

Marathwada Political News : परळीत शुक्रवारी शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. अपहरण करून एका टेकडीवर नेत त्याला पट्टा, लोखंडी राॅड आणि काठीने मारहाण करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खूनाची दहशत अद्याप कायम आहे. त्यात पुन्हा एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण आणि तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू, अशी दिलेली धमकी यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी उपचार घेत असलेल्या शिवराज दिवटे याची अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली. (Beed News) ही मारहाण आणि दिवटेला देण्यात आलेली धमकी हा गंभीर प्रकार आहे. ज्या आरोपींनी ही अमानुष मारहाण केली ते कोणाच्या जवळचे आहेत, हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे, असे सांगत धनंजय देशमुख यांनी सूचक इशारा दिला आहे.
आरोपींनी ज्या पद्धतीने शिवराज दिवटे याला मारहाण करत त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला, ते पाहता या टोळक्याचा वाल्मीक कराड (Walmik Karad) गँगशी संबंध असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच धनंजय देशमुख यांनी थेट भाष्य करत तशी शक्यताही बोलून दाखवली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पाच महिने झाले आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप पोलीसांच्या हाती लागलेला नाही. अशात परळीत घडलेल्या शिवराज दिवटे मारहाणप्रकरणाने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरून गेला आहे.
शुक्रवारी (16 मे) परळीत शिवराज दिवटे या तरुणाला एका टोळक्याने अपहरण करुन डोंगराळ भागात नेत जबर मारहाण केली. लोखंडी रॉड आणि कत्नीने मारहाण करत याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा असं आरोपी म्हणत असल्याचे शिवराजने माध्यमांसमोर सांगितले. त्याच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, धनंजय देशमुख यांनी शिवराज दिवटे याची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली.
दिवटेला मारहाण करणारे आरोपी हे अज्ञानी आहेत, त्यांना भविष्याची चिंताही वाटत नाही. त्यांना ज्यांनी कुणी ह्या चुकीच्या गोष्टी करायला सांगितल्या आहेत, त्यांना प्रशिक्षण दिलं आहे, हे कालच फोटोमधून समोर आलं आहे. हे लोक कोणासोबत राहतायत, हे समोर आलं आहे. या चुकीच्या घटना कधी बंद होणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मी याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहे. जे जिल्ह्यामध्ये घडतंय याची कल्पना त्यांना आहे का नाही? यावरही बोलणार आहे.
आरोपीला जातपात धर्म नसतो, त्यामुळे हा विषय इथे येत नाही. पण आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. शिवराजला भेटलो, त्याच्या डोक्याला मार आहे. डोळेही लाल आहेत, हाताने बचाव केल्यामुळे तो वाचला, त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक आल्याने त्याचा जीव वाचला. मात्र हे सगळं भयावह आहे, बीड जिल्ह्याचं नाव खराब करणार आहे. बीडची तुलना बिहारशी केली जाते, हे थांबवणे गरजेचे आहे.
बीडचे पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षकांनी यासाठी कठोर पावले उचलली पाहिजे. आरोपींना मकोका लागला पाहिजे, अशी मागणी करतानाच पोलीस अधीक्षक चांगलं काम करत आहेत. मात्र खालची पोलीस यंत्रणा कुचकामी असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला. पोलीस दलात चुकीचे पायंडे पडलेले आहेत, ते थांबणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.