नांदेड ः भाजपवाले लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. मराठा आरक्षण म्हणे माझ्यामुळेच गेले. मी मराठा आरक्षणाच्या विरोधात कसा असेन? केंद्रातील भाजप सरकारलाच हा प्रश्न सोडवण्याची इच्छा नाही, त्यांनीच हा प्रश्न भिजवत ठेवला, असा आरोप सार्वजनिक बांधका मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर गल्लीत बोलणारे आपल्या जिल्ह्याचे खासदार तिकडे दिल्लीत, सभागृहात मात्र तोंड उघडत नाही, अशी टीका चव्हाण यांनी चिखलीकरांवर केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ सगरोळी येथे अशोक चव्हाण यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आपल्याला लक्ष्य केले जात असून लोकांमध्ये खोट्या गोष्टी पसरवण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याची टीका केली.
अशोक चव्हाण म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी वेळोवेळी या विषयावर बैठका घेतल्या. राज्यातील विविध मराठा संघटनांशी चर्चा केली. दिल्लीत वकीलांसोबत बैठका घेतल्या. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या विषयीची भूमिका मांडली.
मात्र यावर केंद्र सरकारने संसदेत कायदा केला तो राज्यांना अधिकार बहाल करण्याचा. त्यासोबत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेची अट हटवली असती तर मराठा समाजाला दहा मिनिटात आरक्षण मिळाले असते. पण केंद्राने तसे न करता आरक्षणाचा प्रश्न भिजवत ठेवला. त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नाही, याचा पुनरुच्चार देखील चव्हाण यांनी केला.
गल्लीत तोंड उघडणारे दिल्लीत गप्प?
जिल्ह्याचे चूकून निवडून आलेले खासदार आता गल्लीत मराठा आरक्षणावर बोंबलत सुटलेत. पण संसदेत कधी त्यांनी तोंड उघडले नाही. लोकसभा निवडणुकीत मतांची फाटाफूट झाली, दलित समाजाने वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणावर मत दिली. पण त्यामुळे फायदा भाजपचा झाला. वंचितला मतदान म्हणजे भाजपचा फायदा हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे लोकसभेला मी आणि भिंगे दोघेही पडलो. मला न तुला घाल.. अशी गत झाली. ती चूक आता करू नका.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, दोन वर्षात कोरोनाची परिस्थिती असतांना देखील आपण चांगले काम केले आहे. शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज दिले. एकट्या नांदेड जिल्ह्याला पीक विमा आणि सरकारच्या मदतीतून एक हजार कोटी रुपये मिळणार आहेत. अजून तीन वर्ष आपल्या सरकारला धोका नाही. त्यामुळे काॅंग्रेसच्या उमेदवाराला निवडून दिले तर तुम्ही हक्काने त्याच्याकडून कामे करून घेऊ शकता.
विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून आला तर तो आमची सत्ता नाही, मी काय करू असे म्हणेल. आज निवडूक झाली की मला पुन्हा तुमच्याकडे यायचे आहे. आज फडणवीस जिल्ह्यात येऊन सांगतात आम्ही हे करू ते करू. मग पाच वर्ष तुमची राज्यात सत्ता होती तेव्हा का केले नाही? असा सवाल देखील चव्हाण यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.