

Massajog Sarpanch Election News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दीड वर्षांनी होत असलेल्या मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीवरून गावातील राजकारण चांगलेच तापले आहे. ही निवड बिनविरोध करण्याचा प्रयत्न स्वरुपानंद देशमुख यांच्या उमेदवारीने फसला.
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, पण ती त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून, राजकारणासाठी नाही, अशी भूमिका स्वरुपानंद यांनी घेतली.
धनंजय देशमुख यांनी यावर पहिल्यादांच भाष्य करतांना माझ्यासाठी भावाला आणि गावाला न्याय मिळवून देणे महत्त्वाचे आहे, अन्यथा मीच उमेदवार राहिलो असतो, असे स्पष्ट केले. अश्विनी देशमुख यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार स्वरुपानंद देशमुख यांनी अठरा महिन्यात तुम्हाला कोणती कामे पूर्ण करायची आहेत? मग साडेतीन वर्ष सत्ता असताना काय केले? असा सवाल करत टीका केली आहे. या आरोपावर स्वरुपानंद देशमुख यांना उत्तर गावकरीच देतील, अशा मोजक्या शब्दात धनंजय देशमुख यांनी भाष्य केले.
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खटल्याची आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होती. यावेळी तिथे हजर असलेल्या धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना मस्साजोग सरपंच पदाच्या निवडणूक आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर आपली भूमिका स्पष्ट केली. स्वरूपानंद देशमुख काय बोलतात त्याच्या बोलण्याकडे मी जास्त लक्ष देत नाही. स्वरूपानंद देशमुख यांना स्वाभिमानी मस्साजोगची जनता उत्तर देईल.
मला केस महत्त्वाची आहे, माझ्या भावाला आणि गावाला न्याय देणे महत्त्वाचे आहे. नाहीतर मीच उमेदवार झालो असतो. मात्र या गोष्टी मला संयुक्तिक वाटल्या नसत्या. माझ्या कुटुंबावर कोणीही बोलण्याचा प्रयत्न करू नये, 28 तारखेला सर्व काही मतदानातून स्पष्ट होईल. स्वरूपानंद देशमुख यांना कोणी उभे केले यावर निकालानंतर वहिनी आणि मी स्पष्टीकरण देऊ, असेही धनंजय देशमुख म्हणाले.
माझ्या भावाने दलित बांधवांसाठी प्राणाची आहुती दिली. बिनविरोध निवडणूक होण्यासाठी बैठकीत मी रस घेतला नाही. मात्र, याचे उत्तर येणार्या आठ-दहा दिवसात मिळेलच, त्यावर चर्चा करणे उचित नाही. राजकारण या ठिकाणी दुय्यम स्थानी आहे. माझ्यासाठी केस हा महत्त्वाचा पार्ट आहे. त्यावर जास्त फोकस आहे. 29 तारखेला सविस्तर यावर उत्तर देईल.
स्वरूपानंद देशमुख यांना जो कोणी पाठिंबा देईल ते जाहीर होईल, गुपित पाठिंबा देणार नाही. लोकशाहीत प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र आहे. पीडित कुटुंबाबद्दल बोलणे, खोटे आरोप करणे हे कितपत योग्य आहे? हे ज्याला त्याला कळाले पाहिजे, अशी नाराजीही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली. येणाऱ्या काळात सर्व प्रश्नांची उत्तर देणार असल्याचेही ते म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटल्यात आरोपींच्या वकिलांकडून वारंवार तारीख टाळण्याचा आणि केस पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.
लॅपटॉपमधून जो डेटा रिकव्हर झाला आहे आणि जो दिसतो आहे, तोच पुरावा म्हणून वापरला जाणार असे लेखी स्वरूपात देण्यात आले असताना आरोपींच्या वकिलांकडून प्रत्येक तारखेला काहीतरी खोडा घालून तारीख कशी टळेल, याचा प्रयत्न केला जात आहे.
परंतु, पुढील तारखेत काही तरी निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे. विष्णू चाटेच्या अर्जावर वकिलामार्फत म्हणणे मांडले जाईल, अशी माहितीही धनंजय देशमुख यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.