
BJP vs NCP Maharashtra politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीवेळी पुढाकार घेत, काळे-कोल्हे यांच्यात विधानसभा निवडणुकीवेळी युती घडवून आणली. कोल्हे परिवारानं पहिल्यादांचा 50 वर्षात, निवडणुकीतून माघार घेतली. परिणामी महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आशुतोष काळे विक्रमी मताधिक्याने निवडून आणले. हा विजय राज्यात चर्चेचा ठरला.
महायुतीत एकनिष्ठ राहिलेल्या कोल्हे परिवार राजकीय पुर्नवसनाच्या प्रतिक्षेत असतानाच, काळे-कोल्हे यांच्यात पुन्हा राजकीय संघर्ष उफळला आहे. आमदार काळेंनी उपकाराची भाषा केल्याने, यावर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे चांगलेच संतापले असून, सर्व हिशोब बाहेर काढत आगामी निवडणुकीत वचपा घेणार असा इशारा दिला आहे.
विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळेंवर (Ashutosh Kale) निशाणा साधताना म्हणाले, "या 40 वर्षांमध्ये आम्ही काय केलं हे जनतेला माहिती आहे, परंतु आमच्या कोणत्याही स्वीय सहायकाने पोलिसांच्या कानशिलात लगावली नसल्याची देखील बाब खरी आहे. आमदाराच्या स्वीय सहायकाने पोलिसांना मारावं इथपर्यंत मजल केलेली आहे, हे मी नाही, तर पोलिस ठाण्यात नोंद झालेली तक्रार सांगते आहे." तालुक्यात दोन नंबरवाल्या धंद्यांना राजाश्रय मिळतो आहे. रात्री दोन वाजता अवैध धंदा करणाऱ्यांसाठी हे लोकप्रतिनिधी पोलिस ठाण्याला जातात. सकाळी स्वतःच्या स्वीय सहायकासाठी पोलिस ठाण्यामध्ये जातात. जनतेचे रक्षकच भक्षक झाले आहेत, यापेक्षा दुर्दैव काहीच नाही, असेही विवेक कोल्हे यांनी म्हटले.
'वर्षभरापूर्वी हेवेदवे विसरून आपण निवडणुकीत प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर उभे राहिलो. त्यांनी मात्र त्यांच्या वार्षिक सभेमध्ये असं सांगितलं की, उपकार केलेत का? मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो की, गेल्या वेळेस सर्वात कमी मतदानांनी निवडून आलेल्या पाच आमदारांमध्ये तुम्ही एक होतात. शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीत (Election) देखील तुम्ही आमचे विरोधात काम केले. आपण पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार प्रामाणिकपणे काम केले आणि सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात, 'भूतो न भविष्यति', अशा टॉप पाच आमदारांमध्ये निवडून आले. आता सहा महिने झाले नाही तोच, तुम्ही तुमचे रंग दाखवायला सुरूवात केली,' यावर कोल्हेंनी आमदार काळेंवर निशाणा साधला.
गेली पंधरा वर्षे सातत्याने तुम्ही सत्तेत आहात. कोल्हेसाहेब ज्यावेळेस सत्तेत होते, त्यावेळेस राज्याचे बजेट 25 हजार कोटी रूपये होते. आज ते सहा ते सात लाख कोटी रुपयांवर गेले आहे. पाच कोटींच्यावर आमदार निधी मिळतो. परंतु मतदारसंघात पहिल्यावर काय परिस्थिती आहे, हे लक्षात येते. एकही रस्ता नीट राहिलेला नाही, दुसरीकडे तीन ते चार हजार कोटी रूपयांची वल्गना तुम्ही करता. याचा हिशोब केल्यास तर प्रत्येक गावाला 13 ते 14 कोटी रूपये आले पाहिजे. परंतु कोणत्या गावाला गेले हे माहिती नाही. परंतु त्यांच्या स्वीय सहायकांच्या घरी गेल्याचं वाटतं. 40 वर्ष आम्ही काय केले, हे जनतेला माहिती आहे. परंतु या 40 वर्षांमध्ये आमच्या कोणत्याही स्वीय सहायकाने पोलिसांच्या कानशिलात लगावली नसल्याची, ही बाब खरी आहे,' असा टोला कोल्हेंनी आमदार काळेंना लगावला.
'उपकाराची फेड कशी करत आहे, तर निष्कृष्ट रस्ते, भ्रष्टाचार, टक्केवारी, अवैध धंदे, खोटी प्रसिद्धी, आपल्यालाच नव्हे, तर संपूर्ण मतदारसंघांला यांनी फसवलं आहे. विकासाच्या नावाखाली यांनी दिशाभूल केली आहे. रोजगार नाही, भ्रष्टाचार फोफावला आहे. दंगल झाली, ती कोपरगावच्या इतिहासात कधीही झाली नव्हती. ती झाली. आमदाराच्या स्वीय सहायकाने पोलिसांना मारावं इथपर्यंत मजल केलेली आहे, हे मी नाही सांगत, तर त्या ठिकाणी नोंद झालेली तक्रार सांगते,' असे कोल्हे यांनी म्हटले.
कोपरगावमधील दोन नंबरवाल्यांच्या धंद्यांना राजाश्रय मिळतो आहे. रात्री दोन वाजता अवैध धंदा करणाऱ्यांसाठी हे लोकप्रतिनिधी पोलिस ठाण्यात जातात. सकाळी स्वतःच्या स्वीय सहायकासाठी पोलिस ठाण्यामध्ये जातात. परंतु कोपरगावमधील एक युवती, स्पर्धा परीक्षांमध्ये पहिली आली, तिची निर्घृण हत्या झाली, राज्यातील तेरा लोकप्रतिनिधींनी सभागृहात यावर विचारणा केली. पण दुर्दैवाने आमच्या आमदारांना तिच्यासाठी न्याय मागण्यासाठी सभागृहात वेळ मिळाला नाही. कुराणसारखा धार्मिक ग्रंथ इथं फाडला गेला, त्याला दीड वर्ष ओलांडून गेले, त्याचेही काही झाले नाही. दीड महिन्याभरापूर्वी गोळीबार झाला, आमदारांचे फ्लेक्स लावणारे त्यात कार्यकर्ते होते, त्याचेही पुढे काही झाले नाही. कोपरगाव तालुक्याची परंपरा धुळीस मिळवण्चे काम आमदार कुठेतरी करत आहे, अशी टिका कोल्हे यांनी केली.
'राज्यामध्ये आपली प्रतिमा मलीन होत आहे, पोलिसांना रक्तबंबाळ करण्याचं काम या तालुक्यामध्ये यापूर्वी कधीच झालेले नाही. कायदा सुव्यवस्था फार रसातळाला गेलेली आहे. आपणास एक विनंती आहे, तालुक्याचे बीड होऊन देऊ नका. यांच्यामाग आका म्हणून उभे राहू नका, अशी विनंती विवेक कोल्हेंनी आमदारांना केली. नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वीय सहायकाला राजाश्रय न देता, पोलिसांसमोर हजर करावे, असा सल्ला देताना निवडणुकीमध्ये 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' केल्याशिवाय हे मतदार राहणार नाहीत,' असा सूचक इशारा कोल्हे यांनी काळेंना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.