

Pavitra teacher bharti: महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तब्बल 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरु झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
मात्र, मोठ्या संख्येने उमेदवार एकाच वेळी पोर्टलवर ल़ॉगिन करत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने उमेदवारांना दिलासा देत प्रधान्यक्रम लॉक करण्यासाठीची मुदत 13 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवली आहे.
पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवताना काही उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार विषय आणि पदांची पसंती उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. काही उमेदवारांच्या बाबतीत पोर्टलवरील माहिती व्यवस्थित दिसत नसल्याच्या तक्रारीही आहेत. त्याचबरोबर पोर्टलवर मोठ्या प्रमाणात लोड असल्यामुळे OTP मिळण्यास विलंब होत असल्याची समस्या अनेक उमेदवारांना जाणवत आहे.
यापूर्वी शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम नोंदवून लॉक करण्यासाठी 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 असा कालावधी दिला होता. मात्र, पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि वेबसाइटवरील वाढता लोड लक्षात घेऊन ही मुदत आता 13 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांची मुदतवाढ पुरेशी नसून किमान 1 आठवड्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिक्षक भरतीच्या उमेदवारांसह विविध शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.
पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे शिक्षण विभागाने मान्य केले आहे. विभागाने यासंदर्भात पत्रक जारी करून OTP न मिळाल्यास उमेदवारांनी काय करावे, याबाबत सूचना दिल्या आहेत.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत 76,394 मुलाखतीशिवाय आणि 56,206 मुलाखतीसह उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट झाले आहेत. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, “संकेतस्थळावरील लोड लक्षात घेता उमेदवारांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक 11/08/2026 ऐवजी 13/08/2026 अशी वाढविण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांनी सदर वाढलेली मुदत लक्षात घेऊन प्राधान्यक्रम लॉक करावेत.”
तसेच OTP संदर्भात विभागाने स्पष्ट केले आहे की, “पोर्टलवर उमेदवारांना लॉगिन करण्यासाठी अथवा प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी OTP आवश्यक आहे, यासाठी OTP वर क्लीक केल्यानंतर OTP लगेच येतो परंतु मोट्या प्रमाणात उमेदवार लॉगिन करत असल्याने OTP लगेच येत नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे OTP न आल्यास काही काळ OTP येण्यास वाट पाहावी, लगेच Resend यावर क्लीक करू नये.”
OTP उशिराने मिळाल्यासही तो स्वीकारला जात असल्याने उमेदवारांनी घाई करू नये, असेही शिक्षण विभागाने सांगितले आहे. काही वेळ प्रतीक्षा करूनही OTP न मिळाल्यास पुन्हा Resend वर क्लिक करून OTP मिळवता येईल.
ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचणी येत आहेत, त्यांनी वापरत असलेल्या Browser ची History आणि Cache Clear करावी. त्यानंतरही समस्या कायम राहिल्यास Incognito Window किंवा Private Window मधून पवित्र पोर्टलवर लॉगिन करण्याचा सल्ला शिक्षण विभागाने दिला आहे.
दरम्यान, शिक्षक भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी 13 ऑगस्ट 2026 ही सुधारित मुदत लक्षात घेऊन आपला प्राधान्यक्रम वेळेत लॉक करणे महत्त्वाचे आहे. तांत्रिक अडचणी लक्षात घेता मुदत आणखी वाढवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.