
भाजप आमदार सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहचले आहेत. बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराडवर मोकका लावल्यानंतर धस यांची मुख्यमंत्र्यांशी होणारी ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
वाल्मिक कराड कुटुंबीयांनी परळीत सुरू केलेलं ठिय्या आंदोलन अखेर बारा तासानंतर मागे घेतलं मात्र उद्या बैठकीनंतर पुन्हा आंदोलनाबाबत ठरवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे समर्थक परळीत भलतेच आक्रमक झाले आहेत.कराडची आईनं गेल्या 12 तासांपासून रात्री उशिरापर्यंत परळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिलेला आहे. तर त्यांच्याबरोबर समर्थक देखील हटलेले नाही. आता एका कराड समर्थकानं परळीत स्वत:ला पेटवून घेतलं आहे.
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर अखेर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.यानंतर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांंच्या राजीनाम्याच्या मागणी विरोधकांकडून केली जात आहे,त्या धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरीवर दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा पॅटर्न 2026-27 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासात दोषी आढळल्यानेच वाल्मिक कराडवर मकोका लागला आहे. खुनाचा कट रचण्यामध्ये वाल्मिक कराड सहभागी आहे, असं एसआयटीने कोर्टात सांगितलं आहे, असा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. परळी बंद हे मूठभर समाजकंटकांचे काम आहे. हा बंद उत्स्फूर्त लोकांचा नाही. पाच-पन्नास पोरं मोटार सायकलवर फिरून दम देऊन दुकान बंद करत आहेत. दडपशाहीने असं कोणी बंद करू शकत नाही.
मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. मास्टरमाईंड सापडला पाहिजे. त्यांना पळून जायला कोणी कोणी साथ दिली, कट कोणी रचला, हे सगळं बाहेर आलं पाहिजे. लोकांच्या मनात आधी हिंमत नव्हती, आता हिम्मत आली. एक एक प्रकरण बाहेर येतील. हे सगळे जण पुण्यात कसे सापडले हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, असे मत खासदार सोनवणे यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी 10 वाजता वरळी येथे मनसेचा मेळावा होणार आहे. मेळाव्याला राज्यातील प्रमुख पदाधिकारी मुंबई ठाणे पुणे नाशिक आणि संभाजीनगर महापालिका क्षेत्रातील गटाध्यक्ष व उर्वरित जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महापालिका निवडणुका समोर ठेवून राज ठाकरे यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं असेल. पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना राज ठाकरे कोणत्या सूचना देतील आणि मनसूचित भूमिका नेमकी कशा पद्धतीची असेल याबद्दल राज ठाकरे बोलतील...
संतोष देशमुख खूनप्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्यानंतर कराडला आज कोर्टात उभं करण्यात आलं होतं. कोर्टाने वाल्मिक कराडला संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. वाल्मिक कराड याला पुन्हा न्यायालयात उभं करण्यात येणार आहे. खंडणीचा गुन्हा आणि संतोष देशमुख खून प्रकरणात सहभाग या दोन गुन्ह्याप्रकरणी वाल्मिक कराडला एसआयटीने ताब्यात घेतलं आहे
संतोष देशमुख खून प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे, त्यानंतर कराड समर्थक आक्रमक झाले आहेत. कराडचे संपूर्ण कुटुंबीय त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, यासाठी आज सकाळपासून ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यात वाल्मिक कराडच्या आईचाही समावेश आहे. सकाळपासून ठिय्या मांडून असलेल्या वाल्मिक कराडच्या आईची तब्येत बिघडली असून डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची सूचना करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसभर असणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे १९ जानेवारीला दाओसला जाणार आहेत. त्याच्या अगोदर पालकमंत्रिपदाचा जबाबदाऱ्यांचे वाटप मुख्यमंत्री फडणवीस करतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
संतोष देशमुख खून प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे, त्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच, एसटीवर दगडफेकही करण्यात आली आहे. दरम्यान, परळीत वाल्मिक कराड समर्थकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्तरेश्वर देवाची यात्रा संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावाहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी आले होते. दरे गावचा दोन दिवसांचा दौरा आटोपून शिंदे हे मुंबईकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री भरत गोगावले हेही असल्याचे सांगण्यात येत आहे.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. संक्रांतीचा दिवस असूनही परळीत सर्व शुकशुकाट दिसून येत आहे. परळीजवळील टोकवाडी येथे टायर जाळण्यात येत आहेत. तसेच परळी-काडेगाव एसटी बसवर दगडफेकही करण्यात आलेली आहे.
