

Gokul Election : गोकुळ दूध संघाचे माजी संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी नुकताच जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. आगामी निवडणुकीच्याआधीच हा पक्षप्रवेश झाल्याने काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो. शिवाय या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः शाहुवाडी तालुक्यातून काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झाला आहे.
विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक समीकरणांमुळे विविध ठिकाणी आघाडी केल्याने कोल्हापूरमध्ये आधीच काँग्रेसची ताकद घटली आहे. अशात सहकारात महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसवर आघात करण्याचे काम महायुतीमधील घटक पक्षांकडून सुरू आहे.
यापूर्वी चंदगडमध्ये काँग्रेसचे आप्पा पाटील आणि गोकुळचे माजी संचालक चेतन नरके हे भाजपमध्ये गेले होते. आता गायकवाड यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला आगामी काळात मोठे राजकीय चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे. यातून जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार असल्याचे दिसून येते.
गोकुळच्या राजकारणावर परिणाम :
गोकुळच्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाला किती जागा मिळणार हा प्रश्न होता. पण मागील फॉर्मुल्याला प्राधान्य देत दोन जागा निश्चित राहिल्यास, शाहूवाडी तालुक्यातून गायकवाड यांची जागा पक्की व्हावी यासाठी त्यांनी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बैठकीतून समोर आले.
दुसरीकडे, जनसुराज्य पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य यांनीही गोकुळाच्या उमेदवारीवर दावा ठोकला होता. मात्र, कर्णसिंह गायकवाड यांच्या या निर्णयामुळे त्यांचा दावा ही केवळ एक राजकीय चाल होती का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
जनसुराज्य पक्षाला आपली ताकद वाढवायची असेल तर कर्णसिंह गायकवाडांच्या प्रवेशाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळेच सर्जेराव पाटील यांची मागणी पुढे करून वातावरण अस्थिर केले गेले आणि गायकवाड यांच्यासमोर प्रवेशाची अट ठेवली गेली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातून पक्ष मजबुतीची चाल यशस्वी करण्याचाही हेतू असावा, अशी चर्चा आहे.
सर्जेराव पाटील यांना विधानसभेचं तिकीट?
दुसऱ्या बाजूला गोकुळमध्ये कर्णसिंह गायकवाड यांना जागा आणि बदल्यात सर्जेराव पाटील यांना मतदारसंघ विभक्त झाल्यास आमदारकीचे तिकीट, असे काही साटेलोटे झाले आहे का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जर शाहूवाडी व पन्हाळा तालुका विभक्त झाला, तर जनसुराज्य पक्षाकडून आमदारकीचे तिकीट नेमके कोणाला मिळणार, हा मोठा प्रश्न आहे.
पक्षाचे संस्थापक व विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे हे स्वतः निवडणूक लढवणार की कर्णसिंह गायकवाड यांना गोकुळच्या राजकारणात गुंतवून सर्जेराव पाटील यांना आमदारकीचे उमेदवार म्हणून पुढे आणणार, या प्रश्नाचे उत्तर येत्या काळातच स्पष्ट होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम :
स्थानिक निवडणुकांमधील समीकरणांमुळे काँग्रेस पक्षाचे अधिकृत चिन्हच गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुरगूड, पेठ वडगाव, शिरोळ, गडहिंग्लज, पन्हाळा, चंदगड आणि जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने अन्य पक्षांशी आणि स्थानिक आघाड्यांशी हातमिळवणी केल्याने पक्षाचे चिन्ह दिसले नाही. जयसिंगपूरमध्ये काँग्रेसने भाजप आणि स्वाभिमानीशी आघाडी केली होती, तर गडहिंग्लजमध्ये काँग्रेसला मानणाऱ्या कुऱ्हाडे गटाने जनसुराज्य, जनता दल आणि भाजपशी आघाडी केली होती.
तसेच, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ४६ वर्षांनंतर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे 'हात' चिन्ह पाहायला मिळाले नाही. इचलकरंजीवर नेहमीच काँग्रेसचा दबदबा राहिला होता. मात्र, यंदा ही जागा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यामुळे काँग्रेसच्या हातातून हा मतदारसंघ गेला. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते पूर्णपणे बॅकफूटवर गेले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.