
बीड : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. या आनंदात असलेल्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांचे टेन्शन मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा वाढवण्याच्या तयारीत आहेत. नवे सरकार स्थापन होताच अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सामुहिक उपोषणाला सुरवात करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
येणाऱ्या काळात विविध शासकीय खात्यांमध्ये नोकरभरती होणार आहे, त्यामुळे आरक्षणाचा लढा तीव्र करा, तुटून पडा आणि निवडून दिलेल्या आमदारांशी भांडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले. सामुहिक उपोषणाची तारीख जाहीर केल्यानंतर अंतरवाली सराटीत या, प्रत्येक कुटुंबातील काही सदस्यांनी उपोषणात सहभागी व्हायचे आणि काहींनी शेती, कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची, असेही जरांगे यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी ऐनवेळी न लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. पाडापाडी आणि पाठिंब्याची भुमिका घेतल्यानंतर राज्यात महायुती दोनशे पार जागा जिंकत भक्कमपणे सत्तेवर आली. येत्या दोन दिवसात राज्यात नवे सरकार स्थापन होणार आहे. (Maratha Reservation) हे नवे सरकार स्थापन होताच अंतरवाली सराटीमध्ये सामुहिक उपोषणाची घोषणा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जाणार आहे. या संदर्भात बीडमध्ये त्यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.
सरकार स्थापन झाल्यावर मी तारीख जाहीर करेन. त्या तारखेपासून मी आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहे. आपण आपली आरक्षणाची लढाई तीव्र करू, उपोषणाची तारीख जाहीर केल्यानंतर अंतरवालीला या, आपण उपोषणाला बसू असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले. सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत लढा देत राहू. तुम्ही वेगवेगळ्या पक्षातील मेदवारांना मतदान केले, ते निवडूनही आले. त्या आमदारांशी आरक्षणासाठी भांडा, मग तो आमदार कोणत्याही पक्षाचा असो.
मराठ्यांनी आता एकजूट करून त्या आमदारांना आरक्षणासाठी मदत करण्याचे आवाहन करावे. आरक्षणासाठी सामूहिक बेमुदत उपोषणाला बसायचे आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर प्रसारमाध्यमांद्वारे उपोषणाची तारीख सांगितली जाईल. त्या दिवशी अंतरवाली सराटीत या, उपोषणाच्या तयारीला लागा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. तुमची शेतातील कामे उरकून घ्या, प्रत्येक कुटुंबातील काही सदस्यांनी उपोषणासाठी बसावे. काहींनी घर आणि शेती सांभाळा.
दहा ते पंधरा दिवस तुमचे काम बुडेल, त्याची तयारी ठेवा. आपण उपोषणाला बसू आणि आरक्षण मिळवू, असेही जरांगे पाटील म्हणाले. सरकार जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत नाही तोवर मी उपोषण करत राहणार, आम्ही मरत नाही तोपर्यंत उपोषण करणार, असे जरांगे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. निवडणुकीचे, राजकारणाचे खुळ डोक्यातून काढून टाका. वेडेपणा करू नका, तुमचा नेता मंत्री झाला असेल, आमदार झाला असेल तर त्याच्या गुलालात नाचू नका. तो तुम्हाला नाचवेल, तुमच्या मदतीला येणार नाही, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.