

Jalna Politics News : जालन्याचे काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे हे आज सकाळी आपल्या कुटुंबासह दुबईहून सुखरूप छत्रपती संभाजीनगरमध्ये परतले. काँग्रेस कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी चिकलठाणा विमानतळावर धाव घेत त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. दरम्यान, जालन्याचे माजी खासदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी कल्याण काळे यांच्या दुबई दौऱ्याची खिल्ली उडवली होती. या टीकेचा समाचार काळे यांनी विमानतळावरच घेतला.
रावसाहेब दानवे यांनी काळे यांच्या दुबई दौऱ्यावर टीका करत 'ते दुबईच्या राजाकडे जालना लोकसभा मतदारसंघासाठी एखादा प्रोजेक्ट आणायला गेले आहे' म्हणत खिल्ली उडवली होती. याकडे लक्ष वेधले असता काळे यांनी लगेच पलटवार केला. दानवे यांनी जेव्हा माझ्या दुबई दौऱ्यावर टिप्पणी केली, तो दिवस धुळवडीचा होता. धुराड्याच्या दिवशी बोलणाऱ्यांचे फारसे मनावर घ्यायचे नसते, अशा शब्दांत दानवे यांच्या टीकेला उत्तर दिले.
महाराष्ट्राची व आपल्या राज्यातील राजकारणाची संस्कृती ही फार वेगळी आहे. अडचणीच्या काळात आपण एकमेकांना दिलासा देण्याचा किंवा तो सुखरूप असावा यासाठी प्रार्थना करतो. ती करताना तो आपला राजकीय शत्रू आहे, की मित्र हे आपण पाहत नाही. पण काही लोक अशा संकटाच्या परिस्थितीतही राजकारण आणतात तेव्हा वाईट वाटते, अशी नाराजीही काळे यांनी व्यक्त केली.
मी माझी पत्नी, कुटुंबातील काही सदस्य आणि मित्र आणि त्यांच्या परिवारासोबत 26 फेब्रुवारीला दुबईत गेलो होतो. दुसऱ्याच दिवशी कल्याण काळे हे युद्धामुळे दुबईत अडकले अशा बातम्या मला माध्यमांवर ऐकायला, पहायला मिळाल्या. दुबईत येऊन एकच दिवस झाला तर मला आमच्या घरच्यांकडून आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून तुम्ही परत कधी येणार म्हणून विचारणा होऊ लागली. तेव्हा काय सांगावे, हा माझ्यासमोर प्रश्न होता, असेही काळे म्हणाले.
युद्धामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली होती. जशी विमाने उपलब्ध होतील तसं लोकांना आपल्या मायदेशी पाठवले जात होते. दरम्यानच्या काळात भारत सरकारकडून युद्धामुळे दुबई व इतर आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिक, पर्यटकांबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेणे अपेक्षित होते. सरकार काय प्रयत्न करत आहे, हे कळाले असते तर अडकलेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला असता. पण तसे काही घडले नाही. याचा जाब आपण 9 तारखेला संसदेच्या अधिवेशनात विचारणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
आम्ही सगळे सुखरूप मायदेशी, आपल्या घरी परतावे यासाठी अनेकांना देवाकडे प्रार्थना केल्या, मशीदींमधून दुआ मागण्यात आली. या सगळ्याचाच परिपाक हा आहे, की आम्ही आज इथे सुखरूप पोहचलो आहोत. आमच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या, दुआ मागणाऱ्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, अशा शब्दांत कल्याण काळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.