

Kolhapur District Politics : कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी एकसंध आहे. जिल्ह्यातील सर्व माजी आमदार, कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत, ते माझ्या पोटात आहेत. या सर्वांच्या जीवावरती जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होईल, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांनी एकत्र येत भाजपावर दबाव टाकला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने मंत्री मुश्रीफ यांच्यावर दबाव टाकला आहे. भाजपसोबत मुश्रीफ एकटेच लढताना दिसत आहेत. राजेश पाटील, के. पी. पाटील हे नेते त्यांच्यासोबत दिसत नाहीत. या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले.
मंगळवारी (17 मार्च) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड आहे. लवकरच आमच्या तिन्ही पक्षांच्या बैठकीत निर्णय होईल. महानगरपालिकेत ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त त्यांचा महापौर झाला, तसाच अध्यक्षपदाबाबतही निर्णय व्हावा अशी आमची मागणी आहे. त्यानुसार जिल्हा परिषेदत राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होईल, असे म्हणत गेल्या 2 दिवसांपासून सुरु असलेल्या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याबद्दल दोस्तानाला पूर्णविराम दिला आहे.
गोकुळमधील 1200 सभाससदावरून न्यायालयीन प्रकरणावर बोलताना, निकालाची कॉपी न बघता आपण पत्रकार परिषदा घेता हे बरोबर नाही. मी या केसमध्ये एक पार्टी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीध्ये बिन तारखेच्या पत्राचा माझा उल्लेख झाला. लंपी आजारामुळे राज्यातील दूध संस्था या 50 लिटरची अट पूर्ण करू शकले नाहीत. त्या डबघाईला येतील आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल म्हणून स्थगिती द्यावी अशी विनंती तत्कालीन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केली होती. त्यांनी देखील तात्काळ स्थगिती दिली होती.
त्यांनी ऑर्डर देताना तारीख घातली नव्हती. दोघांच्याही तारखा अनावधानाने राहिल्या होत्या. जॉईंट रजिस्टरच्या पत्रावरती तारखा होत्या. न्यायालयाच्या प्रक्रियेवरती मतप्रदर्शन करायचं नसतं, तरीदेखील मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि सर्व आमदार यांनी अजितदादा पवार यांच्या अपघाताचा तपास हा सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केली आहे. मला विश्वास आहे की, आता सीआयडीचा विश्वासार्ह तपास सुरू आहे.
विमान प्राधिकरण संस्थेमार्फत चौकशी सुरू आहे आणि लवकरच हा तपास सीबीआय कडे जाईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि देशातील जनतेच्या मनात ज्या शंका आहे त्याचा निरसन होईल. रोहित पवारांनी सादर केलेल्या पुराव्यांची दखल तात्काळ घेतली जाईल मुख्यमंत्र्यांनीही त्या संदर्भातील सुतोवाच केले आहे.