केदार दिघेची शिंदेवर टीका : आनंद दिघे हे केवळ तीन-चार जणांत वावरले नाहीत
Shivsena Vs Shinde : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे आज शिर्डी येथे आले होते. त्यांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. केदार दिघे ( Kedar Dighe ) यांनी धर्मवीर चित्रपटावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.
केदार दिघे म्हणाले, शिर्डीच्या साईबाबांनी जगाला प्रत्येक वेळी संकटातून वाचविले आहे. अनेक जण आध्यात्माच्या दृष्टीने आशीर्वाद घ्यायला आपल्या आस्थेप्रमाणे येतात. त्याच पद्धतीने मीही येथे आलो, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, शिवसेना संघटनेमध्ये पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मला ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. त्यांनी टाकलेल्या जबाबदारीला मी खरे उतरावे. आनंद दिघे ज्या पद्धतीने जनतेची अहोरात्र सेवा करायचे त्याच पद्धतीने माझ्या देखील हाताने अशी सेवा घडो. लोकांना न्याय मिळो. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील जनता अनेक संकटांना सामोरी जात आहे. संकटाचे सावट निघून जावोत व लोकांना चांगले दिवस येवोत. लोकांना निरोगी जीवन मिळावे. हेच मागणे मी साईबाबांच्या चरणी केले आहे, असे त्यांनी सांगितले.
मी आनंद दिघे यांचा पुतण्या आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट हिंदुत्त्वाचे विचार माझ्या रक्तात भिनले आहेत. शिवसेने बाबत लहानपणीपासून एक आस्था आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेले नेतृत्त्व त्या अनुषंघाने महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेची सत्ता खऱ्या अर्थाने परत यावी आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान व्हावेत अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माननाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाची आहे. मला वाटते ही शिवसेना त्या विचारांची आहे. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्च्यात सर्व सामान्य शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेऊन आज तागायत चालली आहे. पुढेही उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालीच शिवसेना पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना जिथे आहे तिथेच आहे. शिवसैनिकांनी ही संघटना संघर्षातून घडविली. त्यामुळे शिवसेना व शिवसैनिकांना संघर्ष नवीन नाही. शिवसैनिक खमक्या आहे. व्यासपीठावरून चार-दहा जण गेले तरी व्यासपीठा पुढे असलेली 40 लाख व चार कोटी जनता ही शिवसेनेशी बांधील आहे. उद्धव ठाकरेंवर त्यांचा विश्वास आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे जिल्ह्यात ज्या लोकांनी आनंद दिघेंवर आतोनात प्रेम केले. त्यांची निष्ठा शेवटपर्यंत शिवसेना, बाळासाहेब ठाकरे व भगव्या प्रती होती. हे ज्या लोकांनी पाहिले आहे. अनुभवले आहे. ते लोक सदैव शिवसेने बरोबर राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धर्मवीर चित्रपटा विषयी त्यांनी सांगितले की, हा चित्रपट व्यावसायिक आहे. आनंद दिघे हे केवळ तीन-चार जणांत वावरले नाहीत. त्यांनीच त्यांच्याच आयुष्यात बदल घडविला असे नाही. आनंद दिघे यांचे चाहते महाराष्ट्रभर आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक लोकांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला आहे. त्यांच्या जीवनावरील चित्रपट तीन तासाचा नसू शकतो. त्यांचे जीवन चित्रीत करायला मालिका करावी लागेल. ती मालिका सत्यात असावी. त्यांच्या बरोबर राहिलेल्या सर्वांचा विचार करून जीवनपट चित्रीत व्हायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिंदे गटाने तयार केलेल्या प्रती शिवसेना भवनाबाबत ते म्हणाले की, कोणतेही प्रतीभवन त्यांनी तयार केले तरी देव देव्हाऱ्यात राहिल्या शिवाय देवळाला महत्त्व येत नाही. तसेच सेना भवनाचे आहे. ते रचलेय बाळासाहेब ठाकरे यांनी. बाळासाहेबांमुळे लोक तिथे आस्थेने येतात. या पुढे ही येतील. असे अनेक नावांनी वास्तू उभ्या केल्या तरी सेना भवनाचे महत्त्व तसेच राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.