
भुईंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तांतरांनंतर कार्यक्षेत्रातील सभासद, शेतकरी, कामगार यांना आम्ही आवाहन केल्यानंतर भागभांडवल वाढीसाठी मिळणारा प्रतिसाद व गावोगावचा उत्साह यामुळे आपण नक्कीच येणार हंगाम यशस्वी करू. त्याही पुढे जावून तुम्ही सर्वांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवत किसन वीर कारखान्याचे गतवैभव पुन्हा नव्याने निर्माण करू, असा विश्वास किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष व आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केला आहे.
भुईंज (ता. वाई) येथे किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद, शेतकरी, कामगार यांच्या सहविचार बैठकीत आमदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार तर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, संचालक प्रकाश धुरगुडे उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, किसन वीर कारखान्याचे आगामी भवितव्य आपणा सर्वांच्या सहकार्याने नक्कीच चांगले होणार आहे. प्रतिकुल परिस्थितीतून कारखाना सुरू करण्यासाठी हवे असणारे भाग भांडवल आपण संकलित करीत आहोत. मी व माझ्या सहकारी यांनी आपणास आवाहन केल्यानंतर मिळणारा प्रतिसाद नक्कीच कौतुकास्पद आहे. भुईंज गावाने व कार्यकर्त्यांनी दोन पाऊले पुढे जात सर्वाधिक भाग भांडवल जमा करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी कारखान्याच्या प्राप्त परिस्थितीचा लेखाजोगा मांडताना आपण कसे उभे राहू शकतो व त्यासाठी राजकारणी विरहीत सर्वांनी शेअर्स घेवून सामुदायिक आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ कार्यकर्ते अशोकराव जाधवराव व मधुकाका भोसले यांनी स्वागत केले. कार्यक्रमास दिलीप बाबर, कांतीलाल पवार, सुधीर भोसले पाटील, नारायण नलवडे, सुजीत जाधवराव, प्रकाश पावशे, बाळासाहेब जाधवराव आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.