बदलापूर नगरपालिकेत अधिकाऱ्यांनी सुमारे 1500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बदलापूरमध्ये पालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे. पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला नोटांचा हार घालण्यात आलेला आहे. पालिकेत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होणार आहे. तसेच त्याला आता SIT ने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने वाल्मिक कराड याचा ताबा 14 दिवसांपासाठी SIT ला दिला असून आता तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख SIT प्रमुख बसवराज तेली यांच्या भेटीला गेले आहेत. केज येथील शासकीय विश्रामगृहावर देशमुख कुटुंब आणि एसआयटी अधिकारी, सीआयडी अधिकारी यांच्यात चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील प्रदेश अध्यक्ष बदलाचे वारे वाहत असतानाच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले दिल्लीला जाणार आहेत. ते आज (ता.14) रात्री दिल्लीला रवाना होणार असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी गाठी घेणार आहेत. तसेच ते बुधवारी (ता.15) होणाऱ्या दिल्लीतील काँग्रेसच्या नवीन कार्यालयाच्या उदघाटनला उपस्थिती असतील. दरम्यान नव्या काँग्रेस प्रदेश अध्यक्षावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
वाल्मिक कराडवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर मोक्का लावण्यासह 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. यानंतर परळीत कराड समर्थकांनी अचानक परळी बंद केली. यामुळे येथील दुकानं बंद करण्यात आली आहेत. तर परळीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
बीड आणि परभणी प्रकरणामुळे राज्यात जंगलराज निर्माण झाला आहे. अशा या घटनांमुळे महाराष्ट्र बदनाम होत असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. तसेच SIT बदलून मूळ मुद्द्याकडून लक्ष भटकवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील पटोले यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर अखेर मोक्कातंर्गत कारवाई केली जाणार आहे. तसेच त्याची 14 दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यानंतर कराड समर्थक आक्रमक झाले असून परळी बंदची हाक दिली आहे. ज्यामुळे परळीतील संर्व बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर यावरून वाल्मिक कराड यांच्या पत्नीने याचा निषेध केला आहे. तसेच याप्रकरणात जातीवाद आणि राजकारण करण्यात येतोय असा दावा केला आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मोक्कातंर्गत कारवाई होणार आहे. यामुळे कराड समर्थक आक्रमक झाले असून परळी बंदची हाक दिली आहे. यानंतर परळीतील सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर वाल्मिक कराडला १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर मोक्कातंर्गत कारवाई देखील केली जाणार आहे. यानंतर कराड समर्थक आक्रमक झाले असून परळी बंदची हाक देण्यात आली आहे. सध्या कराडचा ताबा एसआयटीने घेतला असून आता चौकशी केली जाणार आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडला मोक्का, लावण्यात आला असून १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. यानंतर बीडमध्ये कराड समर्थक आक्रमक झाले आहेत. समर्थकांकडून भाजप आमदार सुरेश धस यांच्या बॅनरला जोडे मोरो करण्यात आले आहे.
वाल्मिक कराडच्या पोलिस कोठडीसाठी केज कोर्टात सुरू असलेल्या युक्तीवाद पूर्ण झाला असून आता कोर्टाने त्याला आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याला त्याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.
वाल्मिक कराडच्या पोलिस कोठडीसाठी केज कोर्टात सुरू असलेल्या युक्तीवाद पूर्ण झाला आहे. काही वेळातच कोर्टाकडून यावर निकाल सुनावला जाईल.
वाल्मिक कराडच्या पोलिस कोठडीसाठी अद्याप केज कोर्टात सुनावणी सुरूच आहे. दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला असून केज कोर्टात थोड्याच वेळात यावर निकाल देणार आहे.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी पोलिस कोठडीच्या मागणीला विरोध केला. मागील १५ दिवसांत काय तपास केला, असा सवाल वकिलांनी केला. बँक खात्यांच्या चौकशीसाठी आरोपीची गरज नाही. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता पोलिस कोठडीची गरज नसून न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी कराडच्या वकिलांनी केली आहे.
वाल्मिक कराडच्या समर्थकांनी मंगळवारी परळीत जोडे मारो आंदोलन केले. समर्थक महिलांनी आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारले. कराडचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या आईही पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत.
पोलिसांनी वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर केले आहे. पोलिसांनी १० दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे. वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. भारतात किंवा भारताबाहेर त्याची संपत्ती आहे की नाही, याचा तपास करायचा आहे. संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली, याचा तपास करण्यासाठी कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली आहे.
आम्ही अजून भेटलो नाही, पण चर्चेची गरज आहे. पुढील दहा दिवसांत एकत्र लढण्यासंदर्भात विचार करणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या स्वबळाच्या भूमिकेवर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
भाजपसोबत जाण्याचं आमच्या एकाही खासदाराचं मत नसल्याचे शरद पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
मागील काही दिवसांपासून इंडिया आघाडीमध्ये संवाद नसल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडीत संवाद असल्याचे स्पष्ट केले. पुढील 8-10 दिवसांत बैठक घेणार असल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.
संपूर्ण प्रकरण चिंताजनक आहे. ज्यापध्दतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, त्याची प्रचंड प्रतिक्रिया मराठवाड्याच्या भागात उमटली. तिथे एकप्रकारचा तीव्र सामाजिक तणाव निर्माण होईल, असे दिसत होते. ही बाब राज्याच्या प्रमुखांच्या कानावर घातली. राजकारण न आणता समाजामध्ये एकवाक्यता राहावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा घटना राज्याला शोभणाऱ्या नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
अमित शाह यांनी शिर्डीत उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी आले होते. अमित शाह यांची टीका जिव्हारी लागली नाही. टीका जिव्हारी लागेल अशी व्यक्ती आता नाही. त्यांनी माझ्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत, असा टोला पवारांनी लगावला.
