बोट दाखवणाऱ्यांना शाहिस्तेखानासारखी धडकी भरवावी लागणार : उदयनराजेंचं शिवरायांना भावनिक पत्र!

Udayanraje Bhosale : महाराज, आम्ही आपल्याला वचन देतो की, कोणत्याही महापुरुषांचा कोणत्याही प्रकारचा अवमान आता सहन केला जाणार नाही.
Udaynraje Bhosale Emotional letter
Udaynraje Bhosale Emotional letterSarkarnama

Udayanraje Bhosale : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून यावर तीव्र प्रतिक्रियी उमटल्या. शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनीही आक्रमक होत आता, कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याती मागणी केली. मात्र अजूनही याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. आता उदयनराजे यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहीले आहे. यामध्ये त्यांनी भावनिक होत शिवाजी महाराजांशी संवाद साधणारं पत्र लिहले आहे.

उदयनराजे भोसले यांनी शिवरायांना लिहलेले भावनिक पत्र ;

आज खूप गरज वाटतेय आपल्याशी बोलायची, आम्ही आपल्याशी अंश वंश नाही तर आपला एक सर्वसामान्य मावळा म्हणून, एक शिवभक्त म्हणून बोलतोय. आपण स्वराज्याचा पाया रचला. त्याला पावणेचारशे वर्षे झाली. एवढ्या वर्षात आम्हाला कुणाला आपल्याकडे वेदना मांडण्याची अथवा व्यथा लिहिण्याची वेळ आली नाही. कारण आपण रयतेसाठी इतके मोठे स्वराज्य निर्माण केले, ते स्वराज्य म्हणजेच आपला महाराष्ट्र आपला हिंदुस्थान आपण घालून दिलेल्या आदर्शांवर चालवला जात होता किंवा तसा आभास तरी होत होता. अलिकडच्या काळात हद्द झाली. विचारांचा कडेलोट हो ण्याची परिस्थिती उद्भवतेय की काय अशी रास्त भीती निर्माण झाली.

अठरा पगड आणि बारा बलुतेदार यांना घेवून निर्माण केलेल्या स्वराज्याची आणखी शकले होणार की काय असा विचार येवून मन विषण्ण झाले. म्हणूनच फक्त मनमोकळ करायला लिहितोय, मनोमन समक्ष उपस्थित राहुन हितगुज साधण्याचा प्रयत्न करतो. सगळीकडेच अंधार दिसल्यावर आमच्या सारख्यांनी जायचं कुठं? व्यथा मांडायची कुठे? सगळं दिशाहीन झालंय, एकही विश्वासार्थ ठिकाण राहिलं नाही. म्हणून आपल्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी आलोय महाराज.

महाराज आपण या किल्ल्यात पर्वतात नदीत जंगलात, डोंगररांगात मातीच्या प्रत्येक कणात आणि प्रत्येक माणसाच्या मनात आहात. आपल्याबद्दल लिहिल्या, बोलल्या जाणा-या प्रत्येक शब्दात आजही तेवढाच सादर असतो. अभिमान असतो, डोक्यात मोठा आणि छोटा मेंदू, जागच्या जागी असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या समोर नतमस्तक आहे. पण छोटा आणि मोठा सोडून काही मुठभर लोकांच्या डोक्यात एक खोटा मेंदू असतो. टाळू भरताना, सटकन डोक्यावर पडलेली दोन-चार मंडळी आपल्याबद्दल चुकीच्या बाबी प्रचलित करण्याचा प्रयत्न करतात. वाईट वाटतं, विचार स्वातंत्र्यं, भाषा स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखालील विकृती आहे. स्वातंत्र्य नाही तर स्वैराचार आहे. आपल्या विषयी मला वाटेल तसं आणि मनाला येईल तसं वागेन, असं जर कोणी म्हणत असेल तर यांची नांगी जिरवावीच लागेल. हा आपल्या सारख्या विश्वाचं दैवत असलेल्या छत्रपतीचा मुद्दा आहे. यात तडजोड नाही. आपल्यावर आमचा जेवढा हक्क, तेवढा प्रत्येक मावळ्याचा आहे. मायमाऊलीचा हक्क आहे.

