योगेश पायघन
Marathwada Politics : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65 वा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. त्यानंतर आता राजकीय कुरघोडी आणि मानपान नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी या कार्यक्रमात प्रोटोकाॅलचा भंग झाल्याचा आरोप करत कुलगुरूंना जाब विचारणार असल्याचे म्हटले आहे.
मी पदवीधरांचा आमदार, माजी व्यवस्थापन, अधिसभा सदस्य असूनही मला समारंभाचे साधे निमंत्रणही नव्हते. या उलट शिक्षण क्षेत्रात ज्यांचे कुठलेही योगदान नाही, केवळ ते राज्यसभेचे खासदार आहेत म्हणून डाॅ.भागवत कराड (Bhagwat Karad) यांना थेट व्यासपीठावर बसवले. तर परीक्षा नियंत्रक आणि प्र कुलगुरूंना प्रेक्षकांत बसावे लागले. नियमानुसार ते व्यासपीठावर असायला हवे होते. हे मराठवाड्यासाठी अपमानास्पद असून इथल्या शैक्षणिक क्षेत्राचा हा अपमान आहे.
हा कुण्या एका पक्षाचा कार्यक्रम नव्हता, यात राजशिष्टाचाराचा भंग झाला आहे, अशा शब्दात सतीश चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. दीक्षांत समारंभात प्रोटोकॉलचा भंग झाला आहे. (NCP) तो, कुलगुरू कार्यालयाने केला की, कुलपती कार्यालयाने केला अथवा उपराष्ट्रपती कार्यालयाची परवानगी घेवून केला, याचा जाब कुलगुरूंना 27 फेब्रुवारी रोजी भेटून विचारणार असल्याचे सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे. मी मराठवाडा पदवीधरांचा प्रतिनिधी, माजी व्यवस्थापन, अधिसभा सदस्य असून साधे निमंत्रण देण्याची तसदी विद्यापीठाने घेतली नाही.
काही व्यवस्थापन परिषद सदस्यांना पास नव्हते. तरी, ते कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात स्थान मिळू नये हे चुकीचे आहे. शिवाय निमंत्रितांनाही ताटकळत बसावे लागले. डॉ. भागवत कराड यांचे शैक्षणिक क्षेत्रासाठी योगदान काय? असो ते उपराष्ट्रपतींच्या सभागृहाचे सदस्य असतील म्हणून त्यांना व्यासपीठावर बसवले असेल. पण, ते कोणत्या अधिकारात बसवले? असा सवालही सतीश चव्हाण यांनी केला.
पाण्यासाठी विखे, थोरात एकत्र येतील..
जायकवाडी धरण बांधले तेव्हा निळवंडेचे नियोजन नव्हते. ते 11 टिएमसीचे धरण वरच्या भागात झाले. पश्चिम महाराष्ट्रातील नेते पक्षभेद विसरून पाणीप्रश्नावर एकत्र येतात. निळवंडेवरून भांडणारे विखे, थोरात गोदावरीच्या पाणीप्रश्नावर एकत्र येवू शकतील. आपल्याकडे तशी परिस्थिती नाही. खरा प्रश्न किती पाणी सोडतात हा नाहिच. सोडलेले पाणी प्रत्यक्षात आपल्याला किती मिळतेय हा आहे. कारण पाणी सोडल्यावर ते आधी तिकडचे बंधारे भरून घेतात, त्यामुळे आपल्याला पाणी कमी मिळते, असा दावा सतीश चव्हाण यांनी केला.
भाग, भावली, वाकी, मुकने ही चार धरणे फक्त मराठवाड्यासाठी बांधली आहेत. गंगापुर व वैजापुर तालुक्यातील या धरणातील पाणी देणे गरेजेचे असतांना ते शहापुर तालुक्यासाठी देण्यात येते. त्यांना इतर धरणे असतांना या धरणांवर पाण्याचे आरक्षण का? हा मुळ प्रश्न आहे. पाणीच नाही तिथे साठ टक्क्यांचा विषय कुठे येतो? आपल्यासाठी सोडलेले पाणी पोहचल्यावर ते पाणी मोजणे गरजेचे. पश्चिम वाहिनीचे पाणी येत नाही तो पर्यंत पाणीप्रश्न सुटण्याची शक्यता वाटत नाही, असेही सतीश चव्हाण म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.