

BJP Politics News : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत होती. भाजपा, शिवसेनेने आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती, तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे की इतर कोणी? यावरून खलबते सुरू होती. उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर काँग्रेसचा पाठिंबा, पण दुसरा उमेदवार दिला तर आम्ही मैदानात उतरू, अशी भूमिका काँग्रेसच्या प्रदेशातील नेतृत्वाने घेतली होती.
अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर होताच काँग्रेसने दबावतंत्राचा वापर सुरू केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे धावता दिल्ली दौरा करून आले. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना संपर्क साधून काँग्रेसला माघार घ्यायला भाग पाडलेच. काँग्रेसच्या माघारीनंतर याच पक्षाकडून मुख्यमंत्री राहिलेल्या आणि आता भाजपाचे राज्यसभेतील खासदार असलेल्या अशोक चव्हाण यांनी तोंडसुख घेतले.
दावा करायचा आणि माघार घ्यायची, याची आता काँग्रेस पक्षाला सवयच झाली आहे, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला. भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून अशोक चव्हाण काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. काँग्रेसची दुर्दशा आणि ध्येयहीनता यावर प्रहार करतांना चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये सध्या ध्येयधोरणांचा अभाव आहे. पक्ष सध्याच्या आव्हानांवर आणि तरुणांच्या आकांक्षांवर लक्ष केंद्रित करत नाही, अशी टीका त्यांनी केली होती.
काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावरही त्यांनी अनेकदा निशाणा साधला होता. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची परिस्थिती अधिक बिघडल्याची टीका करत त्यांनी पटोले यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी जमिनीवर काम करण्याऐवजी फक्त मुलाखती देणे आणि विधाने करणे यावरच काँग्रेस नेते भर देत असल्याची तोफ चव्हाण यांनी तेव्हा डागली होती.
भाजपवर मतचोरीचे आरोप करून काँग्रेस चुकीचे 'नरेटिव्ह' सेट करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसकडे आता सांगण्यासारखे काहीही नसल्याची बोचरी टीका यापुर्वी केली होती. काँग्रेस देशाचा मूड ओळखण्यात अपयशी ठरत आहे, असेही ते म्हणाले होते. काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि कामाची पद्धत बदलली असून, ती योग्य दिशेने जात नसल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केला होता.
विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसने आपल्या धरसोड वृत्तीचे दर्शन घडवल्याचा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला. बच्चू कडू यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, आनंद आहे, अशी खोचक प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
मराठवाडा विदर्भात प्रचंड ऊन आहे, त्यामुळे पाणीटंचाई देखील निर्माण झाली आहे. पाणी जपून वापरावे लागेल, असे सांगत नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईवर पालकमंत्र्यांशी बोलू, असे चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.