Udaynraje Bhosale Emotional letter
"एक सुशी ताई आहेत ज्यांच्या 'वरच्या मजल्यावर' घनदाट 'अंधार' आहे.."

वडीलधा-यांचा आणि सर्वांचाच हक्क आहे म्हणून, आपल्याबद्दल चुकीचे उद्गार काढण्याची हिंमत दाखवणा-या विकृत लोकांना आम्ही थेट उत्तर दिले आहे पण, आम्हाला ही प्रवृत्ती मोठी करायची नाही. मुठभर लोकांच्या मनातील विकृती कायमची ठेचायची आहे. एकट्या दुकट्याची किंवा श्रेय घेण्याची लढाई नाही, ही फक्त मराठी माणसाची लढाई नाही, तर देशाच्या अस्मितेचा लढा आहे, म्हणूनच थेट आपल्याशी संवाद साधतोय. महाराज एक गोष्ट आज पण जाणवली, तुमचे मावळे नावालाच एक आहेत. आमचे गट तट वाढलेत, प्रत्येकाला त्याचा गट, त्याची विचारधारा याचा फायदा बघायचा आहे. हरकत नाही पण एकत्र यायला एक कारण किंवा एक विषय आजही, आम्हाला पुरेसा आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

आता कुठल्या गटाचा असो किंवा कुठल्या जाती-पातीचा असो. जो कोणी आपला मावळा आहे ती आपल्यासाठी एकत्र येणारच आणि या मावळ्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला शिरसावंद्य असेल. पण आपल्या बद्दल एक वाक्य काय, एक शब्द जरी कोणी चुकीचं बोलायची हिंमत केली तर त्याचा आम्ही मुलाहिजा ठेवणार नाही, आपले संस्कार आहेत आमच्यावर.. आजवर कधी कुठल्या कलाकृतीला विरोध केला नाही. राजकारणात सतत आपल्या नावाचा वापर केला जातो.

आपल्या नावाने घोषणा दिल्या जातात. पण आपल्याबद्दल अपशब्द बोलल्यावर राजकारणी मूग गिळून गप्प बसतात, तेव्हा वाईट वाटतं. ऊठसूट आपली तुलना कोणाशीही करणा-यांना इतिहासाचा धडा शिकवावाच लागणार आहे. आजवर आम्ही विचारी लोकांना मान दिला, म्हणून विकृतींना मान देणार नाही. आपल्याला वचन देतो. आपल्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत कुठल्याही महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. आपण आम्हाला स्वधर्माबरोबरच सर्वधर्मसमभावाची शिकवण दिलीय. पहिल्यापासून आम्ही कायम आपल्या मावळ्यांच्या सोबत आहोत आणि जे काही करायचं ते आम्ही एकत्र मिळून करू.

Udaynraje Bhosale Emotional letter
Nitin Gadkari : सांस्कृतिक मंत्री नसूनही सर्वात उत्तम सांस्कृतिक कार्य करत आहेत नितीन गडकरी...

महाराज... आपल्याकडून एक गोष्ट शिकलीय, एकीचा ध्यास असल्या शिवाय चुकीचा इतिहास मिटवता येणार नाही. यात कुठंही राजकारण न आणता एक होण्याची हीच ती वेळ आहे. विकृत लोकांशी कसं वागायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. परंतु इथं काही विकृत माथी आहेत. ती कायमची वटणीवर आणायची आहेत. वारंवार आपल्याकडे बोट दाखवणा-यांना शाहिस्तेखानासारखी कायमची धडकी भरवणारी अद्दल घडवावी लागणार आहे आपल्या माणसावर वार करायचा नसतो, पण चुकत असेल, शिवद्रोह होत असेल तर आता अश्यांना कठोर शासन करण्याची वेळ येवून ठेपली आहे. आणि महाराज, आम्ही आपल्याला वचन देतो की, कोणत्याही महापुरुषांचा कोणत्याही प्रकारचा अवमान आता सहन केला जाणार नाही महाराज आशिर्वाद द्या...

जय भवानी जय शिवराय.. जय जिजाऊ जय शिवराय..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com