बीड : समाजकारण आणि राजकारणातही मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय कायम अजेंड्यावर असलेल्या विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या आयुष्याचा शेवटही मराठा आरक्षण विषयानेच झाला. आता त्यांचे मराठा आरक्षणाचे स्वप्न कधी पूर्ण होणार हे पहावे लागेल. वास्तविक विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शहरात भव्य तिरंगा फेरी नियोजित होती. (Beed) त्याचे सर्व नियोजन शुक्रवार - शनिवार दोन दिवस खुद्द मेटे यांनी केले.
मात्र, रविवारी मुंबईत अचानक मराठा आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक ठरली. (Marathwada) त्याचा निरोप आल्याने नियोजित तिरंगा फेरी सोडून मेटे मुंबईकडे रवाना झाले आणि काळाने त्यांच्यावर झडप घातली.आपल्या सामाजिक आयुष्याची सुरुवात मराठा आरक्षण विषयाने करणाऱ्या विनायक मेटे यांनी पक्ष कुठलाही असला तरी आपली मराठा आरक्षणाची भूमिका कायम ताठर ठेवली. त्यासाठी आंदोलने, पत्रके, आरोप करताना त्यांनी कुठल्याही परिणामाची तमा बाळगली नाही.
तत्कालिन महाविकास आघाडी सरकारला त्यांनी या विषयाच्या अपयशावरुन कायम धारेवर धरले. आता त्यांच्या विचाराचे सरकार आल्याने मराठा आरक्षण विषय मार्गी लागेल आणि आयुष्यभर ज्या स्वप्नासाठी संघर्ष केला ते पूर्ण होईल, अशी त्यांचीही अपेक्षा होती. मात्र, नेमक्या याच विषयाने त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला. कारण, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सध्या विविध उपक्रम आणि हर घर तिरंगा अभियान सुरु आहे.
दोन दिवसांपूर्वी (शुक्रवारी) जिल्ह्यात आल्यानंतर खुद्द विनायक मेटे यांनी रविवारी शिवसंग्रामच्या पुढाकाराने शहरात भव्य तिरंगा फेरीचे आयोजन केले. शिवसंग्राम भवन येथून रविवारी सकाळी साडेनऊ वाजता निघणाऱ्या या फेरीचे नेतृत्व खुद्द विनायक मेटे करणार होते. त्यासाठी शहरासह तालुकाभरातून शिवसंग्रामचे मावळे दुचाकी घेऊन येण्याचे नियोजन पूर्ण झाले होते. दोन दिवस या नियोजनात मेटे यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. मात्र, रविवारी मुंबईत मराठा आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक ठरली.
शनिवारी रात्री मेटेंना बैठकीसाठी मुंबईला येण्याचा निरोप आला. आपण फेरीत नसलो तरी फेरी निघणारच नव्या सरकारची पहिलीच मराठा आरक्षणाची बैठक असल्याने आपण तेथे आवश्यक असल्याचे मेटेंना वाटले. त्यामुळे आपण फेरीत नाहीत हे कार्यकर्त्यांना कळाले तर नियोजन ढासळेल म्हणून त्यांनी कोणालाही न सांगता मुंबईचा रस्ता धरला आणि वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप मारली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.