

Operation Tiger Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडताना खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर कोणतीही टीका करणार नाही, अशी संयमी भूमिका घेतली होती.
मात्र राज्यातील झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये आता बंडखोर खासदारांची रणनीतीही बदलताना दिसत आहे. आतापर्यंत शांत असलेले सहा बंडखोर खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता शिवसेना ठाकरे पक्षाला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आज दुपारी धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत ‘निष्ठेची वज्रमूठ’ मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ही सभा खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या लोकसभा मतदारसंघात होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सभेपूर्वी प्रतिक्रिया देताना राजेनिंबाळकर यांनी, मी सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांच्या अडचणी सोडवणारा माणूस आहे. माझ्यावर होणाऱ्या टीकेला आता शब्दांनी नाही, तर कामातून उत्तर देणार आहे, असे स्पष्ट केलं.
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी महाराष्ट्रातील राजकारण आणखी रंगले आहे. राज्याच्या वाट्याला दोन मंत्रिपदे येणार असल्याची चर्चा सुरू आहे. याचवेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने राबवलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून, सहा खासदार फोडण्यात यश आल्याने केंद्रात शिंदे गटाला मंत्रिपदाचे बक्षीस मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.
या संपूर्ण घडामोडीत सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे खासदार ओम राजेनिंबाळकर! त्यांच्यासोबत खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. मात्र या चर्चांवर प्रतिक्रिया देताना राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट सांगितले, मंत्री होणं ही माझी प्राथमिकता नाही. आता मी सत्तेच्या बाजूला आलो आहे, त्यामुळे मतदारसंघातील विकासकामे आणि लोकांची कामे पूर्ण करणं हेच माझं पहिलं उद्दिष्ट राहणार आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे बंडखोर खासदारांमध्ये स्पष्ट अस्वस्थता दिसत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे शिवसेनाही पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. खासदार डाॅ. शिंदे यांचा राज्यभर ‘शिवसंवाद दौरा’ सुरू करण्यात आला आहे. शिंदे शिवसेनेकडून दावा केला जात आहे की, खासदारांनंतर आता शिवसेनेतील ठाकरे पक्षातील काही आमदारही फुटू शकतात.
या सगळ्या राजकीय नाट्यामध्ये आणखी एका घडामोडीने चर्चांना उधाण आले. राज्यातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत् देवेंद्र फडणवीस यांचा एकत्र विमानप्रवास झाल्याने शिंदे शिवसेना अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. यावरून शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, खासदार डाॅ. शिंदे यांच्यासह शिंदे शिवसेनेतील अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. यातून शिवसेना ठाकरे सेना पक्षालाच डिवचण्यात येत आहे.
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्याने महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष आता केवळ पक्षांतर्गत राहिलेला नसून, पुढील काही दिवसांत तो राज्याच्या सत्तासमीकरणांवर थेट परिणाम करणारा ठरू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.