जायकवाडीची वाटचाल शंभरीकडे; अठरा दरवाजे उघडले..

(jayakwadi Dam)आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी सलग तिसऱ्यांदा भरले आहे.
Jayakwadi Dam, Paithan
Jayakwadi Dam, PaithanSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दुपारपर्यंत वरच्या भागातून धरणामध्ये १ लाख ४० हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे काल रात्री ८९ टक्क्यावर असलेला जलसाठा आज दुपारी ९५ टक्क्यांवर पोहचला.

जायकवाडी धरण पुर्ण भरण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. जिल्हा प्रशासनाने सकाळी अकरा वाजता धरणाच्या २७ पैकी १८ दरवाजातून १० हजार क्युसेकने गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. परंतु वरच्या धरणातून होणारी आवक पाहता विसर्गाचे प्रमाण वाढवले जाण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जायकवाडी प्रकल्पाचे अधिकारी तसेच पूर नियंत्रण विभागाने सकाळी जायकवाडीतील पाण्याचे पूजन करत अकरा वाजता १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण ६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी व्यापून आहे. जायकवाडी धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्रही म्हटले जाते. पैठण या नाथांच्या भूमीत हे धरण असल्याने याला नाथसागर देखील म्हणतात.

नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून आहेत. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. तर परळी येथील वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर चालते. जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यातल्या डाव्या कालव्याची लांबी ही २०८ किलोमीटर आहे.

Jayakwadi Dam, Paithan
मुख्यमंत्र्यांची मराठवाड्यातील पालकमंत्र्यांशी चर्चा; शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार..

जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. ४०० गावांची तहानही जायकवाडी धरण भागवते. औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती सुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात जायकवाडी धरणाचा सर्वात मोठा वाट आहे.

माती व दगडाचे धरण

जायकवाडी धरणांची उंची ४१.३ मीटर तर लांबी ९९९७.६७ मीटर एवढी आहे. या धरणाची क्षमता २९०९ दशलक्ष घनमीटर एवढी असून वापरण्या योग्य पाण्याची क्षमता २१७० दशलक्ष घनमीटर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com