
Ahmednagar Crime NCP MLA : अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. गंभीर जखमी असलेल्या चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात विविध कारणांनी वारंवार दोन गटातील हाणामाऱ्या होतात. विविध शस्त्रांचा वापर करून हल्ले आणि निर्घृण खून होतात. शहरातील गुंडांच्या टोळ्यांवर पोलिसांचा कसलाही अंकुश आणि वचक राहिला नसल्याचे द्योतक असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. (Latest Political News)
या पार्श्वभूमीवर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांवर मोठी नाराजी व्यक्त केली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे त्यांच्या अखत्यारीतील पोलीस ठाण्यांवर नियंत्रणाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरात वारंवार होणारे हल्ले, हाणामाऱ्या, चैन स्नॅचिंग, लूटमार अशा घटना घडतात. याला शहरातील अवैध धंदे कारणीभूत आहेत. या अवैध धंद्यांवरील कारवाईबाबत त्या-त्या परिसरातील पोलीस ठाण्यांचे अपयश दिसत असल्याचा आरोप आमदार जगताप यांनी केला आहे. याबाबत राज्याच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून याची माहिती देणार आहे. तसेच कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्याची सूचना करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.
जून महिन्यात गुटख्याच्या अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना दिल्याच्या रागातून ओंकार भागानगरे या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर तलवारीने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता अंकुश चत्तर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाली आहे. भररस्त्यावर घातक शस्त्रांसह लोखंडी रॉड, दांडक्यांनी हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरात अनेक गुन्हेगारी टोळ्यांकडून असे हल्ले आणि हत्या होत आहेत.
युवकांच्या टोळ्यांमार्फत वादातीत जागांवर दमदाटी-दहशत निर्माण करण्याचे सर्रास प्रकार घडत आहेत. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे विक्रम राठोड यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. व्यापारी बाजारपेठेत होणारे हल्ले, हाणामाऱ्या, चैन स्नॅचिंग, बॅगा लंपास करणे अशा गुन्ह्यांत शहरात वाढ झालेली आहे. त्याच बरोबर अवैध दारू विक्री, मटका, अवैध हुक्का पार्लर, गुटख्याची तस्करी आदी प्रकारांनी डोके वर काढलेले आहे. अशा व्यवसायांकडे मात्र पोलिसांची डोळेझाक होत असल्याचा आरोप आमदार जगताप यांनी केला आहे.
गेल्याच आठवड्यात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय यांची माहिती देत पोलिसांना याबाबत आदेश देण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करत शहरात राष्ट्रवादी आणि भाजपच्या गुंड टोळ्यांनी हैदोस घातल्याचा गंभीर आरोप केला आहे. अवैध धंद्यांना पाठबळ राजकीय नेत्यांकडून मिळत असल्याची चर्चा असताना पोलिसांचे होणारे सूचक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.