राजेंद्र त्रिमुखे :
Ahmednagar News: अमरनाथ यात्रेकरीता गेलेल्या भाविकांना संकटकाळात मदत व्हावी म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थेट जम्मू कश्मीर राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून सहकार्य उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. राज्यपाल सिन्हा यांनीही अडकलेल्या भाविकांसाठी तातडीची मदत पुरवल्याने नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील भाविकांचा परतीचा मार्ग अखेर सुकर झाला आहे.
अमरनाथ आणि वैष्णोदेवी यात्रेकरीता श्रीरामपूर, कोल्हार, लोणी या भागातील असंख्य नागरीक गेले होते. मात्र, जम्मू आणि कश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी झाल्याने तसेच पावसामुळे श्रीनगर ते जम्मू या मार्गावरील रस्तेही खचल्याने सर्व भाविकांना अडकून पडावे लागले.
अडकलेल्या भाविकांना लष्कराच्या सहकार्याने आहे, त्या परिस्थितीत उपलब्ध ठिकाणी मुक्कामही करावा लागला. या भाविकांपैकी अनेकांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी थेट संपर्क साधला.
असलेल्या परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांनी जम्मू-कश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून भाविकांना सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली.
राज्यपाल सिन्हा यांनीही महाराष्ट्रातील सर्वच भाविकांना मदत करण्याची ग्वाही देत नगर जिल्ह्यातील भाविकांनाही मदत करण्याचे आश्वासित केले. काही वेळातच या भाविकांपर्यंत यंत्रणा पोहोचली असल्याचेही त्यांनी मंत्री विखे पाटील यांना सांगितले.
दरम्यान, मंत्री विखे पाटील यांनी मदतीबद्दल राज्यपालांचे आभार मानले. या भागातील परिस्थिती आता निवळत असून लष्कराने विविध ठिकाणांहून मार्गांची उपलब्धताही करुन दिल्याने हे सर्व भाविक सुखरुपपणे परतीच्या प्रवासासाठी निघाले असल्याबाबतही सांगण्यात आले आहे.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.