अनेक उत्तम गृहमंत्री देशाने पाहिले. मात्र कुणालाही तडीपार केलं नव्हतं. 40 वर्षांपूर्वी टीका करणारे गृहमंत्री कुठे होते? आधीच्या राजकीय नेत्यांमध्ये सुसंवाद होता. आता तसं दिसत नाही. जनसंघाच्या लोकांनीही आमच्यासोबत काम केले, अशी टीका शरद पवारांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. शहांनी शिर्डीत केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. शहांनी गृहमंत्रिपदाची गरिमा राखली पाहिजे, असा निशाणा पवारांनी साधला.
खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला केज कोर्टात आणण्यात आले आहे. कोर्टाकडून त्याची कोठडी वाढवली जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. कराडने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.
वाल्मिक कराडच्या समर्थकांनी मंगळवारी परळीत टॉवरवर चढून आंदोलन केले. आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या समर्थकांनी केली. दरम्यान, सोमवारी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मस्साजोगमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते.
शिवसेनेचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढची विधानसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे म्हटले आहे. अंभई येथील एका कार्यक्रमात ही घोषणा त्यांनी केली आहे. या घोषणेनंतर अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत.
पंतप्रधान मोदी भारत मंडपम येथे पोहोचले. भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी झाले आहेत.
निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा निवडणूक प्रचार वादात सापडला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. आतिशी यांच्या निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहनाचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बीड- परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड यांच्या आईचं ठिय्या आंदोलन. राजकीय सुडाच्या भावनेतून वाल्मिक कराड याला अडकवण्यात आलं आहे. माझ्या मुलाला न्याय देण्याच्या मागणीसाठी कराड यांच्या आईचं ठिय्या आंदोलन .
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअप मधून आणले बाहेर. केज न्यायालयात केलं जाणार हजर. कराड याला पोलिस व्हॅनमध्ये बसवून 'सीआयडी' अधिकारी केजच्या दिशेने रवाना...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवार, धनंजय मुंडेंना वाचवित आहेत, कराड आणि फडणवीसांचे नातं काय आहे, हे तपासण्यासाठी एसआयटी स्थापन केली पाहिजे, असे राऊत म्हणाले.
इंडिया आघाडीचं नेतृत्व काँग्रेसकडे असावं, असे आमचं मत आहे, असे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले. सर्वांना सोबत घेऊन काँग्रेसनं आघाडीतं नेतृत्व करावं, असे राऊत म्हणाले. इंडिया आघाडी राहिली नाही तर देशात विरोधकच राहणार नाहीत, असे राऊत म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील विष्णू चाटे या आरोपीचा मोबाईल सापडला तर सर्वकाही समोर येणार आहे, परंतु या आरोपीचा मोबाईल अजूनही सापडत नाही. विरोधकांचे फोन क्षणार्धात टॅप करू शकणाऱ्या यंत्रणेला आरोपीच्या मोबाईलचा साधा CDR सुद्धा का मिळत नाही? हे पोलीस यंत्रणेचे आणि पर्यायाने गृहमंत्र्यांचे अपयश नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
बीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. चारपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. आंदोलन, मोर्चे यावरही बंदी घालण्यात आली आहे. 28 जानेवारीपर्यंत हा मनाई आदेश असेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. जरांगे हे २५ जानेवारीपासून मराठा समाजाला सोबत घेवून सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहेत.
पुण्यात PMPML मधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांवर PMPML कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. PMPL ने अशा फुकट्या प्रवाशांकडून वर्षभरात तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मागील वर्षभरात तब्बल 18 हजार प्रवाशांनी विनातिकीट बस प्रवास केल्याची माहिती आहे. PMPML 1 जानेवारी ते 23 डिसेंबर 2024 या दरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली आहे.
शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना आता शरद पवारांच्या राष्ट्रादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "दगाबाजीचे राजकारण भाजपने सुरू केलं, एक पक्ष फोडून दुसऱ्याला दिला. पण शरद पवारांचं राजकारण कुणीही संपवू शकत नाही. जय-पराजय सुरूच असतो," असं देशमुख म्हणाले.
शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी 23 तारखेला बीकेसीमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असून या दिवशी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवसापासून महापालिका निवडणुकीची रणनिती ठरवली जाणार असल्याचं सांगितलं.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेली एसआयटी बरखास्त करण्यात आली असून आता नवीन एसआयटीची स्थापना केल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. आता नवीन SIT चे प्रमुख पोलिस उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे प्रमुख असणार आहेत. जु्न्या एसआयटीमधील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडसोबत फोटो आहेत त्यामुळे त्यांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे आता नवीन SIT स्थापन करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.