जालना : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या नातवावर टीका केली. यावरून टीकेची झोड उठत असतांनाच आता छत्रपती संभाजीराजे यांनी देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. बदनापूर येथे आयोजित स्वराज्य संघटना प्रणित छावा क्रांतिवीर सेनेच्या मराठा दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
दीड वर्षाच्या मुलावर टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. (Marathwada) स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Chhatrapati Sambhajiraje)संभाजीराजे म्हणाले, सुसंस्कृत महाराष्ट्रात राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. दसरा मेळाव्यात विचारांची देवाण-घेवाण होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहास हा वैभवशाली आहे. मात्र या राज्यात सध्या राजकारणाची पातळी कमालीची खाली आली आहे. काल - परवा झालेला दसरा मेळाव्यात लोकांना चांगल्या विचारांची देवाण - घेवाण होईल असे अपेक्षित असताना त्यात खालच्या पातळीवर टीका करण्यात आली.
अगदी दिड वर्षाच्या मुलावर टीका करणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नव्हे, महाराष्ट्रातील लोकांना खोके व गद्दार असे शब्द जर ऐकण्यास मिळत असतील तर राजकारण कोणत्या थराला जात आहे, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. आम्हाला स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण करायचे आहे.
'गाव तिथे शाखा आणि घर तिथे स्वराज्य' असा आमचा उद्देश्य आहे. मला जे प्रेमाने बोलवतात तिथे जाणे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज मोहीम फत्ते झाल्यानंतर त्या ठिकाणी ठाणेदार नेमायचे त्याच धर्तीवर आम्ही स्वराज्य संघटनेचे शाखा प्रमुख नेमत आहोत. विस्थापित, कष्टकरी, शेतकरी अशा विविध समाज घटकांसाठी आमची संघटना काम करणार आहे.
आमचा हेतू हा सामान्य लोकांना न्याय देण्याचा असणार आहे. मात्र कुणी आमच्या वाट्याला जाल तर ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाल्याशिवाय देखील राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आमची संघटना सर्वसामान्य लोकांच्यासाठी दबावगट म्हणून काम करणार आहे. अर्थात चांगले काम करणाऱ्याचे सर्वप्रथम कौतुकही आम्ही करू. मात्र चुकीचे काम होत असेल तर आम्ही त्या ठिकाणी जाब देखील विचारल्याशिवाय राहणार नाहीत.
आम्हाला कुठेही राजकारण करायचे नाही, आम्हाला लोकांची निःस्वार्थ सेवा करायची आहे. संपूर्ण बहुजन समाज एका छताखाली कसा आणता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचेही संभाजीराजे यांनी सांगितले. सहावी राज्यसभेची जागा कुठल्याच पक्षाची नव्हती, ती समाजात चांगले काम करणाऱ्या माणसाला द्यावी, अशी माझी भूमिका होती. मात्र यावर झालेले राजकारण अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. पुढे त्यांचे काय झाले? या खोलात मी जाऊ इच्छित नाही.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण केले. त्याची समाजातील सर्वसामान्य लोकांनी दखल घेतली. अगदी बदनापूर येथे याच कार्यक्रमात एका मुलीने मला माझ्या उपोषणबाबतची भावना बोलून दाखवली. राज्यातील गडकोट, किल्यांसाठी कोणत्या पक्षाने काय केले? ते सांगावे. यासाठी मी ठोस भूमिका घेतली असून यापुढेही ५० गडकोट, किल्यांचे संवर्धन करणे हा माझा प्रयत्न असणार आहे.
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर व संतांचा वैभवशाली वारसा लाभला आहे. आपले राज्य सुसंस्कृत असल्यामुळे इतर राज्ये आपला आदर्श घेत असतात. मात्र सध्याचे राजकारण महाराष्ट्राला शोभणारे नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.