत शिरसाट असून त्यांचे वडील राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे.
त्यांच्या वडिलांच्या निवडणूक शपथपत्रात सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर कसलीच संपत्ती नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारचे अधिकारी ही निविदा प्रक्रिया करण्यासाठी काम करतात. जी कंपनी नोंदणीकृतच नाही, कंपनीने मागील तीन वर्षांचा आयटीआर भरलेला नाही, सिद्धांत शिरसाठ यांच्या वडीलांच्या शपथपत्रात सिद्धांत शिरसाट यांची मालमत्ता शून्य असेल तर ते हॉटेल कसे काय घेऊ शकतात? असे प्रश्न दानवे यांनी सभागृहात उपस्थित केले.
पत्रात काय ?
रेडी रेकनरच्या दरानुसार या हॉटेलचे मूल्य 110 कोटी इतके निश्चित करण्यात आले. बाजार मूल्य त्यापेक्षा कितीतरी अधिक असताना महसूल प्रशासनाने मात्र अल्प दरात हे हॉटेल विक्री करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दानवे यांनी या पत्रात नमूद केले होते. संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तपास यंत्रणातील काही अधिकाऱ्यांनी भागधारकातील विशिष्ट घटकांच्या दबावाखाली किंवा आर्थिक हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया राबवली आहे. सदर हॉटेलच्या 2012 मध्ये करण्यात आलेल्या अधिकृत मूल्यांकन अहवालानुसार सदर मालमत्तेची किंमत 110 कोटी इतकी निश्चित करण्यात आली होती.
महागाई निर्देशांक आणि स्थावर मालमत्तेच्या बाजारभावानुसार सद्यस्थितीत सदर मालमत्तेचे मूल्य यापेक्षा कितीतरी अधिक आहे. मात्र मालमत्तेचा लिलाव केवळ अत्यल्प प्रमाणात केल्याने शासनाच्या महसुलाचे नुकसान झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. तसेच सदर मालमत्तेचे कोणतेही अंतिम हस्तांतरण होण्यापूर्वी संपूर्ण वस्तुस्थिती माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर विधिवत रित्या सादर करण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.