नवनीत राणा यांची संजय राऊत, यशोमती ठाकूर यांना हात जोडून विनंती, म्हणाल्या...

अमरावती शहरातील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.
Navnit Rana
Navnit RanaSarkarnama

अमरावती : शुक्रवारी निघालेला मोर्चा आता वेगळ्याच दिशेने निघाला आहे. या घटनेचा सर्वांनी आपापल्या पद्धतीने निषेध केला आहे. सकाळपासून सुरू असलेले आंदोलन चिघळलेले आहे. मात्र सर्वांनी शांततेच्या मार्गाने निषेध करावा. सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करा आणि अमरावतीला शांत ठेवा. तसेच आतातरी राजकारण सोडा, असे म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati thakur) यांना हात जोडून विनंती केली आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही राजकारण सोडले पाहिजे. ही आपली अमरावती आहे. अमरावतीला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करा अशी हात जोडून विनंती करते.

ऐन दिवाळी दरम्यान त्रिपुरा राज्यातील पानीसागर उपविभागात विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान एका मशिदीची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचे त्रिपुरा राज्यासह आता महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहे. मालेगाव, नांदेड, अमरावती या शहरांमध्ये काही या घटनेचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. मालेगाव-नांदेड या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी अमरावतीमध्ये मात्र अजूनही तणाव कायम आहे.

त्रिपुरातील या घटनेविरोधात अमरावती शहरात काल जमात-ए-अहले सुन्नत संघटनेच्यावतीने मुस्लिम समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान काही समाजकंटकांनी जयस्तंभ चौक, चित्रा चौक परिसरातील दुकानावर दगडफेक करून नुकसान केले. या संपूर्ण प्रकारामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आजही शहर बंद दरम्यान राजकमल चौक, जवाहर गेट परिसरात मोठ्या जमावाकडून दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

अमरावतीमध्ये संचारबंदी :

अमरावती शहरातील या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयातर्फे फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (१), (२), (३) अन्वये हा संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी हा आदेश काढला आहे.

गृहमंत्र्यांचे शांततेचे आव्हान -

या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. तसेच यात जे कोणी दोषी आहेत याची चौकशी केली जाईल, कोणालही पाठिशी घातले जाणार नाही, असेही आश्वासन त्यांनी दिले आहे.

ते म्हणाले, अमरावतीमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून इतर ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे. अमरावतीसाठी आवश्यक कुमक तैनात करण्याची सुचना देण्यात आली असून पालकमंत्री यशोमती ठाकुर यांच्या सतत संपर्कात आहे. सर्व राजकीय पक्षांशी बोलून शांतता राखण्यासाठी संवाद साधण्यासाठी त्यांना सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com