अहमदनगर - विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे 20व्या द्विवार्षिक अधिवेशन आज शिर्डी येथे झाले. अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत ( Nitin Raut ) यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनानंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री नितीन राऊत यांनी मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश देणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ( Those who speak on Bhonga should come to Shirdi and see Sainath's thoughts )
भाजप नेत्यांनी केंद्र सरकार विद्युत कंपन्यांचे खासगीकरण करत नसल्याचे म्हंटले होते. यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले, केंद्राने आणलेला ठराव काय म्हणतो. त्या ठरावामध्ये काय माहिती आहे. केंद्र जर खासगीकरणाकडे जात नसेल तर कालच दादरा नगरहवेलीमध्ये प्रधानमंत्र्यांनी तेथील वीज वितरण प्रणाली आदानी व टोरेंट कंपनीला दिली. मग हे काय खासगीकरण नाहीतर सरकारीकरण आहे काय. त्यांनीच सांगाव 2014मध्ये आम्ही 14 हजार कोटी थकबाकी असताना तुमच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात ती 51 हजार कोटीच्या वर गेली. त्याला कोण कारणीभूत आहे. ज्यावेळी कोऱ्हाडी थर्मल पावर प्लांटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या मंत्र्यांकडे व संचालकांकडे बोट दाखवत सांगितले होते की यांच्याकडे जरा लक्ष ठेवा. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर निश्चित लक्ष ठेवले असेल म्हणून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले नव्हते, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.
नितीन राऊत पुढे म्हणाले की, साईबाबा कुणा एकाचे मार्गदर्शक अथवा दैवत नाहीत. त्यांनी कोण्या एका समाजाची ओनरशिप घेतलेली नाही. अशा श्रद्धा सबुरीच्या देवस्थानामध्ये साईनाथाचे आशीर्वाद घेण्यासाठी जे लोक येतात ते सर्व धर्माचे असतात आणि सर्व राज्यांचे असतात. ते अनेक देशांचे असतात. जे कोणी धर्माचा आव आणून भोंग्यासंदर्भात बोलत असतील त्यांनी कृपया श्रद्धा, सबुरी बाळगावी. एकदा तरी शिर्डीला येऊन साईनाथांच्या विचारांचे दर्शन घ्यावे, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.
काँग्रेसचे आमदार पक्ष श्रेष्ठींना भेटले यावर त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीवर परिणाम होईल असे काहीही घडणार नाही. नवीन आमदारांना संसदेत प्रशिक्षण दिले जाते. त्या प्रशिक्षणासाठी ते गेले आहेत. दिल्लीत गेल्यावर ते आपल्या नेत्यांची भेट नाही घेणार तर मग कुणाची भेट घेणार? नेत्यांना भेटण्याची संधी असल्याने ते तेथे गेले आहेत. महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.
यंदा भारनियमन नाही
उन्हाचा परिणाम जसा माणसांवर होतो तसा विद्युत यंत्र सामुग्रीवरही होतो. सबस्टेशनवरील ट्रान्स्फार्मरला आम्ही आजू बाजूने कुलर लावतो. त्याला थंडवारा देतो जेणे करून ते ट्रिप होऊ नयेत. परंतु उष्णता अशी आहे की आपला नाईलाज असतो. कुठेही भारनियमन होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. कारण हा महिना पवित्र महिना आहे. रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, राम नवमी याच महिन्यात आहे. त्यामुळे या महिन्यात भारनियमन कोठेही होणार नाही. याची काळजी आम्ही घेत आहोत. त्यासाठी आम्ही मुंबईत तसेच प्रत्येक क्षेत्रीय व जिल्हा कार्यालयातही कंट्रोल रूम सुरू केले आहे, अशी माहिती मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.