अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था आदींच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू केली आहे. या निमित्त ते दोन दिवस अहमदनगर जिल्ह्यात आले आहेत. त्यांनी ही यात्रा सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारे विभागाची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली.
पत्रकारांनी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रभाग आरक्षण, स्वबळावर निवडणूक लढण्या संदर्भात मांडलेल्या मतांबाबत विचारले असता पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. महाविकास आघाडी बाबतची आपली धोरणे निवडणुका घोषित झाल्यावर स्पष्ट करतो. तो पर्यंत त्यांनी कार्यकर्त्यांना उत्साह वाढविण्यासाठी स्वबळाची भाषा वापरली असेल. राष्ट्रवादीची भूमिका तिन्ही पक्षांना एकत्रित ठेवण्याची आहे. पण स्थानिक पातळीवरचा अभ्यास करून महाविकास आघाडी कशी राहिल या दृष्टीने काम करणार आहोत.
काँग्रेसच्या भूमिके बाबतचा गौप्यस्फोट
स्थानिक स्वराज्य संस्थेतील तीन सदस्य प्रभाग रचनेत काँग्रेसच्या नेत्यांनीच चार सदस्य प्रभाग रचनेची मागणी केली होती. राष्ट्रवादीला 2 सदस्य प्रभाग रचना पाहिजे होती. मात्र एकत्रित बसून मंत्रिमंडळाचा झाला तर तो आमचा सर्वांचा निर्णय असेल, असा गौप्यस्फोट करत जयंत पाटील यांनी काँग्रेसच्या भूमिकेत एक वाक्यता नसल्याचे स्पष्ट केले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्ह्यात येत नसल्याबाबत विचारले असता जयंत पाटील यांनी सांगितले की, मी दोन दिवस जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. मुश्रीफ जिल्ह्याला वेळ देत नसल्याबाबत कार्यकर्त्यांनी काही सांगितलेले नाही. या संदर्भात मुश्रीफ यांच्याशी चर्चा करतो. ते येऊ शकले नसले तरी काम थांबलेले नाही, असा माझा अंदाज आहे, अशी सारवा सारव त्यांनी केली.
ईडी, सीबीआयच्या माध्यमातून भाजपचे षडयंत्र
ईडीच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिलेल्या नोटिसांबाबत विचारले असता जयंत पाटील यांनी म्हणाले, ईडी, सीबीआयच्या माध्यमातून भाजप राज्य सरकारला बदनाम करण्याचे काम करत आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जमीन खरेदीचे व्यवहार बँकेच्या पैशातून आहेत. तरीही त्यांच्यावर मनीलाँड्रिंगचा आरोप केला जात आहे. मनीलाँड्रिंग केली असेल तर त्यांच्या जावयाने कर्ज का घेतले. त्याचे हप्ते महिन्याच्या महिन्याला भरून कर्ज का फेडले असते. तसाच प्रकार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाबतचा आहे.
भाजपमध्ये गेलेल्यांना ईडीनेच नोटिसा दिल्या होत्या. मग आता भाजपमध्ये गेलेल्यांना प्राप्तिकर विभाग, सीबीआयचे संरक्षण कसे. कुणी पैसे दिले नाही. अथवा घेतले नाहीत. केवळ आरोपांवरच ईडी, सीबीआयचे चौकशी सत्र मागे लावले जात आहे. भाजपमधीलच दोन लोकांच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यातून हे भाजपचे षडयंत्र समोर येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमाणेच राज्यातील राष्ट्रवादीचे मंत्री ठामपणे ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. भाजप हे ईडी, सीबीआय चालवित आहे काय असा संशय येतो. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना ईडीच्या कारवाई विषयी आधीच कसे कळते, असा प्रश्नही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.