

Solapur, 02 March (विठ्ठल सुतार) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाला प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले आहे, त्यामुळे भाजपचा पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार याची मोठी उत्सुकता जिल्ह्यात आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील भाजपचे आजी आणि माजी आमदारांना भेटीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारचा (ता. ४ मार्च) वेळ दिला आहे. या बैठकीतच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी याबाबतची माहिती दिली असून जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे मुंबईत बुधवारी होणाऱ्या बैठकीकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या (Solapur Zilla Parishad) निवडणुकीत एकूण ६८ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ३८ जागा जिंकल्या आहेत. तसेच, काही तालुक्यांत त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केलेली आहे. त्यामुळे भाजपकडे ऐतिहासिक बहुमत आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडी येत्या २० मार्चपर्यंत करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत काय होणार, याची उत्सुकता असणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, तर माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत हे येत्या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. जिल्हा परिषदेच्या निकालनंतर भाजपचे हे नेते प्रथमच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.
या भेटीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा परिषद अधक्ष, उपाध्यक्षपदाबाबत आमदार आणि माजी आमदारांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरच ही स्वतंत्र बैठक होणार असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाने बार्शी, उत्तर सोलापूर तालुक्यातील झेडपीच्या सर्वच सर्व जागा जिंकलेल्या आहेत. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातही भाजपने दमदार कामगिरी केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजपर्यंत दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि बार्शी या तीन तालुक्यांना अध्यक्षपद मिळालेले नाही. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमध्येही आमदारही भाजपचे आहेत.
बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तर झेडपी आणि पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकल्या आहेत, तसेच बार्शी बाजार समिती आणि नगरपालिकाही एकहाती जिंकली आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बार्शी, अक्कलकोट किंवा दक्षिण सोलापूर या तालुक्यांकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव असून, तीनही तालुक्यांत ओबीसी सदस्य विजयी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.