औरंगाबाद : शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या औरंगाबादेत आता सगळे काही अलबेल नाही. (Shivsena) पक्षांतर्गत कुरबुरी, गटबाजी, सामान्य शिवसैनिकांना नेत्यांकडून न मिळणारी मानाची वागणूक ते पक्षविरोधी कारवाया असे अनेक प्रकार गेल्या काही वर्षात समोर आले. (Marathwada) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला पक्षातीलच नेत्यांनी केलेली गद्दारी हे प्रमुख कारण असल्याचेही बोलले जात होते.
त्यावर सध्या सुरू असलेल्या शिवसंपर्क मोहिमेत करण्यात आलेल्या तक्रारीने शिक्कामोबर्तच झाले आहे. मराठवाड्यासह औरंगाबादेत सध्या शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत (Mp Vinayak Raut) यांच्या नेतृत्वाखाली शिवसंपर्क अभियान सुरू आहे. यासोबतच जिल्ह्यातील पक्ष बांधणी, संघटनेचा आढावा घेण्यासाठी एक पक्षनिरीक्षकांचे पथक देखील शिवसेना स्टाईलने माहिती गोळा करत आहेत.
तर या शिवसंपर्क अभियनात शिवसैनिकांनी थेट वरिष्ठ नेत्यांविरुद्धची तक्रार मोहिमच सुरू केल्याचे दिसून आले आहे. विनायक राऊत यांच्यासोबत झालेल्या अनौपचारिक चर्चेत शिवसैनिकांनी स्थानिक नेत्यांसोबतच थेट जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याविरोधातही तक्रारी केल्या.
पालकमंत्री सामान्य शिवसैनिकांना भेट देत नाहीत,त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत, याचा समावेश होता. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांमधील विसंवाद याचा आम्हाला खूप त्रास होतो, अशी कैफियत देखील काही पदाधिकाऱ्यांनी विनायक राऊत यांच्यासमोर मांडल्याची माहिती आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री असून देखील या सत्तेचा उपयोग सामान्य कार्यकर्त्यांना छोटी-मोठी कामे मिळवण्यासाठी देखील होत नाही.
स्थानिक नेते आमच्या निवेदन, मागण्यांना कचरा समजतात, त्याची दखलच घेत नाही, असा सूर देखील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लावला. नेत्यांनी कार्यकर्त्याना वाऱ्यावर सोडल्यामुळे ते पक्षापासून दुरावत आहेत. बैठका, मेळाव्यासाठीचा खर्च करण्यासाठी नेते खिशाला हात लावत नाहीत, असेही अनेकांनी सांगितले.
एवढेच नाही तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव कधीच झाला नसता, पण पक्षातील काही नेत्यांनी घात केल्यामुळेच आपला बालेकिल्ला ढासाळल्याचे राऊत यांना सांगण्यात आले. त्यामुळे या सगळ्या बाबींचा सविस्तर अहवाल आपण मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे सांगत राऊत यांनी नाराजांची बोळवण केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.